Friday, April 30, 2021

शिल्पकार

शिल्पकार


         सकाळची वेळ होती. विद्याधर चे बाबा सगळीकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते. खूप वेळ झाला त्यांची शोधाशोध चालूच होती. काहीसं न राहवून त्यांनी मला विचारलं, "शारदा... ए....शारदा, माझा चष्मा पाहिलास का ग कुठं? खूप शोधाशोध करतोय पण सापडतच नाही."
 "नाही हो ! मलाच हल्ली काही नीटसं दिसत नाही. डोळ्यासमोर अंधुक प्रकाश वाटतो सारखा, तुम्ही विद्यारधरला का विचारत नाही?", मी काहीश्या कातरस्वारत म्हणाले. त्यावर ते म्हणाले, "विद्याधर.... ए....विद्याधर, अरे माझा चष्मा पाहिलास का कुठे?" 
"हो बाबा, बाथरूमच्या कट्ट्यावर आहे तो. थांबा मी आणून देतो" असे म्हणून विद्याधर ने बाबांच्या हातात चष्मा आणून दिला.
"अरे, शारदा काय म्हणतेय ऐकलस का?" बाबा विद्याधरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाले.
माझे बोलणे विद्याधर ने आधीच ऐकले असल्यामुळे तो म्हणाला, "हो बाबा. मला माहित आहे आई काय म्हणाली. मला उद्या सुट्टी आहे. उद्याच तिला आपण नेत्र रुग्णालयात घेऊन जाऊयात."

          दोघांच्या चर्चेचे शब्द मनावर चिंतेचे पडसाद उमटवू लागले. "खरंच मला दिसेल का? मला परत हे सुंदर जग पाहता येईल का?" असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होते. डोळ्यांसमोर अंधुक प्रकाशामुळे तर मनात अनेक उलट- सुलट विचारांनी अंधार करायला सुरुवात केली होती.

          दुसरा दिवस उजाडला. आज रुग्णालयात जायचा दिवस होता. विद्याधर मला रुग्णालयात घेऊन आला. तिथे डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. काही औषधे आणि डोळ्यात सोडायचे ड्रॉप्स लिहून दिले. तसेच ताबडतोब डोळ्यांचे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. ऑपरेशनची गरज पाहून डॉक्टर म्हणाले, "बुधवारी आपल्याकडे अमेरिकेहून निष्णात नेत्रविकार तज्ञ डॉ. एम.के. येणार आहेत. त्यांच्याकडून आपण हे ऑपरेशन करून घेणार आहोत." तुम्ही बुधवारी रुग्णालयात हजर रहा. 
घरी आल्यानंतर विद्याधर आणि त्याचे बाबा यांच्यामध्ये माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन विषयी सांगोपांग चर्चा झाली आणि ऑपरेशन गरजेचेच आहे असे एकमत होऊन ऑपरेशन करण्याचा निर्णय पक्का झाला. 

          ठरल्याप्रमाणे विद्याधर मला ऑपरेशनकरिता रुग्णालयात घेऊन आला. उपचारासाठी आलेले सर्वच नेत्ररूग्ण आणि त्यांचे नातेवाईक खूप वेळ डॉक्टरांची वाट पाहत बसले होते. नेहमी वेळेमध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना आज का एव्हढा उशीर होत आहे याबाबत सगळेजण कुजबुज करत होते. "आम्ही खूप लांबून आलो आहोत, उपाशी, तापाशी आलो आहोत, यांना काय त्याचं, उगीच उशीर करतात, वगैरे वगैरे" अश्या नाना प्रकारच्या आरोपांच्या फैरी झडत होत्या. महिनाभरापूर्वी घेतलेल्या अपॉइंटमेंट नंतरही अशी वाट पाहावी लागल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले होते आणि डॉक्टरांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. नेहमी दहा वाजता येणारे डॉक्टर आज साढे अकरा ते बारा च्या दरम्यान आले. 

          डॉक्टरांच्या आगमनाने सर्वजण आनंदित झाले. मरगळलेले चेहरे आशेचा किरण पाहून पुन्हा टवटवीत झाले. डॉ. एम. के. आल्यामुळे सगळ्या चर्चा हवेत विरून गेल्या आणि कोणाला सर्वप्रथम आत बोलावले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. तेवढ्यात कंपाऊंडरने मला आतमध्ये येण्याची सूचना केली. आत गेल्यानंतर डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतले. या सगळ्या कालावधीमध्ये मला मनातून एक अनामिक भीती वाटत होती. "खरंच मला दिसेल की उरलेलं आयुष्यही अंधारातच व्यतीत करावं लागेल?" अश्या शंका- कुशंका मनात येत होत्या. पण एखादं स्वप्न पहावं आणि ते सत्यात उतरावं तसं झालं आणि माझं ऑपरेशन झालं. काही कालावधीनंतर माझ्या डोळ्यावर ठेवलेल्या पट्ट्या काढून टाकण्यात आल्या. डोळे हळूहळू उघडल्यानंतर मला सगळीकडे प्रकाश दिसू लागला. अंधाऱ्या खोलीत जीवन व्यतीत करताना अचानक एखादे कवाड उघडे व्हावे आणि आपले आयुष्य प्रकाशाने उजळून निघावे अशी भावना मनात सर्वप्रथम आली. विद्याधर मला स्पष्ट दिसू लागला. मला खूप आनंद झाला होता. पण ज्या डॉक्टरांनी माझे ऑपरेशन केले होते ते मात्र तिथे उपस्थित नव्हते. त्यांचे आभार मानायचे होते पण नाईलाज होता. डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशी कंपाऊंडरने बिलाऐवजी मला एक चिठ्ठी आणून दिली. मी मोठ्या कुतुहलाने आणि थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उघडली. त्यामधील अक्षरे स्पष्ट दिसत होती...

प्रिय बाई,
          चि. महेशचा आपणास साष्टांग नमस्कार. बाई तुम्ही मला ओळखू शकत नव्हता पण मी मात्र तुम्हाला ओळखले. मला तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर पट्टी काढली की तुम्ही मला नक्की ओळखाल याची मला पूर्ण खात्री होती. तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रु येतील आणि डोळ्यांच्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशन साठी कोणतेच अश्रू लगेच येणे अनुकूल नसते याची मला जाणीव होती त्यामुळे मी तुमच्या समोर थांबलो नाही त्याबद्दल क्षमा करावी.

          तुम्हाला कदाचित आठवत नसेल २५ ते ३० वर्षांपूर्वी मी तुमच्या वर्गात शिकत होतो. शाळेकडे माझे दुर्लक्ष झाले आणि मी आईबरोबर गुरे राखण्यासाठी माळावर जायला लागलो. शाळा आणि माझ्यातील अंतर वाढायला लागले होते. अश्या परिस्थितीत तुम्ही मुलांमार्फत मला निरोप पाठवले. शाळेत येण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु मी शाळेत आलो नाही. शेवटी न राहवून, आपल्या एका विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आणि मला शिक्षणाच्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही स्वतः  सर्व मुलांना घेऊन माळावर आलात. मला सर्वांनी उचलून शाळेत आणलं होतं. माझी नाना प्रकारे समझुत घातली होती. तू खूप हुशार आहेस, अभ्यास केलास तर खूप मोठ्या पदावर जाशील असा आत्मविश्वास माझ्यामध्ये जागवला आणि खरोखरच बाई तुमचे शब्द खरे ठरले. एखाद्या न जाणत्या जखमी पाखराला घरी आणावं, त्याला प्रेम आणि माया द्यावी, त्याची काळजी घ्यावी आणि पंखात बळ आलं की पाखरानं दूर आकाशी झेप घ्यावी असाच काहीसा हा माझ्या आयुष्यामधील न  विसरण्याजोगा प्रसंग !

           आज एकच खंत वाटते, तुम्हाला ओळख करून न देताच मी परदेशी आलो आहे. आपल्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थांबलो नाही. परंतु ज्या व्यक्तीने मला घडवलं, माझ्या आयुष्याची सुरुवात करून दिली, धैर्य आणि आत्मविश्वास दिला त्या व्यक्तीला गुरुदक्षिणेच्या मोबदल्यात मला सेवा देता आली हेच माझे परमभाग्य आहे असे मी समजतो! खरंच बाई तुम्ही माझ्या जीवनाच्या शिल्पकार आहात. मी पुन्हा येईन तेव्हा अवश्य तुमची भेट घेईन. तुमचा पत्ता मी लिहून घेतलेला आहे. तुम्ही काळजी घ्यावी आणि आनंदी रहावे. तुम्हाला पुनश्च: एकदा नमस्कार !

तुमचा लाडका विद्यार्थी !
डॉ.एम.के.

शब्दांकन 
©प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले
८९७५७११०८०

Monday, April 26, 2021

शिरगांवच्या पांडवकालीन गुहा

"शिरगांवच्या पांडवकालीन गुहा"

                                 •गुहेचे प्रवेशद्वार

          आमचे गाव शिरगांव ता.वाई हे तालुक्याचे सर्वात पूर्वेकडील गाव असून गावाच्या चारही बाजूंना डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे गाव निसर्गाने परिपूर्ण आहे. गावाच्या उत्तरेकडे कोरेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चवणेश्र्वर चा डोंगर आहे. पूर्वेस गावाचा मुख्य डोंगर असून या डोंगरात वाई - वाठार मार्गावरील तीन किमी लांबीचा शिरगांव घाट आहे.

          शिरगांव मध्ये अनेक मंदिरे, मठ आणि प्राचीन बांधकामे अजूनही सुस्थितीत आहेत. यापैकी एक वास्तू उत्तरेकडील डोंगर रांगेमध्ये खोदलेली आहे. गावाच्या उत्तरेकडे असणारा डोंगर गावापासून लांब अंतरावर असल्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी एका टेकडीच्या मागील बाजूस सहसा नजरेस न पडणाऱ्या आणि पाषाणात खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात.


                   •शिरगांवच्या उत्तरेकडील डोंगर 

•रचना:-
          सदरील पाच गुहा एका मोठ्या गुहेचे भाग असून ही गुहा अखंड पाषाणात खोदलेली आहे. गुहेचे द्वार उत्तरमुखी असून चवणेश्र्वर कडे मुख असलेले आहे.  संपूर्ण गुहेची लांबी साधारण ६ मीटर, रुंदी ३ मीटर आणि उंची २ मीटर असून गुहेमध्ये १ मीटर उंचीपर्यंत पाणी साठू शकते. पाण्याने गुहा भरल्यावर ज्यादा झालेले पाणी एका झऱ्याला मिळते. पाण्याचे टाक सदृश्य असणाऱ्या या गुहेची पाणी साठवण क्षमता साधारण १६-१८ घन मीटर (१६-१८००० लिटर) एवढी आहे. या गूहेसाठी पाण्याचा स्त्रोत म्हणजे गुहेच्या पूर्वेकडील भिंतीवरील अंतर्गत वाहणारा पाण्याचा झरा. आजही एप्रिल- मे महिन्यामध्ये तीव्र उन्हाळ्यात पाण्याचा एक स्रोत गुहेच्या छतातून वाहत असतो. विशेष म्हणजे हा स्रोत ऐन उन्हाळ्यात सुध्दा कमी क्षमतेने का होईना चालू असतो ही बाब अधोरेखित करावीशी वाटते.
 
                        •अंतर्गत रचना आणि खांब

          गुहेला मध्यभागी समान अंतरावर चार खांब आहेत. प्रत्येक खांबाची लांबी आणि रुंदी सरासरी अनुक्रमे १.५ फूट असून खांबाची उंची २ मीटर आहे. हे खांब चोकोनी असून काटकोनात कोरलेले आहेत. चार खांबानी गुहा विभागून तिच्या पाच खोल्या बनवल्या आहेत. प्रत्येक खोलीचे घनफळ असमान खोदकामामुळे कमी जास्त आहे. चार खांबांवर गुहेच्या वरील डोंगराचा भार विभागला आहे. गुहेत पाण्याच्या स्त्रोतांमुळे अधोमुखी लवणस्तंभ तयार झाले असून यांची सरासरी उंची ५ ते ६ सेमी आहे. गुहेचा तळ दगडी असल्यामुळे सहसा पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते. पाण्यामध्ये सध्या जलचरांचे वास्तव्य आहे.

                 •पाण्याचा साठा(२४ एप्रिल २०२१)

•गुहा/टाक बांधण्याचा हेतू :-
          डोंगरातील या भागात उन्हाळयात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. प्राचीन काळी जेव्हा घाट रस्ता नव्हता तेव्हा येण्या - जाण्यासाठी घाट माथ्यावरून गावाकडे येण्यासाठी पायवाट असावी. ही पायवाट या गुहांच्या शेजारून जात असावी. पांथस्थ आणि इतर जीवांना पाणी मिळावे या हेतूने कदाचित या गुहा खोदून तयार केल्या असाव्यात. प्राणी, पक्षी, पाळीव जनावरे आणि मनुष्यांना पाणी मिळावे हा एक उद्देश नाकारता येत नाही. 

•आख्यायिका/दंतकथा :-
          सदरील गुहांबाबत काही आख्यायिका व दंतकथा प्रचलित आहेत. त्यामधील प्रथम आख्यायिका म्हणजे, जवळच असलेल्या चवणेश्र्वर तीर्थक्षेत्राच्या मंदिराचे बांधकाम करून अज्ञातवासात असलेले  पांडव पुढील प्रवासासाठी निघताना डोंगर उतरल्यावर त्यांनी ह्या गुहा बांधल्या असाव्यात. यामुळेच गावामधील बहुतांशी लोक या गुहांना पाच पांडवांच्या गुहा मानतात. या गुहांचे बांधकाम करून तिथे वास्तव्य करून पांडव पुढील प्रवासासाठी देगाव आणि किकली कडे मार्गस्थ झाले अशी समजूत आहे.

                             •वनस्पती विविधता
          अजून एक आख्यायिका म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या चवणप्राश उत्पादनाचे नाव चवण ऋषींच्या नावावरून ठेवलेले आहे. ज्यांच्या नावावरून भुईंज गावाला भुईंज हे नाव मिळाले त्या भृगुऋषिंचे पुत्र म्हणजे चवण ऋषी. चवण ऋषींचे आयुर्वेदातील योगदान प्रचंड आहे. या चवण ऋषींचे वास्तव्य वनौषधींनी परिपूर्ण असणाऱ्या या डोंगर भागात होते. येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सापडतात. यांचा वापर करून चवण ऋषींनी आयुर्वेदातील काही औषधे बनवली होती. त्यांच्या वास्तव्यामुळे चवणेश्र्वर हे नामकरण झाले आहे. चवण ऋषींचे वास्तव्य आणि तपश्चर्येचे ठिकाण म्हणून सुध्दा या गुहांकडे पाहिले जाते. अशा काही इतिहासाशी मिळते जुळते घेणाऱ्या आख्यायिका जनमानसात पसरल्या आहेत.

          नैसर्गिक वैविध्य असणाऱ्या या डोंगरांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरीसृप आणि वनस्पती पहावयास मिळतात. कडक उन्हाळयात सुध्दा थंडगार पाण्याची सोय या गुहा करतात. 

                   •डोक्यावर तुरा असणारा गरुड
                     •मोर आणि मादी पाऊलखुणा 


          गुहांमध्ये कोरीव काम नसल्यामुळे त्या नक्की कोणत्या काळात आणि कोणी बांधल्या याची माहिती सापडत नाही. खूप कालावधीसाठी झाडाझुडुपांमध्ये गायब झालेल्या या गूहा हल्ली ओळखीच्या झाल्या आहेत. तेथील वातावरणात कमालीची शांतता आहे. निसर्गाशी एकरूप झाल्याचा भास येथे होतो.  निसर्ग आणि मानवी स्थापत्य यांचा मेळ झालेले हे ठिकाण इतिहास प्रेमींसाठी नक्कीच आवडीचे ठरेल. 


© प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
    शिरगांव
    ८९७५७११०८०