Sunday, May 17, 2020

प्रा. डॉ. केशव राजपुरे सर (एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व !)

यशवंत डॉ. केशव
एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व !

एका मातीचे अनेक रंग असतात
एका विचाराचे अनेक विचार असतात
एका बिंबाची अनेक प्रतिबिंब दिसतात
एका ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी उमटतात
एक एक नसतचं
त्या एका एकात अनेक एक एकवटलेले असतात अंतराळातल्या सूर्यमालेप्रमाणे ! 
तसे आमचे डॉ. केशव राजपूरे सर. *केसू येसू* पासून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास. अविरतपणे आपल्या स्वप्नांना स्फूर्तीदायक प्रयत्नांची जोड देऊन आपल्या वडिलांचे यशवंत नाव सत्यात उतरवून जीवनात यशवंत झालेले *यशवंत डॉ.केशव सर*!

          मोठ-मोठी कार्य साधतात ती दृढनिश्चय, असीम धैर्य आणि पराकाष्ठेचे प्रयत्न यांच्या बळावर ! तिथे परिस्थितीला थारा नसतो, थारा असतो फक्त लढण्याला, जिंकण्याला आणि अव्वलतेला !  विद्यार्थ्याची जिज्ञासा तीव्रतम असेल, बुद्धी अत्यंत कुशाग्र आणि निर्मल असेल तर समाज उभारणीचे कार्य अविरतपणे पार पाडणारे शिक्षकरुपी परीस त्या विद्यार्थ्याचे आणि पर्यायाने समाजाचे सोने केल्याशिवाय स्वस्थ राहत नाहीत हे ध्येय सत्यात आणणारे जिद्दी सर ! विद्यार्थी कसा असावा? तो आदर्शच का असू नये ? तो शिक्षणात आणि आयुष्यात ' टॉप ' च कसा राहील? ही मूल्ये आयुष्यभर रुजवणारे शिस्तप्रिय सर ! 'शिकून काय उपयोग?' असे म्हणून सरस्वतीची अवहेलना करणाऱ्यांना, परिस्थितीपुढे नाक घासनाऱ्यांना आणि माघार घेण्याची सवय असलेल्यांना शिक्षणरूपी यश काय असते याचे झणझणीत अंजन 'याची देही, याची डोळा' घालणारे मुत्सद्दी सर ! शारीरिक आणि मानसिक वेदनांना ठेचत आणि चुचकारत स्वाभिमान ज्वलंत ठेवून आई - वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे यश खेचून आणणारे आदर्श पुत्र ! आयुष्याच्या यज्ञात आणि यशाच्या मार्गावर साथ देणारे गुरूवर्य, मित्रमंडळी, सहकारी, आप्त आणि असंख्य विद्यार्थी यांना हृदयात स्थान देवून नाती जोपासणारे मायाळू आणि हळवे मित्र! एक उत्कृष्ठ आणि संयमी शिक्षक,  आपुलकी आणि जिव्हाळा असलेलं प्रेमळ व्यक्तिमत्व,  सामाजिक भान असलेले एक सुजाण नागरिक!  समाज आणि कार्य या दोन गोष्टी प्रेरणेवर चालतात. प्रेरणा असेल तर अशक्यप्राय गोष्टी शक्य करता येऊ शकतात. आपल्याच मार्गाने येणाऱ्या आपल्याच बांधवांना स्फुरण देऊन  उत्स्फूर्तपणे यश मिळवण्यासाठी तयार करणारी आणि प्रोत्साहन देणारी प्रेरणा म्हणजेच प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे सर!

          'बावधनच्या मातीत वेगळीच चमक आणि धमक आहे..!' या वाक्याला सप्रमाण सिध्द करून दाखवणारे एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय  राजपुरे सर ! सरांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत; अनपटवाडी येथे मातोश्री अंजूबाई यांचे पोटी दि. २४ जुलै १९७१ रोजी  झाला. मूळचे दरेवाडीचे (बावधनचीच दुसरी एक वाडी) असणारे राजपुरे कुटुंबीय अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चरितार्थासाठी अनपटवाडी येथे शेतातील वस्तीवर  स्थायिक झाले होते. हलाखीची परिस्थिती, अशिक्षित आई - वडील, शेती हाच उपजीविकेचा आधार, अन्य उत्पन्नाचे साधन नव्हते तसेच घरात इतर भावंडं (पाच बहिणी आणि एक भाऊ) असलेले हे कुटुंब सरांच्या मेहनतीमुळे पुढे  यशस्वी कुटुंब म्हणून नावलौकिक मिळवेल, हे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. वडील कै यशवंत राजपूरे यांना नेहमी असे वाटे की माझी मुले शिकून खूप मोठी व्हावीत आणि त्यांनी यशस्वी आयुष्य जगावं. कोणत्या पालकांना असे वाटत नाही परंतु परिस्थितीने तर साथ द्यावयास हवी ?  त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट, मजुरी आणि शेतीची उरफोड करणारी कामे करून व्यतीत केले. प्रतिकूलतेमध्ये रूजनारे 'बी' च पुढे जाऊन वटवृक्ष बनत असते !

          अश्या परिस्थितीत अनेक प्रसंगांना सामोरे जात सरांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. सन १९७७ ते १९८० या  काळात सरांचे इयत्ता पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी या मूळ गावी झाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेते वेळी मुलाचे नाव काय म्हणून वडीलांना विचारले असता त्यांनी 'केसू येसू राजपुरे' असे नाव लावण्यास सांगितले कारण सरांच्या आजोबांचे नाव केसू असे होते, त्यांवरील प्रेम म्हणून सरांचे केसू हे नाव अजूनही खूप ठिकाणी आपणास पहावयास मिळते. हा नावाचा किस्सा अजूनही सरांना आठवतो. पुढील आयुष्यात नावातील या गडबडीमुळे सरांना पासपोर्ट वेळेवर मिळाला नाही आणि परदेशी जायची संधी गेली.  इयत्ता पहिलीत प्रवेशित झाल्यानंतर वर्गाचा पट होता नऊ, सहा मुली आणि तीन मुले! सर, हनुमंत मांढरे, संदीप यादव, जया, प्रमिला, संगीता, सुनीता, वनिता आणि शारदा. ग्रामीण मित्रमंडळींच्या सोबत हसत खेळत आणि गावगुंडी अनुभवत सरांचे प्राथमिक शिक्षण झाले. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सर कायम ८५ टक्के च्या वरच असत. इयत्ता पहिली ते तिसरी या काळात सरांना कोदे गुरुजी हे अतिशय शिस्तप्रिय शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे सरांच्या आयुष्यात पूर्वीपासूनच शिस्तीला महत्व आहे. या काळातील दोन किस्से सांगावेसे वाटतात; एक म्हणजे लहान बहिणीच्या शिक्षणासाठी सर इयत्ता पहिली मध्ये दोन वेळा बसले होते याचा परिणाम म्हणजे त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच भक्कमपणे झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे मित्र हनुमंत मांढरे आणि सर यांनी केलेल्या दंग्यामुळे कोदे गुरुजींनी केलेली तीन तासांची ओणव्यातून पायाचे अंगठे धरण्याची शिक्षा ! सरांचा खोडकर आणि कुशाग्र स्वभाव अश्या गोष्टींनी फुलत गेला.  सरांचा अभ्यासाचा आवाका आणि कुतूहल वाढण्यामागे हेच कारण असावे. बालपणी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतःचे एक विश्व असते. सरांचे ही होते ! सरांना नेहमी प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटे. प्रश्न विचारून शिकायचं हे तेव्हाच त्यांना ठावूक होतं. त्यामध्ये ते सतत विचार करत की, हे असे का?, तसे का?, असे का नाही?, तसे का नाही? या सवयीमुळे प्रश्न पडायची सवय आपोआपच लागत गेली आणि उत्तरे मिळवण्याची सुध्दा !

           सन १९८० साली इयत्ता चौथी साठी सरांचा प्राथमिक शाळा बावधन येथे प्रवेश झाला. इयत्ता चौथी च्या केंद्र परीक्षेमध्ये सरांना ७४.२५ टक्के गुण मिळाले. नवीन शाळा, शिक्षक आणि वातावरणाचा त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. हे गुण सरांच्या अपेक्षेस उतरले नाहीत त्यामुळे त्यांनी निराश न होता अधिकाधिक मेहनत घ्यायचे ठरवले. नंतर १९८१ साली सरांना बावधन हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवी साठी प्रवेश घेण्यात आला.  या वातावरणात विविध स्पर्धा खेळून चुरस, चढाओढ आणि अव्वल राहण्याचे गुण सरांमध्ये वाढत गेले की जे अजूनही त्यांच्यात आहेत. खो - खो सारख्या मैदानी खेळांमध्ये सरांना विशेष आवड होती. या खेळामध्ये सरांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले होते आणि खो - खो चे अनेक सामने जिंकले होते. सन १९८२ ते १९८७ दरम्यान सरांचे इयत्ता पाचवी ते दहावी चे शिक्षण बावधन हायस्कूल, बावधन येथे पूर्ण झाले. हा कालखंड खऱ्या अर्थाने त्यांच्या जडणघडणीचा होता. त्यांचे जीवन यशस्वी करण्यामागे या कालखंडातील काही प्रसंगांचे अनमोल योगदान आहे.  माणसाच्या आयुष्यात प्रत्येक प्रसंग त्याला काहीतरी प्रेरणा देऊन जात असतो. त्यापैकी च एक प्रसंग म्हणजे इयत्ता पाचवीत असताना सरांना इंग्रजीच्या पेपरमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळाले होते. सरांचा पेपर अतिशय अव्वल होता. त्यामुळे इंग्रजीच्या शिक्षिका पाटील बाई यांनी तो पेपर इतर मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून संपूर्ण हायस्कुल मधील मुलांना दाखवला होता. हा प्रसंग सरांना त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आणि चैतन्यदायी आहे याची जाणीव निर्माण करून गेला. आपण जरी वाडीमधून आलो असलो तरी बावधन मधील हुशार मुलांच्या पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास सरांच्यात निर्माण झाला.  सर आजही पाटील बाईंचे ऋणी आहेत. तसेच गणित विषयाचे कै मारुती (एमएस) पवार सर यांचाही सरांवर फार प्रभाव आहे. पवार सरांची एक सवय होती. ते वर्गावर तास घेण्यासाठी आले असता दारातून येतानाच गणित सांगत येत असत आणि मुलांना सोडवायला सांगत असत. एके दिवशी पवार सर एक गणित सांगत वर्गात आले आणि गणित सांगून संपल्या बरोबरच पुढे बसलेल्या केशवनी लगोलग उत्तर दिले. उत्तर बरोबर होते. सरांनी विचारले कसे आले ते सांग. पण केशवना अचानक पद्धत सांगता आली नाही, ते घाबरले आणि पवार सरांनी त्यांना एक तास बाकावर उभे राहायची शिक्षा केली. या प्रसंगातून सरांना आपल्या आयुष्यात आत्मविश्वास किती गरजेचा आहे याचे महत्त्व समजले. पवार सरांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव सरांना शिस्त आणि आत्मविश्वास देऊन गेला. 

त्यानंतर सरांनी अभ्यासात कधीही मागे वळून पाहिले नाही. इयत्ता दहावी पर्यंत बावधन पंचक्रोशीत असलेल्या साऱ्या शाळांमधून सर प्रथमच यायचे, त्यांचे गुण ८० टक्क्यांच्या खाली कधीही आले नाहीत. ही विशेष बाब येथे अधोरेखित करावीशी वाटते. सरांचे आवडते दुसरे पवार सर म्हणजे; पीएन पवार सर! सरांच्या मार्गदर्शनाखाली केशव सर संघात असलेल्या बावधन संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाला संघांना धूळ चारली ती निव्वळ पवार सरांनी पेरलेल्या जिद्दी खेळाने. सर इयत्ता सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांच्या खो - खो संघाचे कप्तान होते, स्काऊट गाईड चे कॅम्प असो, क्रीडा स्पर्धा असो सरांनी आघाडी कधीच सोडली नाही. 'विद्यार्थी हा विद्येचा भुकेला असला पाहिजे, तो परीक्षार्थी असता कामा नये'- ही सरांची कायम धारणा !

          आयुष्यात सारं जिथल्या तिथं आणि सहजरित्या मिळालं तर आयुष्याला अर्थ राहत नाही. प्रतिकुलतेवर मात करून मिळवलेलं यशच जगण्याला आनंद देत असतं. सरांच्या बाबतीत सुध्दा असेच झाले. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सरांनी शिक्षण प्रवास चालू ठेवला. दिवा आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास केला. मित्रांची जुनी पुस्तकं तसेच बायडींग केलेल्या वह्या वापराव्या लागल्या.   वर्षाकाठी केवळ एकच गणवेष सरांना मिळत असे. हे सर्व दुःख सरांच्या वाट्याला आलेलं होत. काही प्रसंग डोळ्यांमध्ये पाणी आणणारे होते तर काही प्रसंग मन पिळवटून टाकणारे! असाच एक प्रसंग: अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असणाऱ्या बी. टी.पिसाळ या पी. टी. च्या सरांकडून त्यांना शिक्षा मिळाली. एके दिवशी बी. टी. पिसाळ सर मैदानावर मास ड्रिल चा सराव घेत होते. त्या वेळी सर्वात पुढे टेबलवर उभे असलेल्या  केशव सरांनी पाठीमागे पँट फाटल्यामुळे  इन शर्ट केला नव्हता. त्यामुळे पिसाळ सरांनी त्यांना शिक्षा केली होती. नंतर जेव्हा त्यांना कारण समजले तेव्हापासून कधीही त्यांनी सरांना इन शर्ट का केला नाहीस असे विचारले नाही. दुसऱ्या दिवशी पिसाळ सरांनी त्यांना पँट आणून दिली.  स्वभावाने शांत आणि लाजाळू असणाऱ्या सरांना परिस्थितीचे चटके जाणवत होते पण पर्याय नव्हता. जे होतं त्यातच समाधान मानावं लागत होतं. सगळ्या गोष्टींवर मात करत सर प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत होते. 

बावधन जनता सहाय्यक मंडळ दरवर्षी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बावधन बगाडाच्या वेळी बक्षीसे देत असत. सरांनी पाचवी ते दहावी दरम्यान सलग सहाही वर्षी ही बक्षिसे मिळवली आहेत. त्याकाळी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरांना 'पेड की गवाही' या नाटकामध्ये एका वकिलाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. ती त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी करून दाखवली. हे असतं लढत राहणं!  हे असतं जीवनाचा खरा आनंद घेणं!  इयत्ता दहावीच्या वर्गात असताना सरांची खरी प्रतिभा प्रकटली. ते त्यांचा सर्व अभ्यास दिवसाच करत असत कारण रात्री घरात लाईट नसायची. दिवसभर शेतात काम करत त्यांनी दहावीचा अभ्यास खूप मेहनतीने पूर्ण केला. परिणामतः जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यांच्यामुळे सर १९८७ साली दहावीच्या शालांत परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्र आणि पंचक्रोशीत प्रथम आले. मूळ गावी दरेवाडीतील ग्रामस्थांनी ढोल वाजवत आणि गुलाल उधळत सरांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. ही शाबासकीची थाप सर कधीही विसरू शकत नाहीत. साधारण दिसणाऱ्या असाधारण विद्यार्थ्याचे यश होते ते ! कष्टकरी घरे सुध्दा असे बुद्धिवंत समाजास देत असतात याचीच ही प्रचिती नव्हे का ? 

          दहावीच्या निरोप समारंभामध्ये इच्छा असताना सरांना रंगीत ड्रेस घालायला मिळाला नाही. सगळे मित्र रंगीत ड्रेस घालून आले होते. सरांकडे वर्षाकाठी मिळणारा एकच पांढरा शर्ट आणि खाकी पँट असणारा ड्रेस होता. ते तोच गणवेष घालून समारंभात आले होते. कठीण परिस्थितीत तोच त्यांचा मित्र होता! आजही जेव्हा आपण सरांचे विद्यार्थी दशेतील फोटो पाहतो तेव्हा मनामध्ये माणसाची परिस्थिती आणि त्याची बुद्धिमत्ता यांचे चाललेले द्वंद्व थैमान घालते. वार्षिक यात्रेनिमित्त वर्षातून एकदाच सरांना, त्यांच्या बहिणींना आणि आईला त्यांच्या आजोळी म्हसवे, येथे जायला मिळत असे. परंतु पैश्यांची कमतरता असल्यामुळे ही सारी मंडळी पहाटेच घरातून निघून मजल दर मजल करत रानातून, डोंगरातून आणि खिंडीतून  पाऊलवाटेने तब्बल १५ कि.मी. चालत जात असत आणि परत तेवढंच अंतर कापून माघारी अनपटवाडी ला घरी येत असत. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सर आणि त्यांचे वडील वाईला साहित्य आणण्यासाठी ८ कि.मी. चालत जात असत आणि रात्री परत माघारी येत असत. 

माणसाला आयुष्यात दोन गोष्टी महान बनवत असतात; एक म्हणजे त्याने सोसलेले कष्ट आणि त्याने घेतलेले परिश्रम ! मोठ्या कष्टांनी दहावी ला खूप गुण मिळाले होते. आता कॉलेज ला प्रवेश घ्यावा लागेल पण त्यासाठी पैसे आणि गणवेष पाहिजेत. कॉलेजला जायचे असेल तर जुना गणवेष घालून जायला कमीपणाचे वाटे. म्हणून एकदा सरांनी आईला नवीन रंगीत ड्रेस घेण्यासाठी विचारले असता पाच भावंडांच्या देखभालीमध्ये गुंतलेल्या आणि संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईने असमर्थता दाखवली. ही असमर्थता सरांना कित्येक वेळा कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. त्याच क्षणी सरांनी ठरवले की आपणही वडिलांबरोबर मजुरी करायची कॉलेज साठी आपला ड्रेस आपण घ्यायचा. भर उन्हात, अनवाणी पायांनी सरांनी विहिरीतून दगडाच्या पाट्या बाहेर काढण्याचे काम स्वीकारले. सरांनी त्या वयात पोटात गोळा येईल एवढे काम केले. विहिरीच्या तळामध्ये काम करणारे वडील आपल्या मुलाचं काम पाहायला आले आणि त्यांना पाहून सरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. वडिलांनी त्यांना कवटाळले आणि त्या क्षणी सरांना वडील आणि कष्ट या जोडीचे दाहक सत्य उमगले. सरांनी त्या वेळी तीस रुपये हजेरीने सहा दिवस काम केले. त्यातून त्यांना एकशे ऐंशी रुपये मिळाले. आपल्या आयुष्यातील पहिला रंगीत ड्रेस सरांनी  स्वकमाईतून घेतला. जीवनाच्या प्रवासात येणारे असे आसू आणि हसू चे प्रसंग माणसाला मानसिक बल देत असतात !

          उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे की कुटुंबासाठी काम करून पैसे कमवायचे या द्विधा मनःस्थितीत सर अडकले होते. खंडाळा येथील सरांचे दाजी स्व. सदाशिव कृष्णा शिर्के यांनी या काळात सरांना आधार दिला. त्यांचे कापड व्यवसायाचे दुकान होते. सुट्टीच्या कालावधीमध्ये सर कापड दुकानावर काम करू लागले. शिक्षण चालू राहावे म्हणून खंडाळ्याच्या राजेंद्र विद्यालयामध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु दाजींच्या ओळखीच्या शिक्षकांनी सांगितले की एवढे उत्तम गुण मिळून सुध्दा कॉलेज ला प्रवेश का घेतला आहे, तुम्ही डिप्लोमा साठी प्रयत्न करावा. तद्नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सिव्हील डिप्लोमा साठी सरांना प्रवेश मिळाला. दहावीचे गुण आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे डिप्लोमा करण्यासाठी मानसिक तयारी केली. त्यानंतर वसतिगृहात सरांची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरांना नाईलाजाने कराड येथील डिप्लोमाचा प्रवेश रद्द करावा लागला. नियतीच्या मनात नक्की काय असते मनुष्याला कधी समजले आहे का ? दाजींचा रोष ओढवून, वेळ न दवडता वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये सप्टेंबर १९८७ मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. सर कॉलेजमध्ये दहावीच्या गुणांनुसार  अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विसावे होते. सरांना कॉलेज साठी लागणारे साहित्य, पास आणि इतर सुविधांची पूर्तता वडिलांनी मजुरी करून  केली. महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा सर सांगायला विसरत नाहीत. विज्ञान विभागाची जर्नल्स घेण्यासाठी सरांना पैशाची आवश्यकता होती. त्यांनी वडीलांना ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांनी गावातील संपतराव गोळे यांचेकडून उसने पैसे घेऊन सरांना दिले. सर नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले, त्यांनी पैसे कंपासबॉक्स मध्ये ठेवले होते. प्रॅक्टिकल वेळी त्यांचे पैसे कोणीतरी चोरले. गरीबीमध्ये प्रामाणिक असणाऱ्या माणसावर नियतीने नकळत केलेले वार फार जिव्हारी लागतात ! घरी आल्यावर झाला प्रसंग वडीलांना सांगितला. वडील म्हणाले, "असुदे, तुला मी परत पैसे देईन !" त्यानंतर वडिलांनी आणखी काही दिवस मजुरी करून आलेले पैसे जर्नल घेण्यासाठी सरांना दिले. असा प्रत्येक प्रसंग काही ना काही ज्ञान देऊन जात होता, सरांना जाणतं करत होता !

          नवीनता, कष्टाळू वृत्ती, सोशिकता, प्रामाणिकपणा आणि रोज नवनवीन शिकण्याची भूक असणारा हा विद्यार्थी कॉलेजमध्ये सुध्दा चमकत होता. सरांनी सन १९८९ साली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या ग्रुप मध्ये ८६ टक्के गुण मिळवले तसेच बारावी शास्त्र शाखेत एकूण ८२  टक्के गुण  मिळवून महाविद्यालयात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला. सरांची विशेषता म्हणजे त्यांनी दहावी आणि बारावी साठी एकही शिकवणी लावली नव्हती. केवळ प्रतिभा आणि आंतरिक इच्छेच्या बळावर सरांनी एवढे मोठे यश मिळवले होते. बारावी झाल्यानंतर शिक्षण आणि कामधंदा यांचा नाच सरांच्या डोळ्यांपुढे थैमान घालत होता. सरांचे मोठे बंधू सुध्दा शिक्षित होते. त्यांनी एम. कॉम. पूर्ण केले होते आणि त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. नोकरी सहजासहजी मिळतं नसल्याने घरखर्च वडिलांनाच भागवावा लागत होता आणि हीच गोष्ट सरांना सारखी बोचत होती. परंतु पर्याय नव्हता. सर बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. सगळीकडे त्यांचे कौतुक आणि सत्कार होत होते. या सगळ्या धावपळीत सरांनी परत खंडाळ्याच्या दाजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. सरांनी डिप्लोमाचा प्रवेश रद्द केल्याचा मनातील रोष बाजूला ठेवून दाजींनी मोठ्या मनाने  त्यांच्या पुढील शिक्षणाचा बोजा परत एकदा उचलण्याची तयारी दर्शवली. सरांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय माणसातील दाजीरूपी देवाने घेतल्यानेच पुढील शिक्षण सोपस्कर झाले.  

          सन १९८९ साली नातेवाईकांनी दाजींना विनंती केल्यामुळे लोणंद येथील सायन्स कॉलेजमध्ये बी. एससी. साठी सरांनी प्रवेश घेतला. सर यावेळी त्यांच्या खंडाळ्याच्या दाजींच्या येथे राहायला होते.  बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी इतरत्र कोठेही प्रवेश न घेता आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो याची दखल महाविद्यालयाचे प्राचार्य कै. दिपा महानवर यांनी घेतली. सरांच्या ठायी असणारी चमक आणि हुशारी महानवर सरांनी ओळखली होती. त्याचबरोबर सरांच्या परिस्थितीची सुध्दा माहिती त्यांना झाली होती. महानवर सरांनी प्रवेशावेळी दाजींना सांगितले होते की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगलं करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवा मी त्याला शैक्षणिक मार्गदर्शन करतो, असे आश्वासन महानवर सरांनी दिले. सरांच्या गुणवत्तेला त्यामुळे वाव मिळाला. दाजींचा भक्कम आधार मिळाला. महानवर सरांना त्यांच्या महाविद्यालयाचा हिरा सापडला ! त्याला पैलू पाडण्याचे काम चालू झाले. 

सरांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर सरांनी स्वतःचा दिनक्रम बनवला होता. ते भल्या पहाटे उठत असत. स्वतः सर्व कामे आवरून सकाळच्या पावणेसहाच्या बस ने लोणंद ला जात. तिथून एक किलोमीटर चालत महाविद्यालयात जात असत. नित्यनेमाने सर्व लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स करत असत. बऱ्याचदा डबा नसल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशीच असत. सकाळी घरातून निघताना रात्री शिल्लक राहिलेले अन्न खावून सर कॉलेजला निघत असत. कृतज्ञतेची भावना असलेल्या मनाला दुसऱ्यांना त्रास देण्यास अजिबात आवडत नसावं ! महानवर सर स्वतः प्राचार्य असूनही नेहमी सरांची जातीनिशी चौकशी करत असत. सरांना लागणारे प्रश्नसंच, पुस्तके, नोट्स ते मागण्या अगोदरच मिळत असे. एक पालक आपल्या पाल्याची जशी जबाबदारी घेतो तशी जबाबदारी महानवर सरांनी घेतली होती. त्याचबरोबर दाजींनी सुद्धा सरांना आपला एक मुलगाच समजून सांभाळ केला. कॉलेज मध्ये सरांच्या अभ्यासाची चौकशी वारंवार होत असे. त्यांना नेहमी विशेष व्यक्ती प्रमाणे वागणूक मिळत असे. शेवटी म्हणतात ना हिऱ्याची ओळख रत्नपारख्यालाच असते !  

हे करत असतानाच सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, महानवर सरांच्या जिद्द, चिकाटी आणि कोणत्याही प्रकारे हाती घेतलेले कार्य पूर्ण करून घेण्याच्या तळमळीतून आणि गुरूजनांना त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणाऱ्या सरांच्या बेजोड कष्टांमधून 'न भूतो, ना भविष्यती' असे यश महाविद्यालयाने मिळवले होते. सन १९९२ साली बी. एससी. मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून (सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर) प्रथम येण्याचा बहुमान सरांनी मिळवला होता. बी. एससी. च्या तिन्ही वर्षांत ९१ टक्के गुण मिळवून सरांनी बाजी मारली होती. लोणंदच्या विनाअनुदानित महाविद्यालयाचा विद्यार्थी भरमसाठ गुण मिळवून संपूर्ण शिवाजी विद्यापीठात प्रथम येतो याचे किती तरी जणांना नवल वाटले ! योगायोगाची गोष्ट म्हणजे सर बी. एससी. मध्ये विद्यापीठात प्रथम आले आणि त्याच वर्षी महाविद्यालयास पूर्ण अनुदान मिळाले. महानवर सरांच्या कष्टाचे चीज झाले होते. हाडाचे शिक्षक कसे असतात याचे उदाहरण म्हणजे महानवर सर! महानवर सरांच्या ठाई असलेले पद्धतशीरपणा, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण सरांनी अवलोकले. त्यांच्या आत्मविश्वास वाढीस चालना मिळाली. सरांच्या पंखांना बळ देण्याचे काम येथेच झाले. 'केशव आपल्याला एम. एससी. करायची आहे !', हे महानवर सरांचे बोल अजूनही सरांना आठवतात.  परीस ज्याला स्पर्श करेल त्याला सुवर्णमय करतो. सरांच्या आयुष्यात आलेले महानवर सर हे त्यांच्यासाठी आदर्श परीसच होते. एक हक्काचे आधारवड होते.

          खेड्यातील गरीब कुटुंबातून शिक्षण घेतलेल्या एका मुलाने आपल्या कुशलतेने मिळवलेल्या यशाचा यथोचित गौरव व्हावा असे महानवर सरांना नेहमी वाटे; विशेषतः हा गौरव तत्कालीन मुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे ही त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांची बदली रामानंदनगर येथे झाली असतानाही त्यांनी तत्कालीन सहकार मंत्री आणि आमदार कै.पतंगराव कदम यांच्या हस्ते सरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. उद्देश एकच, आपण घडवलेला मुलगा जीवनात यश तर मिळवणारच आहे पण त्याला आणि त्याच्या सारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रेरणा मिळायला हवी! खरच अशा शिक्षकांची आज समाजाला नितांत गरज आहे. महानवर सरांनी एवढ्यावरच न थांबता सरांच्या गावी अनपटवाडी येथे सरपंच आणि पंचायतीच्या सदस्यांना कॉलेज चे पत्र पाठवून केशव सरांचा आमदार मदनराव पिसाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यास सांगितले होते. त्यांनी स्वतः येण्याची तयारी दाखवली होती. ते पत्र अजूनही सरांच्या संग्रही आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तयार झालेले हे मैत्रीचे आणि स्नेहाचे नाते आजीवन टिकले आहे.

          सन १९९२ साली बी. एससी. त ९१ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महानवर सरांचे मार्गदर्शन घेऊन सरांनी एम.एससी. करायचे ठरवले. त्यांनी याकरता शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रवेश अर्ज केला. बी. एससी. मध्ये विद्यापीठामध्ये प्रथम आल्यामुळे सरांना एम.एससी. साठी प्रथम क्रमांकाचा प्रवेश मिळाला. सरांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू झाले. सर विद्यापीठात आल्यावरही महानवर सरांचे त्यांच्यावरील आणि अभ्यासावरील लक्ष कमी झाले नव्हते. पत्राद्वारे कायम मार्गदर्शन आणि चौकशी ठरलेली असायची. दाजीही अभ्यासासाठी किमान आवश्यक खर्च म्हणून दरमहा पाचशे रुपये पाठवत असत.  या शिक्षण कालखंडात सरांच्या जीवनात अत्यंत गरजेची स्थित्यंतरे आली. एम.एससी. दरम्यान सर विद्यापीठ वसतिगृहात राहत असत. प्रथम वर्षी त्यांना इंग्रजीचे डॉ. विवेकानंद रणखांबे हे मित्र लाभले. दोघेही वसतिगृहाच्या खोलीत एकत्र राहत असत. विवेकानंद रणखांबे यांचा स्वभाव अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध होता. वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारा आदर, नम्रता, सुशील स्वभाव आणि शांत वृत्ती हे गुण केशव सरांनी त्यांच्याकडून आत्मसात केले. नातेसंबंध जपण्याची कला सरांना याच मित्राकडून शिकायला मिळाली. द्वितीय वर्षात असताना त्यांचे लोणंद येथील गणिताचे जुनिअर मित्र श्री. अरविंद तावरे हे रूम पार्टनर म्हणून लाभले. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, परिपूर्णता तसेच सभ्य वर्तन या सर्वांचा प्रभाव सरांवर होत होता. माणसाला आयुष्यात भेटलेली माणसेच घडवत असतात, खोल परिणाम करत असतात हेच खरं!

          एम.एससी. च्या परीक्षेत सन १९९४ साली सरांनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी पुरस्कार' मिळवला. जिद्द, चिकाटी आणि चौकस बुध्दीने ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. एम.एससी. झाल्यानंतर काही काळ सर गावी राहिले. सरांना नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. विद्यापीठामधील प्रपाठक प्रा. ए. व्ही. राव सर वारंवार पत्र पाठवून सरांना संशोधनासाठी येण्यास आग्रह करत असत. त्यानुसार संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे सरांनी नोकरीशोध थांबवून प्रा. ए. व्ही. राव सरांकडे ऑक्टोबर १९९४ साली युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये डॉ. प्रताप वाघ सरांच्या सहकार्यातून प्रोजेक्ट फेलो म्हणून काम सुरू केले. त्यांना दरमहा अठराशे रुपये एवढे मानधन मिळत असे. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने या ठिकाणी काम केल्यानंतर सुध्दा काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी. करू शकले नाहीत. दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ साली सरांच्या वडिलांचे निधन झाले. सर त्यांच्या सेवेत कायम व्हावेत आणि लवकर स्थावर व्हावेत अशी वडिलांची नेहमी इच्छा होती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याची इच्छा वडिलांनी सरांकडे बोलून दाखविली होती, ती सुद्धा अपुरी राहिली. आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन सुध्दा सरांना करता आले नाही. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी असताना वडिलांचा मोठा आधार संपला होता. सरांना मानसिक आणि भावनिक आधाराची गरज होती. अशा वेळी त्यांचे मित्र डॉ. प्रताप वाघ यांनी आलेल्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सरांना धीर दिला. वर्षभर त्यांचा आर्थिक बोजाही वाघ सरांनी उचलला. मनमिळावूपणा, पडेल ते कष्ट करण्याची तयारी, सुस्वभाव हे वाघ सरांचे गुण त्यांना मिळाले आणि ते त्यांनी आचरणात सुध्दा आणले. आयुष्य नेहमी माणसासाठी ज्ञानदानाचं कार्य करत असतं, माणसानं मात्र विद्यार्थी होऊन ते अवगत केलं पाहिजे!

          सरांना आता नोकरीची नितांत गरज भासू लागली होती. पण वस्तुस्थितीच अशी होती की नाईलाजास्तव सर्व काही बघत राहावं लागत होतं. पुढे जून १९९६ साली सर डॉ. सी.एच. भोसले (प्रपाठक, भौतिकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने रुजू झाले. संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम स्टोरेज घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. संशोधन करत असताना भोसले सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल परिणाम सरांवर झाला. त्यांचे अनेक गुरुमंत्र सरांना शिकायला मिळाले. ज्ञानाबरोबरच तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनात पाहिजे ते ध्येय साकार करू शकता आणि कठीण पेचप्रसंगामध्ये मार्ग काढू शकता अशी शिकवण भोसले सरांकडून मिळाली. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे धडे सरांकडून मिळाले.  भोसले सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने त्यांची शिकवण्याची हातोटी आत्मसात करता आली. हे करत असतानाच ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून १९५० रुपये मानधनावर दोन वर्ष आणि सिनियर रिसर्च फेलो म्हणून ३२५० रुपये मानधनावर एक वर्ष संशोधन कार्य केले आणि त्यानंतर त्यांचा उज्वल भविष्यकाळ त्यांना समोर दिसू लागला! प्रचंड कष्ट आणि जीव ओतून केलेल्या संशोधनामुळे जुलै १९९९ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर सरांची निवड झाली. सर्व पराकाष्टांचे फळ मिळाले! सर या पदावर राहून अध्यापनाचे कार्य अत्यंत तळमळीने आणि मन लावून करत असत. कितीही संकटे आली तरी, त्रास झाला तरीही प्रयत्न न सोडता त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरच यश प्राप्त होते अशी सरांच्या कार्य करण्याची शैली होती.

          गत जीवनात लाभलेले प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, महानवर सर आणि डॉ. भोसले सर या सर्वांच्या ज्ञानाचा, आत्मविश्वासाचा आणि मेहनतीचा परिपाक म्हणजे सरांचे एम.एससी. च्या वर्गांना होत असलेले दर्जेदार आणि ज्ञानात्मक अध्यापन! १९९९ सालापासून ते आज तागायात सरांचे अध्यापन लाभलेला एकही विद्यार्थी असा सापडणार नाही की ज्याची अध्ययनाची भूक भागली नसेल. आजही विद्यार्थी सरांच्या शिकवण्याच्या पद्धतींची, विवेचनाची आणि मिळालेल्या ज्ञानाची आठवण काढत असतात. सरांचे क्लासिकल मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि सॉलिड स्टेट फिजिक्स चे लेक्चर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. शिकवताना सर अगदी निष्ठेने आणि देहभान विसरून शिकवितात आणि मुले मुग्ध होऊन जातात. मुलांच्यात आत्मविश्वास वाढावा, विषयज्ञान वाढावे यासाठी विभागात सेमिनार चे आयोजन होत असते. तिथे प्रश्नोत्तराचा तास चालतो. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुलांची त्रेधातिरपीट उडते. उद्देश हाच की, मुलांनी सखोल अभ्यास करावा, वरवर किंवा परीक्षेसाठी अभ्यास नको! निश्चयी स्वभाव, विषयाचे सखोल ज्ञान, समजून सांगण्याची कला, रंजकता, चिकित्सक वृत्ती, विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, अवधान खेचक क्षमता, बुद्धीचातुर्य, कमालीची कल्पकता आणि नवनिर्माण क्षमता, प्रसंगी विनोदी वृत्ती आणि कठोरता या साऱ्यांनी बनलेले आदर्श प्राध्यापक म्हणजे राजपुरे सर! भौतिकशास्त्र कसे शिकवावे याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे सरांची लेक्चर्स. मुलांनी स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत, त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत, रेडिमेड नोट्स वापरण्याची सवय सरांना अमान्य आहे, सतत सराव केला पाहिजे, अव्वल राहिले पाहिजे, कितीही त्रास झाला तरी विद्यार्थ्यांनी यशाचा शॉर्टकट शोधू नये अशी परखड मते सरांची आहेत. विद्यार्थी विद्या मिळवण्याच्या हेतूने आलेले असतात त्यांना तुम्ही परीक्षार्थी बनवू नका, त्यांना रोबोट्स, कारकून, पंगू बनवू नका, स्पून फिडिंग करू नका, त्यांच्यात तुम्ही स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वाढवा या मंत्राचे बाळकडू शिक्षक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर नेहमीच देत असतात. 'कल करे सो आज कर, आज करे सो अब !' या काव्यपंक्तीनुसार विद्यार्थ्यांना काम सांगितल्यानंतर ठराविक वेळेनंतर सर कामाचा पाठपुरावा करतात, ते काम गुणवत्तापूर्वक पद्धतीने करून घेतात. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी त्रस्त होतात पण यामुळे  विद्यार्थ्यांना त्वरीत अचूकपणे कामे करण्याची सवय लागते. ही पद्धत सरांची कार्यशैली रेखांकित करते!

          सरांच्या 'सेप्टम विद्युत घट' यावरील शोध प्रबांधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० मध्ये बहाल केली. या संशोधनासाठी सरांना मार्गदर्शक म्हणून डॉ. सी.एच.भोसले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सप्टेंबर २००० मध्ये ऑस्ट्रियातील मायकल न्यूमन स्पेलार्ट या जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञाने सरांना पुढील संशोधनासाठी फ्रान्सला निमंत्रित केले होते. पण पासपोर्ट वेळेवर न मिळाल्याने सरांना ही सुवर्ण संधीच सोनं करता आल नाही. कदाचित याच भूमीची सेवा सरांच्या हातून घडणार होती ! पुढे महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या भौतिकीय विज्ञान विषयातील अधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एसइटी) - सेट परीक्षा सर पास झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. भौतिकशास्त्रातून सेट पात्रता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जीचा निकाल तेव्हा १ टक्क्यांहून कमी लागत असे. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यातील अनुभवाने आलेल्या प्रतिभेमुळे व त्यांच्यात निर्माण झालेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि निश्चयी स्वभावामुळे ! 

          परिस्थितीला नमवत जिद्दीने अध्यापनात आणि संशोधनात कार्य करणाऱ्या सरांच्या व्यक्तित्वाची छाप विद्यापीठ प्रशासनावर पडली होती. त्याचाच परिपाक म्हणजे केवळ गुणवत्तेच्या जोरावर सर २०११ साली भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक झाले. गत दशकापासून अध्यापन आणि संशोधनाचे कार्य अत्यंत तळमळीने केले असल्यामुळे २०१४ साली सरांची सरळ सेवा भरतीद्वारे प्राध्यापक पदी नियुक्ती झाली. सध्या सर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र विषयात सर्वात अव्वल अशा प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. सरांची शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय अशी ख्याती आहे. 


          महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स ने ३० ऑक्टोबर २०१५ रोजी सरांना कायमचे सदस्यत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. आत्तापर्यंत सरांचे एकूण २०० शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये दोन समीक्षा शोध निबंधांचा देखील समावेश आहे. त्यांच्या 'पाणी शुद्धीकरणा'  संबंधित वैशिष्ठ्यपूर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. सोलर सेल्स, थिन फिल्म्स, फोटोकॅटॅलीसीस ऑफ वॉटर हे सरांच्या संशोधनाचे विषय आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या सहा विद्यार्थी त्यांच्याकडून पी.एच.डी. साठी मार्गदर्शन घेत आहेत. सदरील विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पुढे दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदी काम करत आहेत. सरांनी केंद्र सरकारच्या निधीतील पाच संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा योग्य विनियोग करून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अद्ययावत संशोधन सुविधांची निर्मिती करून विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधेमध्ये भर घालून सुसूत्रता आणली आहे. स्वतः बरोबरच इतरांचा सुध्दा विकास करण्यात असलेली  सरांची आवड त्यांच्या अविरत कार्यातून प्रतीत होते.

          विद्यापीठाचे 'गोल्ड मेडलिस्ट' राहिलेले सर सध्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधनातून शिवाजी विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यात मोठे प्रयत्न करताना दिसून येतात. सरांचा संशोधनातील एच. इंडेक्स ५० आहे. तर सरांच्या संशोधनास ७१७४ सायटेशन्स मिळाली आहेत. यावरून सरांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता जाणकारांच्या सहज लक्षात येईल. त्यांचे कर्तृत्व, क्षमता आणि शैक्षणिक यश या सर्वांचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि एसएआयएफ या केंद्रीय सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. अलीकडेच त्यांची विभागप्रमुख म्हणून चार वर्षांची मातृसंस्थेची सेवा झाली. सर बऱ्याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पी.एच.डी. साठी चे परिक्षक आहेत. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या नेमणूका करण्यासाठी कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध महाविद्यालयांच्याही अभ्यासमंडळांचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या लोकल इन्कवायरी कमिटी (एल.आय.सी.) तसेच टेक्निकल कमिटी अश्या विविध समित्यांवर सरांच्या कार्याची छाप आहे. एवढा प्रचंड कामाचा पसारा सांभाळत असताना सरांना याचे गमक विचारले असता सर सांगतात की, " तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, शिस्तबद्धपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही सुद्धा मोठमोठी कामे करू शकता. कोणत्याही कामात उत्कृष्ठपणा आणता आली पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला मिळाले पाहिजे !"

          अध्यापन आणि संशोधन याबरोबरच सरांनी सामाजिक कार्याचीदेखील आवड जोपासली आहे. सामाजिक आपुलकी आणि जिव्हाळा जपत ते समाजासाठी उपयोगी कार्ये करत असतात.  मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ, अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. हि संस्था आवश्यक कौशल्य आणि आर्थिक मदत देऊन गावाच्या विकासासाठी समर्पित आहे. शहीद परिवारासाठी कार्य करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. 

          आपल्याला जीवनात आणि समाजकार्यात मिळालेल्या यशात बऱ्याच व्यक्तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे असे ते मानतात. त्यांचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकता आणि नम्रता ही त्याच्या वडिलांची भेट आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचे आणि कष्टमय आशीर्वादांचे मोठे योगदान आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, हिय्या दाखविण्याची कला आणि हिंमत न हारण्याचा गुण सरांना आईकडूनच मिळाला. सरांना बी.एससी. दरम्यान आणि त्यांनतर आपल्या मुलापलीकडे माया लावणारी आणि संगोपण करणारी त्यांची बहीण फुलावती (आक्का) म्हणजे त्यांची दुसरी आईच ! त्यांचे वडीलबंधू श्री. बाळासाहेब राजपुरे (दादा) हे उच्च विद्याविभूषित असूनही सुरुवातीपासूनच गावाकडील कुटुंबाची तसेच शेतीची सर्व जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत त्यामुळे सरांना हे सर्व शक्य झाले. आपल्या यशात मोठ्या बंधूंचा मोठा वाटा आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांचे भाचे राजू शिर्के यांचे त्यांच्याविषयीचे बंधुतुल्य स्नेह आणि सर्व गोष्टींत सहकार्य, पाठिंबा आणि आधार हे ते विसरत नाहीत. सरांना त्यांचे मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, रवींद्र अनपट, अजित पिसाळ, शिवाजी खंडागळे या सर्वांचे अनमोल सहकार्य आणि प्रोत्साहन शिक्षणादरम्यान मिळाले. त्यांचे ते शतशः ऋणी आहेत. यशाच्या शिखरावर असताना हुरळून न जाता आपल्या मातीत पाय रोवून नाती जपण्याची कला सरांकडून शिकावी! 

          सर पहिल्यापासूनच 'डिटरमिनिस्टिक' म्हणजे निश्चयी स्वभावाचे असून ते हाती घेतलेले काम गुणवत्तापूर्वकरितीने पूर्ण झाल्याशिवाय हातावेगळे करत नाहीत. त्यांच्या राहण्यात साधेपणा असून त्यांनी 'हाय प्रोफाईल स्कॉलर लाईफ' जगली आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर हवे तसे वागणे सरांना मान्य नाही. माणसाने आपली भूतकाळातील परिस्थिती आठवून जमिनीवरच राहायला हवे आणि आनंदात जीवन जगायला हवे असे त्यांना वाटते. त्यांच्या ठायी असणारा कमालीचा नम्रपणा, हुशारी, शिस्तबद्धपणा, तीव्र इच्छाशक्ती, समर्पणवृत्ती आणि मायाळू स्वभाव त्यांच्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक माणसाला अनुभवण्यास मिळतो. सरांचा स्वभाव रागीट आणि शीघ्रकोपी जरी असला तरी त्यांचे विद्यार्थी वर्तमानात भेटल्यावर आवर्जून सांगतात की सरांच्या शिस्तीमुळे आज आम्ही यशस्वी जीवन जगत आहोत ! एकवीस वर्षांच्या अध्यापनात सरांनी अनेक यशस्वी आणि परिपूर्ण विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्याकडे पाहून त्याचे आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विश्लेषण करण्याची दुर्लभ क्षमता सरांना लाभली आहे. नियमित व्यायाम आणि खेळ यामुळे सर नेहमी निरोगी असतात. एक चैतन्यदायी, उर्जादायी आणि प्रफुल्ल अध्यापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजपुरे सर !  एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मुलांना आणि विद्यापीठास लाभले याबाबत विद्यार्थ्यांमधून नेहमीच प्रतिक्रिया येत असतात.


          सरांना मित्र जोडायचा छंद आहे. लहानपणी पासून ते आजतागायत सरांनी खूप मित्र मिळवले आहेत. फेसबुक, व्हाट्सऍप सारख्या समाजमाध्यमांवर सरांच्या मित्रांची संख्या पाहून कित्येक जणांची बोटे तोंडात जातात! सर मित्रांवर तेवढीच माया आणि प्रेम करतात. एस.एस.सी., एच.एस.सी., बी.एस.सी., आणि एम.एस.सी. चे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी आजही सरांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांचे स्नेहमेळावे घेऊन हितगुजाच्या गोष्टी, सुख-दुःख यांची देवाणघेवाण केली जाते. यातही सरांचा पुढाकार असतो. हे काम तोच व्यक्ती करू शकतो ज्याची नाळ गावाशी आणि माणसांशी जोडलेली आहे. या कृतीतून सरांचे मित्रप्रेम किती अफाट आहे याची अनुभूती येते. नेहमीच वेगळ्या पद्धतीने जगायला सरांना आवडते. आपले आयुष्य आपल्या तत्वांनी जगत असताना ते आनंदी होऊन जगायला आवडते. आपले आयुष्य सुंदर करायला आवडते !

          आपल्या गावातील तरुण पिढीला मार्गदर्शन करताना सर सांगतात की, तुम्हाला सुध्दा उच्च ध्येय गाठता येऊ शकेल, तुम्हालाही यशस्वी व्यक्तिमत्व होता येईल. तुम्हाला फक्त एकच करावं लागेल - अगदी जिद्दीनं, प्रामाणिकपणे विद्याग्रहन करावं लागेल. घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनेक वेळा शाळेची फी सुध्दा भरणे शक्य नव्हते, चटणी, भाकरी आणि शिळे अन्न खावून दिवस ढकलले आणि हार न मानता उत्तुंग यश संपादन केले. आपल्या मुलाने शिकून खूप मोठं नाव कमवावे अशी वडिलांची इच्छा सरांनी पूर्ण केली. त्यांच्या प्रवासावरून हे समजते की कोणत्या विद्यार्थ्यांत कोणता स्पार्क असेल हे सांगता येत नाही. असा स्पार्क शोधणे आणि त्याला योग्य दिशा देणे हे शिक्षक, शाळा आणि पालकांचे आद्य कर्तव्य आहे. कुठलेही यश मिळवण्याचा मार्ग खडतरच असतो. सर्वस्व ओतून आणि प्रयत्नवादी राहून तसेच घाई, गडबड न करता, त्वरित फळाची अपेक्षा न करता सतत कार्यतत्पर राहून आपणास दिवसागणिक प्रगती करावी लागते असा सरांचा ठाम विश्वास आहे. आयुष्यात कौतुकाबरोबरच थोडी शिस्त पण हवी अशी त्यांची धारणा आहे.  आपण जेव्हा शिक्षकी पेशा स्वीकारतो तेव्हापासूनच आपण कठोर परिश्रमांचा वसा घेतलेला असतो हे डॉ. राजपुरे सर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासामधून आपणास उमगले असेलच! 

          खिडकीतला बोन्साय बनून रहाणं त्यांना कधी जमलेचं नाही. उन्हा -तान्हात तावून सुलाखून ज्याप्रमाणे गुलमोहर बहरतो तसेच जीवनात तावून सुलाखून गुलमोहराप्रमाणे त्यांना बहरायला आवडले आणि ते सत्यात ही उतरवले. ज्याप्रमाणे- धावणाऱ्यांसाठी वाटा नसून वाटांसाठी धावणे असते गरुडझेप घेणारांसाठी आभाळाचे ओझे नसते, तसे सरांनी ज्या वाटेवर पाऊल ठेवले ती पायवाट न ठेवता तिचे हमरस्त्यामध्येच रूपांतर केले. त्यांना कधीही कोणत्याही आव्हानांचे ओझे वाटलेचं नाही आणि त्यासाठी असणारा आत्मविश्वास त्यांच्याकडे ओतप्रोत होता. जिद्द पेरली की यश उगवते तसा त्यांचा एका छोट्याशा वाडीतून केसू येसू पासून सुरु झालेला जीवनप्रवास शिवाजी विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील विभागप्रमुख या उच्च स्थानावर पोहोचून यशवंत डॉ. केशव पर्यंत येऊन ठेपलेला आपल्याला पहायला मिळतो.

          सर आपल्या अध्यापनाचा आणि संशोधनाचा आलेख उंचावत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना! आपणास निरोगी, आनंदी, चैतन्यदायी आणि सुखकारक आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी सदिच्छा ! सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

शब्दांकन
अनिकेत दत्तात्रय भोसले 
मोबाईल: ८९७५७११०८० 

Friday, May 8, 2020

शिक्षक : एक संस्कारक्षम काटेरी बाभळ !


त्याची सुरुवात झाली ती पावसाळ्यात. काही महिन्यांचा पावसाळा. उष्ण कटिबंधीय पानझडी चे पठार. त्याच्या हृदयाला हाक आली आणि चालू झाला प्रवास. त्याला जात, गोत्र, धर्म, प्रदेश, सीमा, मित्र, आई, बाबा, सोयी, सुविधा, आरक्षण, अनुकंपा, वशिला हे काहीच माहिती नाही त्याला फक्त उगवायची हाक आली आणि मानला त्यानं आदेश त्याच्या तत्वाचा. मातीच्या पोटातून वर पाहिले तेव्हा पाऊस होता. हर्षला, चेकळला, बहरला. असचं असतं आयुष्य नेहमी, असे समजण्याची चूक करायला तो मूर्ख नाही !  

त्याचा पहिला उन्हाळा आला. वीत भर मातीच्या वर,  वीत भर मातीच्या खाली. ना गर्व, प्रतिष्ठा, मान, सन्मान, हेवे-दावे. एकटाच. उन्ह, दख्खन च उन्ह ! रक्तात चिवटपणा, जिद्द,  दोन्हीकडून वर सरण्याची. उष्ण झळया, कोरडी माती, ना पाणी ना गारवा. एकटा रणरणत्या उन्हात. मित्र नाही, कुटुंब नाही, सगे नाही आणि सोयरे नाही. चार दोन जगलेली पानं. या तापट सत्यानं मान जळून वाकली. झुकली, मोडली, माती पुन्हा दिसायला लागली. पण हात तर जिवंत आहेत. जगले, तगले, झगडले, लढले, वाढले. पुन्हा मान उभी केली. पण आनंद नाही आता, आता जबाबदारी. मातीत आणि आकाशात जाण्याची. निर्दयी काळे पाषाण लागले खाली, असंख्य टकरा देऊन पाण्याचा व अन्नाचा कण आणि कण गोळा करून स्वतःमध्ये साठवून ठेवला. 

जसे क्षण, दिवस, ऋतू जाऊ लागले तो मोठा होऊ लागला. हसत, झुलत, रडत, खेळत. जाता कुठे येत नाही. पाय तर खोलात, आंधळे, तत्वांशी प्रामाणिक, बधिर, आकाश न पाहिलेले, स्थिर. वाढत राहिला. मोठा झाला. पाय खोल रोवलेले, पाण्याचा आणि अन्नाचा अंदाज घेणारे मित्रच जणू. अंगावर काटे. तीक्ष्ण, टोकदार, असंख्य, कडू. पानांचा आकार लहान, बारीक-सारीक, काटकसर करणारा. अंगावर जीर्ण झालेली पण कोणत्याही वाईट वादळात साथ देणारी काटेरी आणि जाड साल. रक्षक, विश्वासू, स्वओळख. नभात शिरलेले असंख्य हात. पसरलेले, उन्हाचे दान घेण्यासाठी. पक्षी आले. खूप, वेगवेगळे, रंगेबिरंगी, शांत, नखरेबाज, खोडकर, असंख्य. काटे दिले, पाने दिली. यांच्या जीवावर पक्ष्यांची घरे तयार झाली. पिढी वाढली. संरक्षण, संस्कार, परोपकार, काटकसर, शिस्त, धाडस, सत्य मिळाले. पाखरे उडून गेली. लांब पसरली, नभात, देशात, जगात, जीवनात. विसरली, काही नाही विसरली त्याला. तो शांतच आहे. त्याचे काटे टोचतात म्हणून त्याला हिनवणारे, त्याच्या काट्यांच्या शिस्तीवर घर बांधून, पिढी वाढवत गेले. 

तो शांत. अजून उन्हाळा, पावसाळा, एकटा, पाखरांची वाट पाहणारा, आसरा देणारा, सुख घेणारा, काटे अंगावर घेऊन वागणारा, टोचनारा. वय झाले, वादळ सुटले. पाय खंबीर, आसरा परदेशी, पाखरे गेलेली. पुन्हा एकटा. लढला, तगला, शेवटी तोल गेला, झुकला. झुकून दुसऱ्या पिढीला सावली दिली, आसरा दिला, अविरत. दिवस उजाडला. तप्त, उग्र, रुक्ष. डोळे उघडले, समोर धार, त्याने आयुष्यभर अस्मानाला दाखवलेली ! तिचा पगडा भारी. मन सुन्न. आली, घुसली काळजात, आरपार, रक्त, पाय गळाले, दृष्टी गेली. देह पडला. मातीत. कार्य संपले नाही. देह दिला, कृतज्ञता केली. सार्थकी लागले जीवन. जाताना त्याला एकच सुख, माझी पाखरं किती उंच गेली. नभात, अंतराळात, यशोशिखरावर. जीवनाचा आनंद मिळाला ! 

संस्कारहिन, निकसपणे आणि भोगवादामधून भसभस वाढलेली प्रवृत्ती, कणाकणाने वाढलेल्या संस्कृतीचा काय मुकाबला करणार !

सुसंस्कारित मूल हाच सुदृढ समाजाचा पाया आहे.
संस्कारांचे काटेच जीवनाला वाचवू शकतात !


शब्दांकन :
प्रा. अनिकेत भोसले
८९७५७११०८०