Tuesday, May 3, 2022

तारुण्यातील मुले आणि स्वनियंत्रण

तारुण्यातील मुले आणि स्वनियंत्रण


          सध्या जग झपाट्याने बदलत आहे. समाजात वागण्याच्या आणि जगण्याच्या परिभाषा झटपट बदलताना दिसत आहेत. समाज बदलाच्या वेगाबरोबर प्रत्येकाने आपली गती सुद्धा बदलायची आहे याबाबत दुमत नाही परंतु हे बदल करत असताना स्वत:च्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचे भान मात्र प्रत्येक तरुणाला असायला हवे. ऐन तारुण्यात आणि उमेदित अगदी नगण्य वाटणाऱ्या चुकांमुळे तरुणांना आपले प्राण गमवावे लागणे याची असंख्य उदाहरणे रोज प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर आपण पाहत असतो. दुर्दैवी घटना घडणे, त्यांवर शोक करणे, श्रद्धांजली वाहणे, दुःख करत बसणे, शेवटी पश्चाताप होऊन घटनांचा विसर पडणे आणि पुनश्च: अश्या घटना घडणे हा नित्यक्रम चालूच आहे. याचे कारण म्हणजे अश्या घटनांमागील काही चुका, त्यांची कारणे समजावून न घेणे आणि वेळोवेळी आवश्यक असणारे स्वनियंत्रण मोहाच्या, दुःखाच्या आणि आनंदाच्या आवेगात विसरून जाणे. सदर लेख अनेक घटनांचे निरीक्षण आणि त्यांवर चिंतन करून माझ्या व्यक्तिगत अनुभवांवरून लिहिलेला आहे. 

          घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेस एक कारण असते. विनाकारण जगातील कोणतीही गोष्ट घडत नाही हा विज्ञानाचा नियम आहे. घडत जाणाऱ्या गोष्टी घडायच्याच होत्या, ते आपल्या हातात नाही; जे घडायचे आहे ते कसेही घडणारच अश्या टिपण्या करून आपण त्यांच्या कारणांपासून पळवाटा शोधू लागतो आणि पुन्हा अश्या घटना घडतात केवळ आणि केवळ आपल्या दुर्लक्षामुळेच ! ह्या घटनांना पायबंद घालणे सध्या समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे. उमेदीचे मनुष्यबळ जर हकनाक वाया जात असेल तर ते प्रामुख्याने कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान आहे हे मान्य करावे लागेल. यासाठी समाज प्रबोधन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी तरुण- तरुणींनी, पालकांनी आणि समाजातील जबाबदार व्यक्तींनी आता सतर्क व्हायलाच हवे कारण दुर्दैवी घटना कोणाच्या घरात कधी घडेल हे सांगता येत नाही.

कोणत्या गोष्टी जास्त धोकादायक आहेत?

१) भौतिक गोष्टी :-

          आपणास उपयोगी असणाऱ्या काही भौतिक गोष्टीं किंवा कृतींचा अतिवापर तसेच चुकीचा वापर झाल्यामुळे जीवितास हानी पोहोचते. यांमध्ये वाहने (दुचाकी, चारचाकी इ.), मोबाईल, अग्नी संबंधित कामे, पाणी आणि पाण्यातील पोहणे (नदी, कॅनॉल, विहिरी, इ.), कीटकनाशके(शेतीची रसायने इ.), अनोळखी नैसर्गिक जागा अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. या गोष्टींना पालकांनी, तरुण - तरुणींनी व अजाणत्या मुलांनी हलक्यात घेऊ नये. यांबाबत सतत सतर्क राहायला हवे. कारण या गोष्टी जेवढ्या उपयोगी आहेत तेवढ्याच प्रमाणात अतिसंवेदनशील आणि धोकादायक आहेत. 

          प्रत्येक पालक आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांचे प्राथमिक कर्तव्य हे आहे की वर उल्लेख केलेल्या गोष्टींना अनुसरून, त्यांनी आपली मुले कुठे आहेत आणि काय करत आहेत याबाबत सतर्क राहावे. सतर्क रहायलाच हवे कारण नंतर सतर्कता येते पण पोटचे मूल माघारी येऊ शकत नाही. मुले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती जसे की तिथे काही धोका आहे का, आजूबाजूला माणसे आहेत का याची काळजी घ्यावी. या गोष्टींचा विचार करून सहसा मुलांना एकटे सोडू नये; जरी तो नवतरुण असेल तरी. आपली मुले आणि नवतरुण यांच्यावर अतीआत्मविश्वास दाखवू नये. असे केल्याने मुलांना धोकादायक गोष्टींचे भान व भय राहत नाही आणि घटकेत अघटीत घडू शकते. आपल्या पालकांचा आपणास सर्व गोष्टींत होकार आहे असे समजून मुले त्वेषाने आयुष्याचा आनंद घेण्यात गुंग होतात यासाठी मुलांवर पालकांची थोडी तरी जरब असणे गरजेचे आहे. काही पालक प्रेमापोटी मुलांना इतकी मोकळीक देतात तेव्हा एक वेळ अशी येते की मूले किंवा तरुण पालकांचे काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीत जाऊन पोहोचतात, ते स्वत:ला परिपूर्ण समजण्याची चूक करतात. हे घडूच नये यासाठी मुलांना वेळोवेळी कडक शासन करणे, कान उघाडणी करणे आणि बरे - वाईट समजावून सांगणे हे आपले कर्तव्य मानून लहान वयापासूनच शिस्तीचे प्रशिक्षण चालू करावे.

          आपल्या मुलांना इतरांच्या जबाबदारीवर कधीच सोडू नये. आपले पाल्य ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. अघटीत घडल्यास कोणीही त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही याचा विचार करावा. दिवसाचा निश्चित असा वेळ मुले, तरुण आणि तरुणींच्या दैनंदिन कामे आणि हालचालींसाठी राखून ठेवावा. नेहमी चौकशी करावी. सूचना द्याव्या. फायदे - तोटे आणि धोके वारंवार सांगावेत. वरील गोष्टींचा कधीही कंटाळा करू नये कारण या जीवनावश्यक बाबी आहेत. पालकांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवू नये कारण नंतर पश्र्चाताप करून काहीही फायदा होत नाही वेळ निघून गेलेली असते. त्याआधीच सावध झालेले बरे.

२) भावनिक गोष्टी :-

          मानवी जीवितास हानिकारक असणाऱ्या काही भावनिक गोष्टी समजावून घेऊ. दुःखावेग, आत्महत्या, मोह, प्रसिद्धीचा लोभ आणि मुक्त विलासी जीवनाची आवड या आणि इतर बरेच मनातील अनेक गुंतागुंतीच्या विचारांनी बनलेल्या भावनिक गोष्टी आहेत. आपली तरुण मूले भावनिक आणि संवेदनशील असावीत पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण संवाद ठेवता आला पाहिजे. पालक आणि पाल्य यांच्यात मोठी विचारदरी नसावी.  त्यांनी प्रत्येक गोष्टीची आणि आपल्या विचारांची पालकांसोबत चर्चा करायलाच हवी. मनातील लाजेची भावना आणि न्यूनगंड सोडून द्यायला हवा. असे न झाल्यास मूले वाईट मार्गांतून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात की जे त्यांच्या आयुष्यासाठी धोकादायक असू शकते. मूले किंवा तरुण त्यांच्या समवयस्क मित्रांवर लगेच विश्वास ठेवतात. त्यांना ते जवळचे वाटतात आणि आपण करत असलेली कोणतीही कृती योग्यच आहे असे स्वतःचे मत बनवतात परिणामी अनुभवाच्या अभावी प्राणघातक संकटाना सामोरे जातात. त्यामुळे मुलांबरोबर पालकांचा भावनिक मुक्तसंवाद व्हायलाच हवा. तरुणांना अतिशय हळवे आणि अती कठोर सुद्धा बनवू नये. त्यांना स्वत:च्या भावना आणि स्वतःचे विचार यांवर नियंत्रण ठेवायला शिकवावे. त्यांना विचार करायला भाग पाडावे.

          आपणास मिळालेल्या स्वातंत्र्याचा मूले आणि तरुण -तरुणी पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणत्याही गोष्टीपासून आनंद, मजा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी टोकाला जाण्याचा विचार करत असतात. या गोष्टींना विरोध नाही पण हे करत असताना तरुणांनी आपल्या जीवाची काळजी केली पाहिजे. प्रसंगावधान राखले पाहिजे. आपण धोक्याची सीमा ओलांडत तर नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये अडकु शकतो, करत असलेल्या गोष्टीमुळे काय वाईट परिणाम होऊ शकतात याच्यावर आधी विचार करावा तदनंतर कृती करावी. आपले भविष्य आणि कुटुंबातील व्यक्ती यांचे पुढे काय होईल याचा एकदा विचार करावा. भावना सर्वांनाच असतात पण आयुष्य त्याचेच सफल होते ज्याने आपल्या भावना स्वतःच्या नियंत्रणात ठेवल्या आहेत. शेवटी कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात झाली की तिचा अंत निश्चित असतो. त्यासाठी स्वनियंत्रण हवे.

काय आहे स्वनियंत्रण ?

          स्वनियंत्रण म्हणजे खूप अवघड संकल्पना नाही. "स्वनियंत्रण म्हणजे कोणतीही गोष्ट करताना वेळेचे, काळाचे, परिणामांचे भान ठेवून विचारपूर्वक केलेली कृती." समजा एखाद्या तरुणाला खूप दुःख झालेले असेल तर त्याने आवेगात पावले उचलू नयेत. थोडा वेळ जावू द्यावा. कारण आणि परिणामांचा विचार जरूर करावा. वर्तमान स्थितीत आपणावर कोणती जबाबदारी आहे याचे भान ठेवावे आणि योग्य ते मानसिक संतुलन राखावे. यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

          तरुण वयात मुलांमधे प्रचंड उर्मी आणि शक्ती असते. रसरसत असणारी ही शक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते यात अनैसर्गिक असे काहीच नाही. परंतु या शक्तीला विवेकाने म्हणजे काळजीपूर्वक हाताळावे लागते. स्वतःला नियंत्रणात ठेवावे लागते. नाहीतर हीच शक्ती नियंत्रणाबाहेर गेली की घात करते याउलट तिच्यावर नियंत्रण असेल तर प्रगती साधते. संयम अंगी असेल तर हे साध्य होईल. उतावीळ मुलांना किंवा तरूणांना आयुष्य दगा देऊ शकते.

अजाणत्या आणि तरुण मुलामुलींसाठी काही आचरण मुद्दे :-

१) आपणास अजून खूप जगायचे आहे. कुटुंबाचे आपण आधारस्तंभ आहोत ही भावना असावी. आपण करत असलेली गोष्ट अंतिम नाही हे समजून घ्यावे.

२) निसर्ग माणसाचा फालतू आत्मविश्वास कधीही सहन करत नाही. भावनेच्या भरात कोणावरही अगदी स्वतःवर सुद्धा अतीआत्मविश्वास ठेवू नये. 

३) आपल्या कमतरता स्वतःला आणि पालकांना वेळोवेळी माहिती असाव्यात.

४) वडीलधारे, पालक आणि शिक्षक यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या योग्यच असतात. त्यांना तुमच्यापेक्षा आयुष्याचा जास्त अनुभव आहे. ते अनेक बऱ्या- वाईट घटनांचे साक्षीदार असतात. त्यांच्या शब्दांना डावलून आपलेच खरे करू नये. भविष्यात तीव्र पश्चाताप होतो.

५) अनोळख्या नैसर्गिक जागा किंवा अशी स्थळे ज्याचा आपल्याला अंदाज नाही तिथे मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. एक चूक आत्मघातकी ठरू शकते.

६) अतिशय आनंदात, तीव्र दुःखात आणि मोहाच्या अवस्थेत असताना चांगले घडायचा एकच मार्ग असतो तो म्हणजे स्वत:ला शांत ठेवणे. ज्याला स्वनियंत्रण जमले त्याने धोक्याची पातळी कमी केली असे म्हणावे लागेल.

७) कमी अनुभवाने, हट्टाने, पालकांच्या विरोधात जाऊन केलेली प्रत्येक वाईट गोष्ट भविष्यात स्वत:ला आणि कुटुंबाला असह्य पश्चाताप आणि मानसिक दुःख देऊ शकते याची कितीतरी उदाहरणे आपणास समाजात पाहायला मिळतात.

८) सावधान!  आयुष्य एकच आहे, शरीर सुध्दा एकच आहे त्याची विचारपूर्वक काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपली एक चूक आपणास आपल्यांतून हिरावून नेऊ शकते. 

          आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपणास अक्षय्य सुख, आनंद आणि आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण, पालक आणि तरुण तरुणी यावर चिंतन करतील असा विश्वास बाळगून लेखन प्रपंच थांबवतो.


- लेखन 
प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
(किसन वीर महाविद्यालय, वाई)
8975711080



Tuesday, February 15, 2022

सस्नेह आभार

सस्नेह आभार !

आदरणीय,

          आज मी अनिकेत आपला मित्र, बंधू आयुष्याची २७ वर्षे पूर्ण करून २८ व्या नवीन वर्षात पदार्पण करत आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या अमूल्य वेळेतून काही क्षण माझ्यासाठी राखून ठेवले आणि मंगलमय शुभेच्छा दिल्या त्यांचा मनापासून स्वीकार करतो कारण शुभेच्छा देणाऱ्या स्नेही जणांच्या हृदयात प्रेम आणि आपुलकी असते आणि हे वात्सल्य आपणापासून मिळणे हेच आमचे भाग्य आहे असे आम्ही समझतो. 
          आपल्या शुभेच्छा मला आयुष्याच्या प्रत्येक दिवशी येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील आणि माझ्यावरती सुद्धा प्रेमळ जणांचे छत्र आहे याची आठवण करून देतील !

           पुनश्च धन्यवाद ! मनपूर्वक आभार !
                                                                                                                                               आपला अनिकेत ❤️
                                                         १८ फेब्रुवारी २०२२
                                        

Saturday, June 19, 2021

पितृदिन विशेष

पितृदिन निमित्ताने..! बाप..!
(२० जून २०२१) 

जून चा तिसरा रविवार म्हणजे पितृदिन साजरा करण्याचा दिवस. बापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. खरे म्हणजे बापाचा कोणताही दिवस नसतो, आपला प्रत्येक दिवस बापामुळेच असतो. भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व असून देवाला प्रत्येकापाशी जाता येत नाही म्हणून त्याने सर्वांना वात्सल्यरुपी आई दिली. आई आपल्या घराचे मांगल्य असते. असे असले तरी बाप घराचे अस्तित्व असतो. आईसह सर्व कुटुंबाचा आधारस्तंभ असतो तो बाप ! याच बापाविषयी काही शब्द....

बाप हा शब्द जरी दोन अक्षरी, साधा सोपा वाटत असला तरी बाप ही उपाधी मिरवण्यासाठी जन्म घेतलेल्या दिवसापासून ते मरणापर्यंतचे सर्व अनुभव पणाला लावावे लागतात. बाप हे व्यक्तिमत्व काय असते? बापाचे आणि कुटुंबाचे काय नाते असते? बाप असा का वागतो? बापाला कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात? बापाला असणाऱ्या भावना आपणास का दिसत नाहीत? बापाला कोण - कोणत्या यातना होतात? बाप म्हणजे नक्की काय? या सर्वांची उत्तरे फक्त एकच गोष्ट देऊ शकते. ती गोष्ट म्हणजे बापाचे स्थान ! बापाच्या स्थानी आलेल्या प्रत्येकाला या प्रकारच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळायला लागतात. एक-एक कोडे उलगडायला लागते. बापाचा अर्थ कळतो तो याच ठिकाणी !

कुटुंबाची संरक्षक भिंत - बाप !
आपले घर चालवताना बापाला कठोर भूमिका घ्याव्या लागतात. त्यामुळे त्याचे स्वरूप थोडे रागीट, शिस्तप्रिय आणि कठोर भासते. बापाने असे असायलाच हवे; कारण त्याच्यावर कुटुंबाच्या संरक्षणाची आणि पालन पोषणाची जबाबदारी असते. सर्वांची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य असते. हे कर्तव्य निभावत असताना त्याला बाहेरील अपप्रवृत्तींपासून आपल्या माणसांचे रक्षण करायचे असते. समाजातील विचार प्रवाह, लोकांच्या सवयी, आवडी - निवडी, भाषा, वागणूक आणि संस्कार याबाबतीत त्याला काटेकोर राहावे लागते. तसे न राहिल्यास मुलांच्या अंगी सद्गुण, संस्कार, परोपकाराची भावना, सत्य आणि सदाचार या गुणांची कमतरता राहते. ही कमी राहू नये म्हणून बाप कुटुंबाचे सर्व बाबतीत संरक्षण करीत असतो. कठोर वागत असतो. वरून जरी बाप कितीही कठोर वाटत असला तरी आतून प्रेमळच असतो ! आपले बाबा, पप्पा, वडील जेव्हा आपणास काही उपदेश करत असतात किंवा काही गोष्टी समजावून सांगत असतात तेव्हा त्या कधीही हलक्यात घेऊ नका. त्या एका वाक्यामागे त्यांच्या आयुष्याचा अनुभव असतो. ते आपल्या भल्यासाठीच आपणास वारंवार सांगत असतात. 

नवीन पिढीचा अनुभव ग्रंथ - बाप !
बापालाही बाप असतो. या बापाकडूनच जीवन योग्य रीतीने आणि आनंदाने जगण्याचा मंत्र मिळतो आणि हे चक्र असेच चालू राहते. आपल्या बापाच्या जागी आपण आल्यानंतर आपणास कौटुंबिक जबाबदाऱ्या समजायला लागतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना अतोनात कष्ट सोसावे लागतात. कष्ट सोसत असताना निवडलेले मार्ग कसे चांगले किंवा वाईट होते, घेतलेले निर्णय कितपत योग्य आणि अयोग्य ठरले. निर्णय घेताना चुका कशा होतात, झालेल्या चुका कश्या सुधाराव्यात, निर्णयात भावनेला किती स्थान असावे, वाईट प्रसंगातून बाहेर कसे पडायचे, कोणती शक्कल लढवावी, नातेसंबंध कसे जपावेत, व्यवहार कसे करावेत, व्यवहारात सावध कसे राहावे, अर्थार्जन आणि अर्थ बचत करण्याचे कानमंत्र कोणते, कोणत्या वयात आपण काय केले पाहिजे, चांगल्या सवयी कोणत्या, शरीर तंदुरुस्त ठेवून आजारावर मात कशी करावी, समाजातील आपली वागणूक कशी असावी, समाजात आपले स्थान मिळवून ते कसे टिकवायचे अश्या एक ना असंख्य गोष्टींची आणि प्रश्नांची उत्तरे आपल्या बापाला त्याच्या आयुष्यातून मिळालेली असतात आणि आपणास आपल्या बापाच्या आयुष्यातून रोज मिळत असतात. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. बाप या ग्रंथाचे दररोज एक - एक पान पालटले जात असते. अखेरीस संपूर्ण ग्रंथ आटोपतो. हा ग्रंथ आटोपण्या अगोदर त्यामधून जेवढे ज्ञान आणि अनुभव आपल्याला घेता येतील तेवढे घ्यावे. प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावे एवढीच अपेक्षा या ग्रंथाची असते.

वादळे झेलनारे जहाज- बाप !
आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग असे येतात की त्यांमधून बाहेर पडून पूर्ववत आयुष्य जगावे लागते. हे वाटते तेवढे सोपे नाही. यासाठी प्रचंड मानसिक शक्ती आणि सहनशीलता अंगी असावी लागते. बापाला असले प्रसंग पचवण्याची ताकत प्राप्त होते ती अगदी लहापणापासूनच. कितीही मोठा दुःखाचा प्रसंग आला तरी बाप संसाराची गाडी पटरीवरून खाली जावू देत नाही. लहानपणी ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवले, वाढवले, लाड केले ते आवडते आजी आणि आजोबा त्याला सोडून निघून जातात. येथूनच दुःखाची ओळख होत जाते. हळूहळू आप्त, जवळचे नातेवाईक, शेजारील व्यक्ती, घरातील व्यक्ती, आई, बाबा सोडून जातात. हे सर्व त्याला परिचित होऊन दुःख सोसण्याची ताकत त्याच्यामध्ये तयार होते. सर्व दुःख सोसून आपल्या कुटुंबासाठी पुन्हा नव्याने कामाला लागण्याची उमेद त्याला आपल्या परिवाराकडे पाहून येते.  आयुष्यभर या ना त्या मार्गाने दुःख सोसणाऱ्या बापाला आपल्या मुलांकडून थोड्या सुखाची , प्रेमाची आणि चांगल्या संवादाची अपेक्षा असते; पण हे सुध्दा मिळाले नाही तर बाप खचून जातो. त्याला आपलेपणा हवा असतो, जिव्हाळा हवा असतो आपल्या माणसांकडून !

निस्वार्थी , दानशूर - बाप !
बापाला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा त्याची मुले आणि परिवार त्याच्यामुळे आनंदात असतात. हसत, बागडत, सुखाने जगणाऱ्या आपल्या परिवाराशिवाय बापाला दुसरी कोणतीही गोष्ट मौल्यवान वाटत नाही. बाप असे समजतो की, ' मला कितीही कष्ट सोसावे लागले तरी सोसेन पण माझ्या पाखरांना काही कमी पडू देणार नाही. त्यांना आयुष्यातील हर एक गोष्ट देण्याचा प्रयत्न करेन. त्यांना आयुष्यातील दुःखापासून लांब ठेवेन.' यासाठी बाप आपले सर्वस्व अर्पण करत असतो. आयुष्यातील एक वेळ बापावर अशी येते की त्याला आपल्या परिवाराशिवाय दुसरे काही महत्त्वाचे असेल याची जाणीव राहत नाही. स्वतः अनेक त्रास सहन करून, स्वतःच्या मौजमजा बाजूला ठेवून, एक - एक रुपया वाचवून आपल्या मुलांचे भविष्य तयार करण्याचे स्वप्न पाहणारा देवदूत म्हणजे बाप असतो.

पोटच्या मुलीसाठी, जेव्हा ती जन्माला आली त्या दिवसापासून ते तिचे हात पिवळे करण्यापर्यंत सर्व बाबींचे स्वप्न पाहणारा, नियोजन करणारा आणि अमलात आणणारा बाप असतो !

मूल जन्माला आल्यानंतर अतोनात आनंद होणारा परंतु वरवर न दाखवणारा बाप असतो !

घरासाठी रोजच्या रोज मरणारा, रक्त आणि घाम एक करणारा, उन्हापावसाची तमा न बाळगता पोरांच्या भाकरीची सोय करणारा बाप असतो ! 

समाजाच्या तप्त आणि वास्तव नजरेच्या आगीपासून कुटुंबाला शाबूत ठेवणारा सेनापती म्हणजे बाप असतो !

वय झाल्यानंतर मुलांची उद्धट बोलणी ऐकूनही त्याच्याच आसमंतात शांत राहणारा, मुलांचे संसार व्यवस्थित चालावेत याची काळजी करणारा बाप असतो !

आयुष्यभराच्या कष्टाच्या मोबदल्यात फक्त प्रेम, जिव्हाळा, सुसंवाद आणि सुखाची अपेक्षा करणारा बाप असतो !

तुमच्या आमच्या अस्तित्वाचे कारण असणाऱ्या, देवाच्याही आधी ज्याला पुजायला हवे तो बाप असतो !

आपल्या बापाकडे एकदा प्रेमळ नजरेने पाहा; तुमच्या मदतीसाठी आलेला देव सापडेल !

सर्वांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


- शब्दांकन 
प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०




Thursday, May 13, 2021

शिरगांव रोहिडेश्वर वरील अनोखी शंभर मंदिरे !

  १०० मंदिर समूह

"सत्वर पाव गे मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला,
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,
एकलीच राहू दे मला,
भवानी आई, रोडगा वाहीन तुला"

शिरगांव ता.वाई निसर्गसंपदा, वनराई आणि प्राचीन वास्तु असणारे गाव. गावाच्या तिन्ही बाजूंनी वेढलेला डोंगर, शेतजमिनी आणि मानवी वस्त्या असा सर्व परिसर मिळून सरासरी बाराशे हेक्टर क्षेत्र आहे. गावात अनेक मंदिरे, प्राचीन वास्तू असून काही डोंगर भागात स्थापित आहेत. शिरगांवची पांडवकालीन लेणी, प्राचीन दगडी आणि सागवानामध्ये बांधलेली मंदिरे, पाण्याच्या मुख्य प्रपातातील दगडी गोमुख, तारणगिरी महाराज जिवंत समाधी मठ, भक्कम पिंपळ पार आणि शिरगांवच्या पूर्व सीमेवर असणाऱ्या डोंगरावरील अनोखी छोटी शंभर मंदिरे ! 
सदर लेख गावाच्या पूर्व सीमेवरील मुख्य डोंगराच्या माथ्यावर असणाऱ्या अनोख्या छोट्या शंभर मंदिरांना समर्पित !
  तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले शिरगांव

•जनमानस - 
इतिहास संशोधन करीत असताना संशोधकाच्या मार्गात येणारा प्रथम टप्पा म्हणजे आख्यायिका, जनमानस, लोकांच्या समजुती आणि समाजात प्रचलित झालेल्या गोष्टी. गावच्या सीमेवरील डोंगरावर असणाऱ्या शंभर मंदिरे यांच्या बाबतीतही अश्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. खूप उंचावर असणारा डोंगर माथा, प्रखर ऊन, रानटी जनावरे आणि अनामिक भीती यांमुळे ही मंदिरे एवढी प्रसिद्ध नसली तरी सध्या हयात असणाऱ्या ज्येष्ठ माणसांकडून थोडीफार माहिती समजते.
 पूर्वेकडील डोंगर(शिखरावर १०० मंदिर समूह)

  टुमदार शिरगांव, घाट आणि वाई - वाठार मार्ग

•मंदिरांचे स्थान -
शिरगांवच्या पूर्वेकडील मुख्य डोंगरावर ही मंदिरे आहेत. समुद्रसपाटीपासून सरासरी १३०० मीटर उंचीवर असणाऱ्या डोंगरमाथ्यावर शिरगांव आणि सर्कलवाडी ता. कोरेगांव यांच्या सीमेवर मंदिरांचा समुदाय आहे. सदरील डोंगराची उत्तर बाजू सोडली तर हा डोंगर चढण्यासाठी खूप कठीण आहे. याच डोंगरातून वाई - वाठार मार्गावरील शिरगांव घाट गेलेला आहे. डोंगरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग शिरगांव गावाकडून डोंगरांचे टप्पे ओलांडत मुख्य डोंगराच्या दक्षिण सुळकेवजा कड्यातून वर जातो. हा मार्ग अतिशय बिकट असून सरळ कडे आणि दोन्ही बाजूला खोल दऱ्या असल्यामुळे धोकादायक आहे. दुसरा मार्ग उत्तरेकडील घाट माथ्यावरून सर्कलवाडी गावाच्या हद्दीतून डोंगरावर आलेला आहे. ही मळलेली पायवाट असल्यामुळे धोकादायक नाही.
 
        रोहिडेश्र्वर माथा( मंदिर परिसर)

•परिसर -
मुख्य डोंगर हा माथ्यावर उत्तरेकडे त्रिकोणी आणि दक्षिणेकडे विंचू नांगी सारखा पसरलेला आहे. माथ्यावर सरासरी अठरा एकर क्षेत्र आहे. अनोखी शंभर मंदिरे डोंगराच्या माथ्यावर त्रिकोणी भागात असणाऱ्या गर्द झाडीमध्ये वसलेली आहेत. मंदिरे जमिनीवर ठेवलेल्या अवस्थेत असून याठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष, मोठे गवत, वेली, पाण्याचे डोह आणि रानटी जनावरांचा वावर आहे. डोंगर उंची जास्त असल्यामुळे तीव्र ऊन लागते त्यामुळे सहसा या भागात कोणी जात नाही. सदरील ठिकाण अतिशय उंचीवर असल्यामुळे प्राचीन काळी येथे गुरेचराई होत नव्हती. सध्या मळलेल्या वाटेने सोडून दिलेली जनावरे माथ्यावर येत असतात. 
          पांडव गुहा असलेला उत्तरेकडील डोंगर

•मंदिरांची रचना :- 
मंदिर म्हटले की ते एका ठराविक देवतेचे असते हे सर्वमान्य आहे. या मंदिरांतील मुख्य देवता श्री. रोडजाई देवी आहे. गावच्या उत्तरेकडील डोंगराला रोहिडा किंवा रोहिडेश्वर असे नाव आहे. त्यावरूनच तिथे असणाऱ्या देवीला रोहिडजाई आणि नंतर अपभ्रंश होऊन रोडजाई असे नामकरण करण्यात आले असावे. प्राचीन काळी येथे शंभर मंदिरे होती अशी माहिती गावातील ज्येष्ठ मंडळी देतात. हल्ली येथे होणाऱ्या चराई मुळे जनावरांच्या वावरामुळे काही मंदिरे फुटलेली आहेत. काही पूर्णपणे माती आणि चिखलात रुतून गेलेली आहेत. सध्या येथे साधारण ४० सुस्थितीत, २०-३० भग्न झालेली आणि उर्वरित अजून सापडलेली नाहीत किंवा नाहीशी झालेली आहेत.
   सुरक्षित केलेली सुस्थितीतील काही मंदिरे

एकच देवता रोडजाई देवीची ही मंदिरे आहेत. सर्व मंदिरांची रचना सारखी असून ती कमी जास्त आकाराची आहेत. सर्व मंदिरे भाजलेल्या मातीची आणि मजबूत बैठकीची आहेत. सदरहू मंदिरे कदाचित कुंभार वाड्यामध्ये बनवून, आगीमध्ये भाजून इथे आणली असावीत किंवा मग त्यांना डोंगर माथ्यावर तयार केलेले असावे. एक मंदिर रचना समजून घेण्यासाठी घेतले असता ते गोलाकार आणि घुमटाकार आहे. मंदिराची उंची दीड फूट, लांबी आणि रुंदी साधारण दोन - दोन फूट इतकी आहे. ही मंदिरे एखाद्या मोठ्या रांजनासारख्या आकारातील आहेत. यांच्या भिंतीची जाडी एक ते दीड इंच आहे. 
      मंदिराच्या भग्न भिंतीची जाडी


      नुकतेच गाळातून काढलेले मंदिर

मंदिराच्या दर्शनी भागात छोटेसे चौकोनी द्वार ठेवलेले आहे. बहिर्भागावर सूर्य, चंद्र, चांदण्या आणि त्रिशूळ या आकृत्या बनवलेल्या असून साधे नक्षीकाम आहे. मंदिराच्या माथ्यावर शिखर बसवलेले असून त्याउलट मंदिराचा खालचा भाग पूर्णपणे मोकळा आणि आतील भाग पोकळ आहे. मंदिरांच्या भिंतींवर श्री.रोडजाई देवी प्रसन्न असे शब्द कोरलेले आहेत. काहींवर ती बनवताना आणि काहींवर डागडुजी करताना ही वाक्ये कोरलेली असावीत. सर्व मंदिरांचा समूह गर्द राईत होता. हल्ली त्यांची डागडुजी, साफसफाई आणि देखभाल करण्यासाठी सुस्थितीतील मंदिरे एका सुरक्षित जागी ठेवून त्यांना कुंपण करण्यात आलेले आहे. 
   काही भग्नावशेष

 •आख्यायिका :-
सदरील मंदिरांच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी जनमानसांत बोलल्या जातात. कोणी यांचा संबंध शिवकालीन मंदिरे आहेत असा करतो तर काहीजण असेही म्हणतात की या ठिकाणी वर्षातील एका पौर्णिमा आणि अमावास्येला देवीची गुप्त यात्रा भरते. देवीचे सेवक देवीची पालखी मिरवतात. लख्ख आणि डोळे दिपवणारा प्रकाश होतो वगेरे.

शेजारील गावे, मंदिरांचे स्थान, रचना आणि निरीक्षणे या सर्वांचा अभ्यास केला असता वरील आख्यायिकांच्या विपरीत अशी माहिती समोर येते. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या संतकालीन भारुडामध्ये "रोडगा" शब्द आलेला आहे. जर एखाद्या माणसाने देवीला किंवा कोणत्याही देवाला नवस बोलला असेल तर तो फेडताना देवीला/ देवाला एक विशिष्ठ पद्धतीचा नैवैद्य समर्पित केला जातो आणि नवस फेडला जातो याला "रोडगा वाहणे" असे म्हणतात. सदरील उंच डोंगरावर श्री. रोडजाई देवीचा वास आहे असे मानले जाते पण तिचे बांधीव मंदिर नाही. शिरगांव आणि सर्कलवाडी या शेजारील गावातील ग्रामस्थ याठिकाणी नवस बोलत असत हे फार कमी ज्येष्ठ माणसांकडून समजते. तसेच ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांनी कुंभार वाड्यामध्ये जाऊन अश्या पद्धतीचे मंदिर बांधून घ्यायचे ते व्यवस्थित भाजायचे आणि सर्व सामग्रीनिशी "रोडगा" वाहण्यासाठी या उंच डोंगरावर जायचे. येथे परंपरागत पूजा करायची, रोडगा वाहायचा, रोडजाई मातेचे नवीन तयार करून आणलेले मंदिर याठिकाणी स्थापित करायचे आणि वर्षानुवर्षे तिथीनुसार त्याची पूजा करण्यासाठी डोंगर चढून वर यायचे. मंदिरांच्या संख्येवरून हा नित्यक्रम वर्षानुवर्षे चालू असावा असे समजते.

सरासरी शंभर किंवा शंभरहून अधिक अशी मंदिरे या ठिकाणी असावीत असा दावा केला जातो. या सर्व माहितीवरून ही मंदिरे लोकांच्या श्रध्देचा विषय राहिलेली आहेत याची जाणीव होते. परंतु याबाबत हातावर मोजता येतील एवढ्याच माणसांना याची तुटपुंजी माहिती असावी याचे मात्र नवल वाटते. असो, काळाच्या ओघात यांची आपल्याला ओळख झाल्यामुळे गाळात रुतली असणारी मंदिरे वर काढली गेली आहेत. काहींची डागडुजी केलेली आहे. जितकी मंदिरे सुस्थितीत आहेत त्यांना सुरक्षित करून काटेरी वनस्पतींचे कुंपण केलेलं आहे. सदर परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. 

मंदिरांचे पूजन करण्यासाठी आणि नैवैद्य दाखवण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. त्यात काही वावगे नाही; ती श्रद्धेचीच गोष्ट आहे. परंतु नैसर्गिक परिसंस्थेत टाकले जाणारे प्लास्टिक, रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स, न कुजनारे कापड आणि बराच कचरा याठिकाणी साठला होता. यामुळे प्रदूषण तर होतेच पण या श्रद्धा स्थळाचे पावित्र्य सुद्धा कमी होते. तरी येथील परिसर स्वच्छ ठेवणे आणि या प्राचीन ठेव्याचे महत्त्व जपणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. पुढील पिढीला सभोवतालचा परिसर, त्याच्याशी निगडित प्राचीन गोष्टी आणि इतिहास यासंबंधी चिकित्सा असते या चिकित्सेच्या शोधातून आणि आकलनामधून व्यक्तिमत्व विकास होत असतो. यासाठीच आपण हा वारसा जबाबदारीने जपायला हवा आणि त्याचे संवर्धन करावे.  

     परिसर स्वच्छता

सोबती
उजवीकडून - निखिल, धीरज, सुशांत आणि निशांत


©शब्दांकन/छायाचित्रे -
प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०


 

  







 

Friday, April 30, 2021

शिल्पकार

शिल्पकार


         सकाळची वेळ होती. विद्याधर चे बाबा सगळीकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते. खूप वेळ झाला त्यांची शोधाशोध चालूच होती. काहीसं न राहवून त्यांनी मला विचारलं, "शारदा... ए....शारदा, माझा चष्मा पाहिलास का ग कुठं? खूप शोधाशोध करतोय पण सापडतच नाही."
 "नाही हो ! मलाच हल्ली काही नीटसं दिसत नाही. डोळ्यासमोर अंधुक प्रकाश वाटतो सारखा, तुम्ही विद्यारधरला का विचारत नाही?", मी काहीश्या कातरस्वारत म्हणाले. त्यावर ते म्हणाले, "विद्याधर.... ए....विद्याधर, अरे माझा चष्मा पाहिलास का कुठे?" 
"हो बाबा, बाथरूमच्या कट्ट्यावर आहे तो. थांबा मी आणून देतो" असे म्हणून विद्याधर ने बाबांच्या हातात चष्मा आणून दिला.
"अरे, शारदा काय म्हणतेय ऐकलस का?" बाबा विद्याधरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाले.
माझे बोलणे विद्याधर ने आधीच ऐकले असल्यामुळे तो म्हणाला, "हो बाबा. मला माहित आहे आई काय म्हणाली. मला उद्या सुट्टी आहे. उद्याच तिला आपण नेत्र रुग्णालयात घेऊन जाऊयात."

          दोघांच्या चर्चेचे शब्द मनावर चिंतेचे पडसाद उमटवू लागले. "खरंच मला दिसेल का? मला परत हे सुंदर जग पाहता येईल का?" असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होते. डोळ्यांसमोर अंधुक प्रकाशामुळे तर मनात अनेक उलट- सुलट विचारांनी अंधार करायला सुरुवात केली होती.

          दुसरा दिवस उजाडला. आज रुग्णालयात जायचा दिवस होता. विद्याधर मला रुग्णालयात घेऊन आला. तिथे डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. काही औषधे आणि डोळ्यात सोडायचे ड्रॉप्स लिहून दिले. तसेच ताबडतोब डोळ्यांचे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. ऑपरेशनची गरज पाहून डॉक्टर म्हणाले, "बुधवारी आपल्याकडे अमेरिकेहून निष्णात नेत्रविकार तज्ञ डॉ. एम.के. येणार आहेत. त्यांच्याकडून आपण हे ऑपरेशन करून घेणार आहोत." तुम्ही बुधवारी रुग्णालयात हजर रहा. 
घरी आल्यानंतर विद्याधर आणि त्याचे बाबा यांच्यामध्ये माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन विषयी सांगोपांग चर्चा झाली आणि ऑपरेशन गरजेचेच आहे असे एकमत होऊन ऑपरेशन करण्याचा निर्णय पक्का झाला. 

          ठरल्याप्रमाणे विद्याधर मला ऑपरेशनकरिता रुग्णालयात घेऊन आला. उपचारासाठी आलेले सर्वच नेत्ररूग्ण आणि त्यांचे नातेवाईक खूप वेळ डॉक्टरांची वाट पाहत बसले होते. नेहमी वेळेमध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना आज का एव्हढा उशीर होत आहे याबाबत सगळेजण कुजबुज करत होते. "आम्ही खूप लांबून आलो आहोत, उपाशी, तापाशी आलो आहोत, यांना काय त्याचं, उगीच उशीर करतात, वगैरे वगैरे" अश्या नाना प्रकारच्या आरोपांच्या फैरी झडत होत्या. महिनाभरापूर्वी घेतलेल्या अपॉइंटमेंट नंतरही अशी वाट पाहावी लागल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले होते आणि डॉक्टरांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. नेहमी दहा वाजता येणारे डॉक्टर आज साढे अकरा ते बारा च्या दरम्यान आले. 

          डॉक्टरांच्या आगमनाने सर्वजण आनंदित झाले. मरगळलेले चेहरे आशेचा किरण पाहून पुन्हा टवटवीत झाले. डॉ. एम. के. आल्यामुळे सगळ्या चर्चा हवेत विरून गेल्या आणि कोणाला सर्वप्रथम आत बोलावले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. तेवढ्यात कंपाऊंडरने मला आतमध्ये येण्याची सूचना केली. आत गेल्यानंतर डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतले. या सगळ्या कालावधीमध्ये मला मनातून एक अनामिक भीती वाटत होती. "खरंच मला दिसेल की उरलेलं आयुष्यही अंधारातच व्यतीत करावं लागेल?" अश्या शंका- कुशंका मनात येत होत्या. पण एखादं स्वप्न पहावं आणि ते सत्यात उतरावं तसं झालं आणि माझं ऑपरेशन झालं. काही कालावधीनंतर माझ्या डोळ्यावर ठेवलेल्या पट्ट्या काढून टाकण्यात आल्या. डोळे हळूहळू उघडल्यानंतर मला सगळीकडे प्रकाश दिसू लागला. अंधाऱ्या खोलीत जीवन व्यतीत करताना अचानक एखादे कवाड उघडे व्हावे आणि आपले आयुष्य प्रकाशाने उजळून निघावे अशी भावना मनात सर्वप्रथम आली. विद्याधर मला स्पष्ट दिसू लागला. मला खूप आनंद झाला होता. पण ज्या डॉक्टरांनी माझे ऑपरेशन केले होते ते मात्र तिथे उपस्थित नव्हते. त्यांचे आभार मानायचे होते पण नाईलाज होता. डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशी कंपाऊंडरने बिलाऐवजी मला एक चिठ्ठी आणून दिली. मी मोठ्या कुतुहलाने आणि थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उघडली. त्यामधील अक्षरे स्पष्ट दिसत होती...

प्रिय बाई,
          चि. महेशचा आपणास साष्टांग नमस्कार. बाई तुम्ही मला ओळखू शकत नव्हता पण मी मात्र तुम्हाला ओळखले. मला तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर पट्टी काढली की तुम्ही मला नक्की ओळखाल याची मला पूर्ण खात्री होती. तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रु येतील आणि डोळ्यांच्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशन साठी कोणतेच अश्रू लगेच येणे अनुकूल नसते याची मला जाणीव होती त्यामुळे मी तुमच्या समोर थांबलो नाही त्याबद्दल क्षमा करावी.

          तुम्हाला कदाचित आठवत नसेल २५ ते ३० वर्षांपूर्वी मी तुमच्या वर्गात शिकत होतो. शाळेकडे माझे दुर्लक्ष झाले आणि मी आईबरोबर गुरे राखण्यासाठी माळावर जायला लागलो. शाळा आणि माझ्यातील अंतर वाढायला लागले होते. अश्या परिस्थितीत तुम्ही मुलांमार्फत मला निरोप पाठवले. शाळेत येण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु मी शाळेत आलो नाही. शेवटी न राहवून, आपल्या एका विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आणि मला शिक्षणाच्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही स्वतः  सर्व मुलांना घेऊन माळावर आलात. मला सर्वांनी उचलून शाळेत आणलं होतं. माझी नाना प्रकारे समझुत घातली होती. तू खूप हुशार आहेस, अभ्यास केलास तर खूप मोठ्या पदावर जाशील असा आत्मविश्वास माझ्यामध्ये जागवला आणि खरोखरच बाई तुमचे शब्द खरे ठरले. एखाद्या न जाणत्या जखमी पाखराला घरी आणावं, त्याला प्रेम आणि माया द्यावी, त्याची काळजी घ्यावी आणि पंखात बळ आलं की पाखरानं दूर आकाशी झेप घ्यावी असाच काहीसा हा माझ्या आयुष्यामधील न  विसरण्याजोगा प्रसंग !

           आज एकच खंत वाटते, तुम्हाला ओळख करून न देताच मी परदेशी आलो आहे. आपल्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थांबलो नाही. परंतु ज्या व्यक्तीने मला घडवलं, माझ्या आयुष्याची सुरुवात करून दिली, धैर्य आणि आत्मविश्वास दिला त्या व्यक्तीला गुरुदक्षिणेच्या मोबदल्यात मला सेवा देता आली हेच माझे परमभाग्य आहे असे मी समजतो! खरंच बाई तुम्ही माझ्या जीवनाच्या शिल्पकार आहात. मी पुन्हा येईन तेव्हा अवश्य तुमची भेट घेईन. तुमचा पत्ता मी लिहून घेतलेला आहे. तुम्ही काळजी घ्यावी आणि आनंदी रहावे. तुम्हाला पुनश्च: एकदा नमस्कार !

तुमचा लाडका विद्यार्थी !
डॉ.एम.के.

शब्दांकन 
©प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले
८९७५७११०८०

Monday, April 26, 2021

शिरगांवच्या पांडवकालीन गुहा

"शिरगांवच्या पांडवकालीन गुहा"

                                 •गुहेचे प्रवेशद्वार

          आमचे गाव शिरगांव ता.वाई हे तालुक्याचे सर्वात पूर्वेकडील गाव असून गावाच्या चारही बाजूंना डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे गाव निसर्गाने परिपूर्ण आहे. गावाच्या उत्तरेकडे कोरेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चवणेश्र्वर चा डोंगर आहे. पूर्वेस गावाचा मुख्य डोंगर असून या डोंगरात वाई - वाठार मार्गावरील तीन किमी लांबीचा शिरगांव घाट आहे.

          शिरगांव मध्ये अनेक मंदिरे, मठ आणि प्राचीन बांधकामे अजूनही सुस्थितीत आहेत. यापैकी एक वास्तू उत्तरेकडील डोंगर रांगेमध्ये खोदलेली आहे. गावाच्या उत्तरेकडे असणारा डोंगर गावापासून लांब अंतरावर असल्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी एका टेकडीच्या मागील बाजूस सहसा नजरेस न पडणाऱ्या आणि पाषाणात खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात.


                   •शिरगांवच्या उत्तरेकडील डोंगर 

•रचना:-
          सदरील पाच गुहा एका मोठ्या गुहेचे भाग असून ही गुहा अखंड पाषाणात खोदलेली आहे. गुहेचे द्वार उत्तरमुखी असून चवणेश्र्वर कडे मुख असलेले आहे.  संपूर्ण गुहेची लांबी साधारण ६ मीटर, रुंदी ३ मीटर आणि उंची २ मीटर असून गुहेमध्ये १ मीटर उंचीपर्यंत पाणी साठू शकते. पाण्याने गुहा भरल्यावर ज्यादा झालेले पाणी एका झऱ्याला मिळते. पाण्याचे टाक सदृश्य असणाऱ्या या गुहेची पाणी साठवण क्षमता साधारण १६-१८ घन मीटर (१६-१८००० लिटर) एवढी आहे. या गूहेसाठी पाण्याचा स्त्रोत म्हणजे गुहेच्या पूर्वेकडील भिंतीवरील अंतर्गत वाहणारा पाण्याचा झरा. आजही एप्रिल- मे महिन्यामध्ये तीव्र उन्हाळ्यात पाण्याचा एक स्रोत गुहेच्या छतातून वाहत असतो. विशेष म्हणजे हा स्रोत ऐन उन्हाळ्यात सुध्दा कमी क्षमतेने का होईना चालू असतो ही बाब अधोरेखित करावीशी वाटते.
 
                        •अंतर्गत रचना आणि खांब

          गुहेला मध्यभागी समान अंतरावर चार खांब आहेत. प्रत्येक खांबाची लांबी आणि रुंदी सरासरी अनुक्रमे १.५ फूट असून खांबाची उंची २ मीटर आहे. हे खांब चोकोनी असून काटकोनात कोरलेले आहेत. चार खांबानी गुहा विभागून तिच्या पाच खोल्या बनवल्या आहेत. प्रत्येक खोलीचे घनफळ असमान खोदकामामुळे कमी जास्त आहे. चार खांबांवर गुहेच्या वरील डोंगराचा भार विभागला आहे. गुहेत पाण्याच्या स्त्रोतांमुळे अधोमुखी लवणस्तंभ तयार झाले असून यांची सरासरी उंची ५ ते ६ सेमी आहे. गुहेचा तळ दगडी असल्यामुळे सहसा पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते. पाण्यामध्ये सध्या जलचरांचे वास्तव्य आहे.

                 •पाण्याचा साठा(२४ एप्रिल २०२१)

•गुहा/टाक बांधण्याचा हेतू :-
          डोंगरातील या भागात उन्हाळयात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. प्राचीन काळी जेव्हा घाट रस्ता नव्हता तेव्हा येण्या - जाण्यासाठी घाट माथ्यावरून गावाकडे येण्यासाठी पायवाट असावी. ही पायवाट या गुहांच्या शेजारून जात असावी. पांथस्थ आणि इतर जीवांना पाणी मिळावे या हेतूने कदाचित या गुहा खोदून तयार केल्या असाव्यात. प्राणी, पक्षी, पाळीव जनावरे आणि मनुष्यांना पाणी मिळावे हा एक उद्देश नाकारता येत नाही. 

•आख्यायिका/दंतकथा :-
          सदरील गुहांबाबत काही आख्यायिका व दंतकथा प्रचलित आहेत. त्यामधील प्रथम आख्यायिका म्हणजे, जवळच असलेल्या चवणेश्र्वर तीर्थक्षेत्राच्या मंदिराचे बांधकाम करून अज्ञातवासात असलेले  पांडव पुढील प्रवासासाठी निघताना डोंगर उतरल्यावर त्यांनी ह्या गुहा बांधल्या असाव्यात. यामुळेच गावामधील बहुतांशी लोक या गुहांना पाच पांडवांच्या गुहा मानतात. या गुहांचे बांधकाम करून तिथे वास्तव्य करून पांडव पुढील प्रवासासाठी देगाव आणि किकली कडे मार्गस्थ झाले अशी समजूत आहे.

                             •वनस्पती विविधता
          अजून एक आख्यायिका म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या चवणप्राश उत्पादनाचे नाव चवण ऋषींच्या नावावरून ठेवलेले आहे. ज्यांच्या नावावरून भुईंज गावाला भुईंज हे नाव मिळाले त्या भृगुऋषिंचे पुत्र म्हणजे चवण ऋषी. चवण ऋषींचे आयुर्वेदातील योगदान प्रचंड आहे. या चवण ऋषींचे वास्तव्य वनौषधींनी परिपूर्ण असणाऱ्या या डोंगर भागात होते. येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सापडतात. यांचा वापर करून चवण ऋषींनी आयुर्वेदातील काही औषधे बनवली होती. त्यांच्या वास्तव्यामुळे चवणेश्र्वर हे नामकरण झाले आहे. चवण ऋषींचे वास्तव्य आणि तपश्चर्येचे ठिकाण म्हणून सुध्दा या गुहांकडे पाहिले जाते. अशा काही इतिहासाशी मिळते जुळते घेणाऱ्या आख्यायिका जनमानसात पसरल्या आहेत.

          नैसर्गिक वैविध्य असणाऱ्या या डोंगरांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरीसृप आणि वनस्पती पहावयास मिळतात. कडक उन्हाळयात सुध्दा थंडगार पाण्याची सोय या गुहा करतात. 

                   •डोक्यावर तुरा असणारा गरुड
                     •मोर आणि मादी पाऊलखुणा 


          गुहांमध्ये कोरीव काम नसल्यामुळे त्या नक्की कोणत्या काळात आणि कोणी बांधल्या याची माहिती सापडत नाही. खूप कालावधीसाठी झाडाझुडुपांमध्ये गायब झालेल्या या गूहा हल्ली ओळखीच्या झाल्या आहेत. तेथील वातावरणात कमालीची शांतता आहे. निसर्गाशी एकरूप झाल्याचा भास येथे होतो.  निसर्ग आणि मानवी स्थापत्य यांचा मेळ झालेले हे ठिकाण इतिहास प्रेमींसाठी नक्कीच आवडीचे ठरेल. 


© प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
    शिरगांव
    ८९७५७११०८०

Wednesday, December 30, 2020

सरत्या दशकाचा निरोप घेताना प्रिय पप्पांना पत्र....

प्रिय पप्पा...

          प्रिय पप्पा आज २०२० वर्षाचा शेवटचा दिवस. सरते शेवटी तुमच्या आठवणींच्या भाराने माझ्या पापण्यांचा धीर परत एकदा सुटला आणि तुम्हाला पत्र लिहावेसे वाटले. माझी खूप आठवण येत असेल ना तुम्हाला. तुम्ही देवापाशी जाऊन दहा महिने झाले. तुम्हाला आजही आठवत असेल ना आपली शेवटची भेट, दहा महिने उलटून गेले तरी कालचीच वाटणारी. "माझी कमी भासू देऊ नको, तू माझा खंबीर मुलगा आहेस, मृत्यू कोणाला नाही, हे जुने झालेले शरीर बदलून परत नव्याने सुरुवात करीन, रडायचं नाही, मी तुला सोडून कधीही जाणार नाही, परत येईन ! अगदी कालच बोलला होता तुम्ही हे सर्व. मी अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागतोय. काळजी करू नका. पण मला परत एकदा भेटायला याल का?

          "तुमचा श्वास थांबला आहे" मी ऐकलेलं हे वाक्य आठवलं की मनाचा आणि हृदयाचा थरकाप अजूनही उडतो. भर उन्हात हात - पाय बर्फासारखे थंड पडतात आणि ऐन थंडीत दरदरून घाम फुटतो. शेजारच्या जगाचे भान राहत नाही.  पप्पा, तुमच्याकडे येताना प्रत्येक पाऊल खोल दरीत गेल्याचा आणि अंगातून सर्व ऊर्जा गेल्याचा अनुभव मला विसरता येत नाही. बाप असल्याच्या आणि आपण पोरके होण्याच्या मध्ये अगदी थोडा काळ असतो. हा काळ कधीही दयाळू नसतो. तुमचं सर्वस्व, तुमचं प्रेम, भावना, नातं आणि अस्तित्व ओरबाडून नेणारा निर्दयी काळ या वर्षी मला पाहायला मिळाला. मृत्यू पुढे आर्जवे शून्य होतात. यावर्षी मृत्यू पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. तो येतो तेव्हा कोणाचंही ऐकत नाही. मात्र जाताना कानशिलात अशी चापट मारून जातो की त्याच्याशिवाय दुसरे काही सत्य असेल याचे भानच राहत नाही. तुम्हाला शक्य असल्यास त्याला शिक्षा करा, खूप शिक्षा करा, त्याने मला खूप रडवले आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये माझ्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची विचारपूस करणारे तुम्ही, आज माझ्या न थांबणाऱ्या अश्रुंच्या धारांसाठी तुमच्याबरोबर गेलेल्या मृत्यूला शिक्षा कराल ना? पप्पा मला एकदा परत दिसाल का ?
          पप्पा खर सांगा, एवढ्या लवकर जाणं तुम्हाला तरी पटलं का. मला इथे एकटे सोडून जाताना तुम्हाला थोडी भीती वाटलीच असणार. तरी असं काय महत्वाचं काम निघालं तुमचं की तुम्ही अजून परत आलाच नाहीत. एवढी धडपड केली तुम्ही मुलांसाठी आणि संसारासाठी, अर्धवट सोडून जाताना तुम्हालाही त्रास झालाच असणार. मी पहिलीत असो की नोकरीमध्ये घरातून बाहेर जाताना नियमित माझा पापा घेऊन सावकाश जा आणि नीट ये म्हणणारे तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये मला परत कधीच दिसत नाही . किती किती शोधलय मी तुम्हाला या दहा महिन्यांत. पण तुम्ही दिसत नाही. पण माझ्याजवळ असल्याचा भास नेहमी होतो. तुम्हाला शोधून दमलो की रात्र पसरते. मी रात्रीची वाट पाहत असतो. पप्पा मला तुम्ही रोज रात्री माझ्या स्वप्नांमध्ये भेटायला येता त्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आणि धन्यवाद. न चुकता तुमच्या बोलण्याची, कामांची, आयुष्याची आंदोलने माझ्या स्वप्नात होत असतात. मग जाणवतं की तुम्ही जरी माझ्याजवळ नसलात तरी माझ्यामध्ये आहात. पप्पा तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहाल ना? तुमच्याशी बोलल्या शिवाय करमत नाही हो.

          दादाच्या बाळाची वाट तुम्ही आतुरतेने पाहिली होती ना. बाळाच्या चाहुलीने केवढा आनंद झाला होता तुम्हाला. या वर्षी एकदाच बाबा बाबा हे शब्द कानावर पडण्यासाठी तुम्ही कासावीस झाला होतात. तुम्ही गेल्यानंतर सहा महिन्यांनी बाळ घरात आले आहे. त्याला आई, वडील, आजी, मावशी, आत्या, काका कोण असतात हे नंतर कळेलच पण बाबा कोण आणि काय असतात ह्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही मला ताकद द्याल ना?

          माझ्या सर्व यशांमधे शाबासकी देऊन पाठ थोपटणारे तुम्ही, माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवून सहशिक्षकांना खुले आव्हान देणारे, माझ्या शिक्षकी पदवीच्या प्रवेशासाठी मला नेणारे, तुम्ही सांगितलेली पदवी मी मिळवली आहे त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि मला शाबासकी देण्यासाठी कधी येणार आहात ते कळवा तुमची प्रकर्षाने वाट पाहत आहे. पप्पा तुम्ही नक्की याल ना?

          सगळ्यांशी बोलतोय पण पप्पा म्हणून हाक मारू शकत नाही. तुम्हाला अनुभवतोय पण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला पाहू शकत नाही. परंतु मला विश्वास आहे की तुमचे आमच्यावर लक्ष आहे. नेहमी शुभाशीर्वाद आहेत. माझ्या आयुष्याची तुम्ही पाहिलेली स्वप्ने येत्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. काळजी नसावी. अश्रू थांबत नाहीत आणि शब्दही. मला माहित आहे की माझं अश्रू ढाळत बसणं तुम्हाला सहन होणार नाही त्यामुळे अधिक त्रास न देता पाठीशी राहण्याच्या वचनावर पत्रसमाप्ती करतो. 

काळजी घ्या पप्पा !

तुमचा लाडका मुलगा,
अनिकेत