Tuesday, May 3, 2022

तारुण्यातील मुले आणि स्वनियंत्रण

तारुण्यातील मुले आणि स्वनियंत्रण


          सध्या जग झपाट्याने बदलत आहे. समाजात वागण्याच्या आणि जगण्याच्या परिभाषा झटपट बदलताना दिसत आहेत. समाज बदलाच्या वेगाबरोबर प्रत्येकाने आपली गती सुद्धा बदलायची आहे याबाबत दुमत नाही परंतु हे बदल करत असताना स्वत:च्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचे भान मात्र प्रत्येक तरुणाला असायला हवे. ऐन तारुण्यात आणि उमेदित अगदी नगण्य वाटणाऱ्या चुकांमुळे तरुणांना आपले प्राण गमवावे लागणे याची असंख्य उदाहरणे रोज प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर आपण पाहत असतो. दुर्दैवी घटना घडणे, त्यांवर शोक करणे, श्रद्धांजली वाहणे, दुःख करत बसणे, शेवटी पश्चाताप होऊन घटनांचा विसर पडणे आणि पुनश्च: अश्या घटना घडणे हा नित्यक्रम चालूच आहे. याचे कारण म्हणजे अश्या घटनांमागील काही चुका, त्यांची कारणे समजावून न घेणे आणि वेळोवेळी आवश्यक असणारे स्वनियंत्रण मोहाच्या, दुःखाच्या आणि आनंदाच्या आवेगात विसरून जाणे. सदर लेख अनेक घटनांचे निरीक्षण आणि त्यांवर चिंतन करून माझ्या व्यक्तिगत अनुभवांवरून लिहिलेला आहे. 

          घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेस एक कारण असते. विनाकारण जगातील कोणतीही गोष्ट घडत नाही हा विज्ञानाचा नियम आहे. घडत जाणाऱ्या गोष्टी घडायच्याच होत्या, ते आपल्या हातात नाही; जे घडायचे आहे ते कसेही घडणारच अश्या टिपण्या करून आपण त्यांच्या कारणांपासून पळवाटा शोधू लागतो आणि पुन्हा अश्या घटना घडतात केवळ आणि केवळ आपल्या दुर्लक्षामुळेच ! ह्या घटनांना पायबंद घालणे सध्या समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे. उमेदीचे मनुष्यबळ जर हकनाक वाया जात असेल तर ते प्रामुख्याने कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान आहे हे मान्य करावे लागेल. यासाठी समाज प्रबोधन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी तरुण- तरुणींनी, पालकांनी आणि समाजातील जबाबदार व्यक्तींनी आता सतर्क व्हायलाच हवे कारण दुर्दैवी घटना कोणाच्या घरात कधी घडेल हे सांगता येत नाही.

कोणत्या गोष्टी जास्त धोकादायक आहेत?

१) भौतिक गोष्टी :-

          आपणास उपयोगी असणाऱ्या काही भौतिक गोष्टीं किंवा कृतींचा अतिवापर तसेच चुकीचा वापर झाल्यामुळे जीवितास हानी पोहोचते. यांमध्ये वाहने (दुचाकी, चारचाकी इ.), मोबाईल, अग्नी संबंधित कामे, पाणी आणि पाण्यातील पोहणे (नदी, कॅनॉल, विहिरी, इ.), कीटकनाशके(शेतीची रसायने इ.), अनोळखी नैसर्गिक जागा अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. या गोष्टींना पालकांनी, तरुण - तरुणींनी व अजाणत्या मुलांनी हलक्यात घेऊ नये. यांबाबत सतत सतर्क राहायला हवे. कारण या गोष्टी जेवढ्या उपयोगी आहेत तेवढ्याच प्रमाणात अतिसंवेदनशील आणि धोकादायक आहेत. 

          प्रत्येक पालक आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांचे प्राथमिक कर्तव्य हे आहे की वर उल्लेख केलेल्या गोष्टींना अनुसरून, त्यांनी आपली मुले कुठे आहेत आणि काय करत आहेत याबाबत सतर्क राहावे. सतर्क रहायलाच हवे कारण नंतर सतर्कता येते पण पोटचे मूल माघारी येऊ शकत नाही. मुले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती जसे की तिथे काही धोका आहे का, आजूबाजूला माणसे आहेत का याची काळजी घ्यावी. या गोष्टींचा विचार करून सहसा मुलांना एकटे सोडू नये; जरी तो नवतरुण असेल तरी. आपली मुले आणि नवतरुण यांच्यावर अतीआत्मविश्वास दाखवू नये. असे केल्याने मुलांना धोकादायक गोष्टींचे भान व भय राहत नाही आणि घटकेत अघटीत घडू शकते. आपल्या पालकांचा आपणास सर्व गोष्टींत होकार आहे असे समजून मुले त्वेषाने आयुष्याचा आनंद घेण्यात गुंग होतात यासाठी मुलांवर पालकांची थोडी तरी जरब असणे गरजेचे आहे. काही पालक प्रेमापोटी मुलांना इतकी मोकळीक देतात तेव्हा एक वेळ अशी येते की मूले किंवा तरुण पालकांचे काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीत जाऊन पोहोचतात, ते स्वत:ला परिपूर्ण समजण्याची चूक करतात. हे घडूच नये यासाठी मुलांना वेळोवेळी कडक शासन करणे, कान उघाडणी करणे आणि बरे - वाईट समजावून सांगणे हे आपले कर्तव्य मानून लहान वयापासूनच शिस्तीचे प्रशिक्षण चालू करावे.

          आपल्या मुलांना इतरांच्या जबाबदारीवर कधीच सोडू नये. आपले पाल्य ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. अघटीत घडल्यास कोणीही त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही याचा विचार करावा. दिवसाचा निश्चित असा वेळ मुले, तरुण आणि तरुणींच्या दैनंदिन कामे आणि हालचालींसाठी राखून ठेवावा. नेहमी चौकशी करावी. सूचना द्याव्या. फायदे - तोटे आणि धोके वारंवार सांगावेत. वरील गोष्टींचा कधीही कंटाळा करू नये कारण या जीवनावश्यक बाबी आहेत. पालकांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवू नये कारण नंतर पश्र्चाताप करून काहीही फायदा होत नाही वेळ निघून गेलेली असते. त्याआधीच सावध झालेले बरे.

२) भावनिक गोष्टी :-

          मानवी जीवितास हानिकारक असणाऱ्या काही भावनिक गोष्टी समजावून घेऊ. दुःखावेग, आत्महत्या, मोह, प्रसिद्धीचा लोभ आणि मुक्त विलासी जीवनाची आवड या आणि इतर बरेच मनातील अनेक गुंतागुंतीच्या विचारांनी बनलेल्या भावनिक गोष्टी आहेत. आपली तरुण मूले भावनिक आणि संवेदनशील असावीत पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण संवाद ठेवता आला पाहिजे. पालक आणि पाल्य यांच्यात मोठी विचारदरी नसावी.  त्यांनी प्रत्येक गोष्टीची आणि आपल्या विचारांची पालकांसोबत चर्चा करायलाच हवी. मनातील लाजेची भावना आणि न्यूनगंड सोडून द्यायला हवा. असे न झाल्यास मूले वाईट मार्गांतून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात की जे त्यांच्या आयुष्यासाठी धोकादायक असू शकते. मूले किंवा तरुण त्यांच्या समवयस्क मित्रांवर लगेच विश्वास ठेवतात. त्यांना ते जवळचे वाटतात आणि आपण करत असलेली कोणतीही कृती योग्यच आहे असे स्वतःचे मत बनवतात परिणामी अनुभवाच्या अभावी प्राणघातक संकटाना सामोरे जातात. त्यामुळे मुलांबरोबर पालकांचा भावनिक मुक्तसंवाद व्हायलाच हवा. तरुणांना अतिशय हळवे आणि अती कठोर सुद्धा बनवू नये. त्यांना स्वत:च्या भावना आणि स्वतःचे विचार यांवर नियंत्रण ठेवायला शिकवावे. त्यांना विचार करायला भाग पाडावे.

          आपणास मिळालेल्या स्वातंत्र्याचा मूले आणि तरुण -तरुणी पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणत्याही गोष्टीपासून आनंद, मजा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी टोकाला जाण्याचा विचार करत असतात. या गोष्टींना विरोध नाही पण हे करत असताना तरुणांनी आपल्या जीवाची काळजी केली पाहिजे. प्रसंगावधान राखले पाहिजे. आपण धोक्याची सीमा ओलांडत तर नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये अडकु शकतो, करत असलेल्या गोष्टीमुळे काय वाईट परिणाम होऊ शकतात याच्यावर आधी विचार करावा तदनंतर कृती करावी. आपले भविष्य आणि कुटुंबातील व्यक्ती यांचे पुढे काय होईल याचा एकदा विचार करावा. भावना सर्वांनाच असतात पण आयुष्य त्याचेच सफल होते ज्याने आपल्या भावना स्वतःच्या नियंत्रणात ठेवल्या आहेत. शेवटी कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात झाली की तिचा अंत निश्चित असतो. त्यासाठी स्वनियंत्रण हवे.

काय आहे स्वनियंत्रण ?

          स्वनियंत्रण म्हणजे खूप अवघड संकल्पना नाही. "स्वनियंत्रण म्हणजे कोणतीही गोष्ट करताना वेळेचे, काळाचे, परिणामांचे भान ठेवून विचारपूर्वक केलेली कृती." समजा एखाद्या तरुणाला खूप दुःख झालेले असेल तर त्याने आवेगात पावले उचलू नयेत. थोडा वेळ जावू द्यावा. कारण आणि परिणामांचा विचार जरूर करावा. वर्तमान स्थितीत आपणावर कोणती जबाबदारी आहे याचे भान ठेवावे आणि योग्य ते मानसिक संतुलन राखावे. यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

          तरुण वयात मुलांमधे प्रचंड उर्मी आणि शक्ती असते. रसरसत असणारी ही शक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते यात अनैसर्गिक असे काहीच नाही. परंतु या शक्तीला विवेकाने म्हणजे काळजीपूर्वक हाताळावे लागते. स्वतःला नियंत्रणात ठेवावे लागते. नाहीतर हीच शक्ती नियंत्रणाबाहेर गेली की घात करते याउलट तिच्यावर नियंत्रण असेल तर प्रगती साधते. संयम अंगी असेल तर हे साध्य होईल. उतावीळ मुलांना किंवा तरूणांना आयुष्य दगा देऊ शकते.

अजाणत्या आणि तरुण मुलामुलींसाठी काही आचरण मुद्दे :-

१) आपणास अजून खूप जगायचे आहे. कुटुंबाचे आपण आधारस्तंभ आहोत ही भावना असावी. आपण करत असलेली गोष्ट अंतिम नाही हे समजून घ्यावे.

२) निसर्ग माणसाचा फालतू आत्मविश्वास कधीही सहन करत नाही. भावनेच्या भरात कोणावरही अगदी स्वतःवर सुद्धा अतीआत्मविश्वास ठेवू नये. 

३) आपल्या कमतरता स्वतःला आणि पालकांना वेळोवेळी माहिती असाव्यात.

४) वडीलधारे, पालक आणि शिक्षक यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या योग्यच असतात. त्यांना तुमच्यापेक्षा आयुष्याचा जास्त अनुभव आहे. ते अनेक बऱ्या- वाईट घटनांचे साक्षीदार असतात. त्यांच्या शब्दांना डावलून आपलेच खरे करू नये. भविष्यात तीव्र पश्चाताप होतो.

५) अनोळख्या नैसर्गिक जागा किंवा अशी स्थळे ज्याचा आपल्याला अंदाज नाही तिथे मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. एक चूक आत्मघातकी ठरू शकते.

६) अतिशय आनंदात, तीव्र दुःखात आणि मोहाच्या अवस्थेत असताना चांगले घडायचा एकच मार्ग असतो तो म्हणजे स्वत:ला शांत ठेवणे. ज्याला स्वनियंत्रण जमले त्याने धोक्याची पातळी कमी केली असे म्हणावे लागेल.

७) कमी अनुभवाने, हट्टाने, पालकांच्या विरोधात जाऊन केलेली प्रत्येक वाईट गोष्ट भविष्यात स्वत:ला आणि कुटुंबाला असह्य पश्चाताप आणि मानसिक दुःख देऊ शकते याची कितीतरी उदाहरणे आपणास समाजात पाहायला मिळतात.

८) सावधान!  आयुष्य एकच आहे, शरीर सुध्दा एकच आहे त्याची विचारपूर्वक काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपली एक चूक आपणास आपल्यांतून हिरावून नेऊ शकते. 

          आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपणास अक्षय्य सुख, आनंद आणि आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण, पालक आणि तरुण तरुणी यावर चिंतन करतील असा विश्वास बाळगून लेखन प्रपंच थांबवतो.


- लेखन 
प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
(किसन वीर महाविद्यालय, वाई)
8975711080



Tuesday, February 15, 2022

सस्नेह आभार

सस्नेह आभार !

आदरणीय,

          आज मी अनिकेत आपला मित्र, बंधू आयुष्याची २७ वर्षे पूर्ण करून २८ व्या नवीन वर्षात पदार्पण करत आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या अमूल्य वेळेतून काही क्षण माझ्यासाठी राखून ठेवले आणि मंगलमय शुभेच्छा दिल्या त्यांचा मनापासून स्वीकार करतो कारण शुभेच्छा देणाऱ्या स्नेही जणांच्या हृदयात प्रेम आणि आपुलकी असते आणि हे वात्सल्य आपणापासून मिळणे हेच आमचे भाग्य आहे असे आम्ही समझतो. 
          आपल्या शुभेच्छा मला आयुष्याच्या प्रत्येक दिवशी येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील आणि माझ्यावरती सुद्धा प्रेमळ जणांचे छत्र आहे याची आठवण करून देतील !

           पुनश्च धन्यवाद ! मनपूर्वक आभार !
                                                                                                                                               आपला अनिकेत ❤️
                                                         १८ फेब्रुवारी २०२२
                                        

Saturday, June 19, 2021

पितृदिन विशेष

पितृदिन निमित्ताने..! बाप..!
(२० जून २०२१) 

जून चा तिसरा रविवार म्हणजे पितृदिन साजरा करण्याचा दिवस. बापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. खरे म्हणजे बापाचा कोणताही दिवस नसतो, आपला प्रत्येक दिवस बापामुळेच असतो. भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व असून देवाला प्रत्येकापाशी जाता येत नाही म्हणून त्याने सर्वांना वात्सल्यरुपी आई दिली. आई आपल्या घराचे मांगल्य असते. असे असले तरी बाप घराचे अस्तित्व असतो. आईसह सर्व कुटुंबाचा आधारस्तंभ असतो तो बाप ! याच बापाविषयी काही शब्द....

बाप हा शब्द जरी दोन अक्षरी, साधा सोपा वाटत असला तरी बाप ही उपाधी मिरवण्यासाठी जन्म घेतलेल्या दिवसापासून ते मरणापर्यंतचे सर्व अनुभव पणाला लावावे लागतात. बाप हे व्यक्तिमत्व काय असते? बापाचे आणि कुटुंबाचे काय नाते असते? बाप असा का वागतो? बापाला कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात? बापाला असणाऱ्या भावना आपणास का दिसत नाहीत? बापाला कोण - कोणत्या यातना होतात? बाप म्हणजे नक्की काय? या सर्वांची उत्तरे फक्त एकच गोष्ट देऊ शकते. ती गोष्ट म्हणजे बापाचे स्थान ! बापाच्या स्थानी आलेल्या प्रत्येकाला या प्रकारच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळायला लागतात. एक-एक कोडे उलगडायला लागते. बापाचा अर्थ कळतो तो याच ठिकाणी !

कुटुंबाची संरक्षक भिंत - बाप !
आपले घर चालवताना बापाला कठोर भूमिका घ्याव्या लागतात. त्यामुळे त्याचे स्वरूप थोडे रागीट, शिस्तप्रिय आणि कठोर भासते. बापाने असे असायलाच हवे; कारण त्याच्यावर कुटुंबाच्या संरक्षणाची आणि पालन पोषणाची जबाबदारी असते. सर्वांची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य असते. हे कर्तव्य निभावत असताना त्याला बाहेरील अपप्रवृत्तींपासून आपल्या माणसांचे रक्षण करायचे असते. समाजातील विचार प्रवाह, लोकांच्या सवयी, आवडी - निवडी, भाषा, वागणूक आणि संस्कार याबाबतीत त्याला काटेकोर राहावे लागते. तसे न राहिल्यास मुलांच्या अंगी सद्गुण, संस्कार, परोपकाराची भावना, सत्य आणि सदाचार या गुणांची कमतरता राहते. ही कमी राहू नये म्हणून बाप कुटुंबाचे सर्व बाबतीत संरक्षण करीत असतो. कठोर वागत असतो. वरून जरी बाप कितीही कठोर वाटत असला तरी आतून प्रेमळच असतो ! आपले बाबा, पप्पा, वडील जेव्हा आपणास काही उपदेश करत असतात किंवा काही गोष्टी समजावून सांगत असतात तेव्हा त्या कधीही हलक्यात घेऊ नका. त्या एका वाक्यामागे त्यांच्या आयुष्याचा अनुभव असतो. ते आपल्या भल्यासाठीच आपणास वारंवार सांगत असतात. 

नवीन पिढीचा अनुभव ग्रंथ - बाप !
बापालाही बाप असतो. या बापाकडूनच जीवन योग्य रीतीने आणि आनंदाने जगण्याचा मंत्र मिळतो आणि हे चक्र असेच चालू राहते. आपल्या बापाच्या जागी आपण आल्यानंतर आपणास कौटुंबिक जबाबदाऱ्या समजायला लागतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना अतोनात कष्ट सोसावे लागतात. कष्ट सोसत असताना निवडलेले मार्ग कसे चांगले किंवा वाईट होते, घेतलेले निर्णय कितपत योग्य आणि अयोग्य ठरले. निर्णय घेताना चुका कशा होतात, झालेल्या चुका कश्या सुधाराव्यात, निर्णयात भावनेला किती स्थान असावे, वाईट प्रसंगातून बाहेर कसे पडायचे, कोणती शक्कल लढवावी, नातेसंबंध कसे जपावेत, व्यवहार कसे करावेत, व्यवहारात सावध कसे राहावे, अर्थार्जन आणि अर्थ बचत करण्याचे कानमंत्र कोणते, कोणत्या वयात आपण काय केले पाहिजे, चांगल्या सवयी कोणत्या, शरीर तंदुरुस्त ठेवून आजारावर मात कशी करावी, समाजातील आपली वागणूक कशी असावी, समाजात आपले स्थान मिळवून ते कसे टिकवायचे अश्या एक ना असंख्य गोष्टींची आणि प्रश्नांची उत्तरे आपल्या बापाला त्याच्या आयुष्यातून मिळालेली असतात आणि आपणास आपल्या बापाच्या आयुष्यातून रोज मिळत असतात. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. बाप या ग्रंथाचे दररोज एक - एक पान पालटले जात असते. अखेरीस संपूर्ण ग्रंथ आटोपतो. हा ग्रंथ आटोपण्या अगोदर त्यामधून जेवढे ज्ञान आणि अनुभव आपल्याला घेता येतील तेवढे घ्यावे. प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावे एवढीच अपेक्षा या ग्रंथाची असते.

वादळे झेलनारे जहाज- बाप !
आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग असे येतात की त्यांमधून बाहेर पडून पूर्ववत आयुष्य जगावे लागते. हे वाटते तेवढे सोपे नाही. यासाठी प्रचंड मानसिक शक्ती आणि सहनशीलता अंगी असावी लागते. बापाला असले प्रसंग पचवण्याची ताकत प्राप्त होते ती अगदी लहापणापासूनच. कितीही मोठा दुःखाचा प्रसंग आला तरी बाप संसाराची गाडी पटरीवरून खाली जावू देत नाही. लहानपणी ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवले, वाढवले, लाड केले ते आवडते आजी आणि आजोबा त्याला सोडून निघून जातात. येथूनच दुःखाची ओळख होत जाते. हळूहळू आप्त, जवळचे नातेवाईक, शेजारील व्यक्ती, घरातील व्यक्ती, आई, बाबा सोडून जातात. हे सर्व त्याला परिचित होऊन दुःख सोसण्याची ताकत त्याच्यामध्ये तयार होते. सर्व दुःख सोसून आपल्या कुटुंबासाठी पुन्हा नव्याने कामाला लागण्याची उमेद त्याला आपल्या परिवाराकडे पाहून येते.  आयुष्यभर या ना त्या मार्गाने दुःख सोसणाऱ्या बापाला आपल्या मुलांकडून थोड्या सुखाची , प्रेमाची आणि चांगल्या संवादाची अपेक्षा असते; पण हे सुध्दा मिळाले नाही तर बाप खचून जातो. त्याला आपलेपणा हवा असतो, जिव्हाळा हवा असतो आपल्या माणसांकडून !

निस्वार्थी , दानशूर - बाप !
बापाला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा त्याची मुले आणि परिवार त्याच्यामुळे आनंदात असतात. हसत, बागडत, सुखाने जगणाऱ्या आपल्या परिवाराशिवाय बापाला दुसरी कोणतीही गोष्ट मौल्यवान वाटत नाही. बाप असे समजतो की, ' मला कितीही कष्ट सोसावे लागले तरी सोसेन पण माझ्या पाखरांना काही कमी पडू देणार नाही. त्यांना आयुष्यातील हर एक गोष्ट देण्याचा प्रयत्न करेन. त्यांना आयुष्यातील दुःखापासून लांब ठेवेन.' यासाठी बाप आपले सर्वस्व अर्पण करत असतो. आयुष्यातील एक वेळ बापावर अशी येते की त्याला आपल्या परिवाराशिवाय दुसरे काही महत्त्वाचे असेल याची जाणीव राहत नाही. स्वतः अनेक त्रास सहन करून, स्वतःच्या मौजमजा बाजूला ठेवून, एक - एक रुपया वाचवून आपल्या मुलांचे भविष्य तयार करण्याचे स्वप्न पाहणारा देवदूत म्हणजे बाप असतो.

पोटच्या मुलीसाठी, जेव्हा ती जन्माला आली त्या दिवसापासून ते तिचे हात पिवळे करण्यापर्यंत सर्व बाबींचे स्वप्न पाहणारा, नियोजन करणारा आणि अमलात आणणारा बाप असतो !

मूल जन्माला आल्यानंतर अतोनात आनंद होणारा परंतु वरवर न दाखवणारा बाप असतो !

घरासाठी रोजच्या रोज मरणारा, रक्त आणि घाम एक करणारा, उन्हापावसाची तमा न बाळगता पोरांच्या भाकरीची सोय करणारा बाप असतो ! 

समाजाच्या तप्त आणि वास्तव नजरेच्या आगीपासून कुटुंबाला शाबूत ठेवणारा सेनापती म्हणजे बाप असतो !

वय झाल्यानंतर मुलांची उद्धट बोलणी ऐकूनही त्याच्याच आसमंतात शांत राहणारा, मुलांचे संसार व्यवस्थित चालावेत याची काळजी करणारा बाप असतो !

आयुष्यभराच्या कष्टाच्या मोबदल्यात फक्त प्रेम, जिव्हाळा, सुसंवाद आणि सुखाची अपेक्षा करणारा बाप असतो !

तुमच्या आमच्या अस्तित्वाचे कारण असणाऱ्या, देवाच्याही आधी ज्याला पुजायला हवे तो बाप असतो !

आपल्या बापाकडे एकदा प्रेमळ नजरेने पाहा; तुमच्या मदतीसाठी आलेला देव सापडेल !

सर्वांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


- शब्दांकन 
प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०




Thursday, May 13, 2021

शिरगांव रोहिडेश्वर वरील अनोखी शंभर मंदिरे !

  १०० मंदिर समूह

"सत्वर पाव गे मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला,
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,
एकलीच राहू दे मला,
भवानी आई, रोडगा वाहीन तुला"

शिरगांव ता.वाई निसर्गसंपदा, वनराई आणि प्राचीन वास्तु असणारे गाव. गावाच्या तिन्ही बाजूंनी वेढलेला डोंगर, शेतजमिनी आणि मानवी वस्त्या असा सर्व परिसर मिळून सरासरी बाराशे हेक्टर क्षेत्र आहे. गावात अनेक मंदिरे, प्राचीन वास्तू असून काही डोंगर भागात स्थापित आहेत. शिरगांवची पांडवकालीन लेणी, प्राचीन दगडी आणि सागवानामध्ये बांधलेली मंदिरे, पाण्याच्या मुख्य प्रपातातील दगडी गोमुख, तारणगिरी महाराज जिवंत समाधी मठ, भक्कम पिंपळ पार आणि शिरगांवच्या पूर्व सीमेवर असणाऱ्या डोंगरावरील अनोखी छोटी शंभर मंदिरे ! 
सदर लेख गावाच्या पूर्व सीमेवरील मुख्य डोंगराच्या माथ्यावर असणाऱ्या अनोख्या छोट्या शंभर मंदिरांना समर्पित !
  तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले शिरगांव

•जनमानस - 
इतिहास संशोधन करीत असताना संशोधकाच्या मार्गात येणारा प्रथम टप्पा म्हणजे आख्यायिका, जनमानस, लोकांच्या समजुती आणि समाजात प्रचलित झालेल्या गोष्टी. गावच्या सीमेवरील डोंगरावर असणाऱ्या शंभर मंदिरे यांच्या बाबतीतही अश्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. खूप उंचावर असणारा डोंगर माथा, प्रखर ऊन, रानटी जनावरे आणि अनामिक भीती यांमुळे ही मंदिरे एवढी प्रसिद्ध नसली तरी सध्या हयात असणाऱ्या ज्येष्ठ माणसांकडून थोडीफार माहिती समजते.
 पूर्वेकडील डोंगर(शिखरावर १०० मंदिर समूह)

  टुमदार शिरगांव, घाट आणि वाई - वाठार मार्ग

•मंदिरांचे स्थान -
शिरगांवच्या पूर्वेकडील मुख्य डोंगरावर ही मंदिरे आहेत. समुद्रसपाटीपासून सरासरी १३०० मीटर उंचीवर असणाऱ्या डोंगरमाथ्यावर शिरगांव आणि सर्कलवाडी ता. कोरेगांव यांच्या सीमेवर मंदिरांचा समुदाय आहे. सदरील डोंगराची उत्तर बाजू सोडली तर हा डोंगर चढण्यासाठी खूप कठीण आहे. याच डोंगरातून वाई - वाठार मार्गावरील शिरगांव घाट गेलेला आहे. डोंगरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग शिरगांव गावाकडून डोंगरांचे टप्पे ओलांडत मुख्य डोंगराच्या दक्षिण सुळकेवजा कड्यातून वर जातो. हा मार्ग अतिशय बिकट असून सरळ कडे आणि दोन्ही बाजूला खोल दऱ्या असल्यामुळे धोकादायक आहे. दुसरा मार्ग उत्तरेकडील घाट माथ्यावरून सर्कलवाडी गावाच्या हद्दीतून डोंगरावर आलेला आहे. ही मळलेली पायवाट असल्यामुळे धोकादायक नाही.
 
        रोहिडेश्र्वर माथा( मंदिर परिसर)

•परिसर -
मुख्य डोंगर हा माथ्यावर उत्तरेकडे त्रिकोणी आणि दक्षिणेकडे विंचू नांगी सारखा पसरलेला आहे. माथ्यावर सरासरी अठरा एकर क्षेत्र आहे. अनोखी शंभर मंदिरे डोंगराच्या माथ्यावर त्रिकोणी भागात असणाऱ्या गर्द झाडीमध्ये वसलेली आहेत. मंदिरे जमिनीवर ठेवलेल्या अवस्थेत असून याठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष, मोठे गवत, वेली, पाण्याचे डोह आणि रानटी जनावरांचा वावर आहे. डोंगर उंची जास्त असल्यामुळे तीव्र ऊन लागते त्यामुळे सहसा या भागात कोणी जात नाही. सदरील ठिकाण अतिशय उंचीवर असल्यामुळे प्राचीन काळी येथे गुरेचराई होत नव्हती. सध्या मळलेल्या वाटेने सोडून दिलेली जनावरे माथ्यावर येत असतात. 
          पांडव गुहा असलेला उत्तरेकडील डोंगर

•मंदिरांची रचना :- 
मंदिर म्हटले की ते एका ठराविक देवतेचे असते हे सर्वमान्य आहे. या मंदिरांतील मुख्य देवता श्री. रोडजाई देवी आहे. गावच्या उत्तरेकडील डोंगराला रोहिडा किंवा रोहिडेश्वर असे नाव आहे. त्यावरूनच तिथे असणाऱ्या देवीला रोहिडजाई आणि नंतर अपभ्रंश होऊन रोडजाई असे नामकरण करण्यात आले असावे. प्राचीन काळी येथे शंभर मंदिरे होती अशी माहिती गावातील ज्येष्ठ मंडळी देतात. हल्ली येथे होणाऱ्या चराई मुळे जनावरांच्या वावरामुळे काही मंदिरे फुटलेली आहेत. काही पूर्णपणे माती आणि चिखलात रुतून गेलेली आहेत. सध्या येथे साधारण ४० सुस्थितीत, २०-३० भग्न झालेली आणि उर्वरित अजून सापडलेली नाहीत किंवा नाहीशी झालेली आहेत.
   सुरक्षित केलेली सुस्थितीतील काही मंदिरे

एकच देवता रोडजाई देवीची ही मंदिरे आहेत. सर्व मंदिरांची रचना सारखी असून ती कमी जास्त आकाराची आहेत. सर्व मंदिरे भाजलेल्या मातीची आणि मजबूत बैठकीची आहेत. सदरहू मंदिरे कदाचित कुंभार वाड्यामध्ये बनवून, आगीमध्ये भाजून इथे आणली असावीत किंवा मग त्यांना डोंगर माथ्यावर तयार केलेले असावे. एक मंदिर रचना समजून घेण्यासाठी घेतले असता ते गोलाकार आणि घुमटाकार आहे. मंदिराची उंची दीड फूट, लांबी आणि रुंदी साधारण दोन - दोन फूट इतकी आहे. ही मंदिरे एखाद्या मोठ्या रांजनासारख्या आकारातील आहेत. यांच्या भिंतीची जाडी एक ते दीड इंच आहे. 
      मंदिराच्या भग्न भिंतीची जाडी


      नुकतेच गाळातून काढलेले मंदिर

मंदिराच्या दर्शनी भागात छोटेसे चौकोनी द्वार ठेवलेले आहे. बहिर्भागावर सूर्य, चंद्र, चांदण्या आणि त्रिशूळ या आकृत्या बनवलेल्या असून साधे नक्षीकाम आहे. मंदिराच्या माथ्यावर शिखर बसवलेले असून त्याउलट मंदिराचा खालचा भाग पूर्णपणे मोकळा आणि आतील भाग पोकळ आहे. मंदिरांच्या भिंतींवर श्री.रोडजाई देवी प्रसन्न असे शब्द कोरलेले आहेत. काहींवर ती बनवताना आणि काहींवर डागडुजी करताना ही वाक्ये कोरलेली असावीत. सर्व मंदिरांचा समूह गर्द राईत होता. हल्ली त्यांची डागडुजी, साफसफाई आणि देखभाल करण्यासाठी सुस्थितीतील मंदिरे एका सुरक्षित जागी ठेवून त्यांना कुंपण करण्यात आलेले आहे. 
   काही भग्नावशेष

 •आख्यायिका :-
सदरील मंदिरांच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी जनमानसांत बोलल्या जातात. कोणी यांचा संबंध शिवकालीन मंदिरे आहेत असा करतो तर काहीजण असेही म्हणतात की या ठिकाणी वर्षातील एका पौर्णिमा आणि अमावास्येला देवीची गुप्त यात्रा भरते. देवीचे सेवक देवीची पालखी मिरवतात. लख्ख आणि डोळे दिपवणारा प्रकाश होतो वगेरे.

शेजारील गावे, मंदिरांचे स्थान, रचना आणि निरीक्षणे या सर्वांचा अभ्यास केला असता वरील आख्यायिकांच्या विपरीत अशी माहिती समोर येते. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या संतकालीन भारुडामध्ये "रोडगा" शब्द आलेला आहे. जर एखाद्या माणसाने देवीला किंवा कोणत्याही देवाला नवस बोलला असेल तर तो फेडताना देवीला/ देवाला एक विशिष्ठ पद्धतीचा नैवैद्य समर्पित केला जातो आणि नवस फेडला जातो याला "रोडगा वाहणे" असे म्हणतात. सदरील उंच डोंगरावर श्री. रोडजाई देवीचा वास आहे असे मानले जाते पण तिचे बांधीव मंदिर नाही. शिरगांव आणि सर्कलवाडी या शेजारील गावातील ग्रामस्थ याठिकाणी नवस बोलत असत हे फार कमी ज्येष्ठ माणसांकडून समजते. तसेच ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांनी कुंभार वाड्यामध्ये जाऊन अश्या पद्धतीचे मंदिर बांधून घ्यायचे ते व्यवस्थित भाजायचे आणि सर्व सामग्रीनिशी "रोडगा" वाहण्यासाठी या उंच डोंगरावर जायचे. येथे परंपरागत पूजा करायची, रोडगा वाहायचा, रोडजाई मातेचे नवीन तयार करून आणलेले मंदिर याठिकाणी स्थापित करायचे आणि वर्षानुवर्षे तिथीनुसार त्याची पूजा करण्यासाठी डोंगर चढून वर यायचे. मंदिरांच्या संख्येवरून हा नित्यक्रम वर्षानुवर्षे चालू असावा असे समजते.

सरासरी शंभर किंवा शंभरहून अधिक अशी मंदिरे या ठिकाणी असावीत असा दावा केला जातो. या सर्व माहितीवरून ही मंदिरे लोकांच्या श्रध्देचा विषय राहिलेली आहेत याची जाणीव होते. परंतु याबाबत हातावर मोजता येतील एवढ्याच माणसांना याची तुटपुंजी माहिती असावी याचे मात्र नवल वाटते. असो, काळाच्या ओघात यांची आपल्याला ओळख झाल्यामुळे गाळात रुतली असणारी मंदिरे वर काढली गेली आहेत. काहींची डागडुजी केलेली आहे. जितकी मंदिरे सुस्थितीत आहेत त्यांना सुरक्षित करून काटेरी वनस्पतींचे कुंपण केलेलं आहे. सदर परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. 

मंदिरांचे पूजन करण्यासाठी आणि नैवैद्य दाखवण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. त्यात काही वावगे नाही; ती श्रद्धेचीच गोष्ट आहे. परंतु नैसर्गिक परिसंस्थेत टाकले जाणारे प्लास्टिक, रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स, न कुजनारे कापड आणि बराच कचरा याठिकाणी साठला होता. यामुळे प्रदूषण तर होतेच पण या श्रद्धा स्थळाचे पावित्र्य सुद्धा कमी होते. तरी येथील परिसर स्वच्छ ठेवणे आणि या प्राचीन ठेव्याचे महत्त्व जपणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. पुढील पिढीला सभोवतालचा परिसर, त्याच्याशी निगडित प्राचीन गोष्टी आणि इतिहास यासंबंधी चिकित्सा असते या चिकित्सेच्या शोधातून आणि आकलनामधून व्यक्तिमत्व विकास होत असतो. यासाठीच आपण हा वारसा जबाबदारीने जपायला हवा आणि त्याचे संवर्धन करावे.  

     परिसर स्वच्छता

सोबती
उजवीकडून - निखिल, धीरज, सुशांत आणि निशांत


©शब्दांकन/छायाचित्रे -
प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०


 

  







 

Friday, April 30, 2021

शिल्पकार

शिल्पकार


         सकाळची वेळ होती. विद्याधर चे बाबा सगळीकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते. खूप वेळ झाला त्यांची शोधाशोध चालूच होती. काहीसं न राहवून त्यांनी मला विचारलं, "शारदा... ए....शारदा, माझा चष्मा पाहिलास का ग कुठं? खूप शोधाशोध करतोय पण सापडतच नाही."
 "नाही हो ! मलाच हल्ली काही नीटसं दिसत नाही. डोळ्यासमोर अंधुक प्रकाश वाटतो सारखा, तुम्ही विद्यारधरला का विचारत नाही?", मी काहीश्या कातरस्वारत म्हणाले. त्यावर ते म्हणाले, "विद्याधर.... ए....विद्याधर, अरे माझा चष्मा पाहिलास का कुठे?" 
"हो बाबा, बाथरूमच्या कट्ट्यावर आहे तो. थांबा मी आणून देतो" असे म्हणून विद्याधर ने बाबांच्या हातात चष्मा आणून दिला.
"अरे, शारदा काय म्हणतेय ऐकलस का?" बाबा विद्याधरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाले.
माझे बोलणे विद्याधर ने आधीच ऐकले असल्यामुळे तो म्हणाला, "हो बाबा. मला माहित आहे आई काय म्हणाली. मला उद्या सुट्टी आहे. उद्याच तिला आपण नेत्र रुग्णालयात घेऊन जाऊयात."

          दोघांच्या चर्चेचे शब्द मनावर चिंतेचे पडसाद उमटवू लागले. "खरंच मला दिसेल का? मला परत हे सुंदर जग पाहता येईल का?" असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होते. डोळ्यांसमोर अंधुक प्रकाशामुळे तर मनात अनेक उलट- सुलट विचारांनी अंधार करायला सुरुवात केली होती.

          दुसरा दिवस उजाडला. आज रुग्णालयात जायचा दिवस होता. विद्याधर मला रुग्णालयात घेऊन आला. तिथे डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. काही औषधे आणि डोळ्यात सोडायचे ड्रॉप्स लिहून दिले. तसेच ताबडतोब डोळ्यांचे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. ऑपरेशनची गरज पाहून डॉक्टर म्हणाले, "बुधवारी आपल्याकडे अमेरिकेहून निष्णात नेत्रविकार तज्ञ डॉ. एम.के. येणार आहेत. त्यांच्याकडून आपण हे ऑपरेशन करून घेणार आहोत." तुम्ही बुधवारी रुग्णालयात हजर रहा. 
घरी आल्यानंतर विद्याधर आणि त्याचे बाबा यांच्यामध्ये माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन विषयी सांगोपांग चर्चा झाली आणि ऑपरेशन गरजेचेच आहे असे एकमत होऊन ऑपरेशन करण्याचा निर्णय पक्का झाला. 

          ठरल्याप्रमाणे विद्याधर मला ऑपरेशनकरिता रुग्णालयात घेऊन आला. उपचारासाठी आलेले सर्वच नेत्ररूग्ण आणि त्यांचे नातेवाईक खूप वेळ डॉक्टरांची वाट पाहत बसले होते. नेहमी वेळेमध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना आज का एव्हढा उशीर होत आहे याबाबत सगळेजण कुजबुज करत होते. "आम्ही खूप लांबून आलो आहोत, उपाशी, तापाशी आलो आहोत, यांना काय त्याचं, उगीच उशीर करतात, वगैरे वगैरे" अश्या नाना प्रकारच्या आरोपांच्या फैरी झडत होत्या. महिनाभरापूर्वी घेतलेल्या अपॉइंटमेंट नंतरही अशी वाट पाहावी लागल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले होते आणि डॉक्टरांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. नेहमी दहा वाजता येणारे डॉक्टर आज साढे अकरा ते बारा च्या दरम्यान आले. 

          डॉक्टरांच्या आगमनाने सर्वजण आनंदित झाले. मरगळलेले चेहरे आशेचा किरण पाहून पुन्हा टवटवीत झाले. डॉ. एम. के. आल्यामुळे सगळ्या चर्चा हवेत विरून गेल्या आणि कोणाला सर्वप्रथम आत बोलावले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. तेवढ्यात कंपाऊंडरने मला आतमध्ये येण्याची सूचना केली. आत गेल्यानंतर डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतले. या सगळ्या कालावधीमध्ये मला मनातून एक अनामिक भीती वाटत होती. "खरंच मला दिसेल की उरलेलं आयुष्यही अंधारातच व्यतीत करावं लागेल?" अश्या शंका- कुशंका मनात येत होत्या. पण एखादं स्वप्न पहावं आणि ते सत्यात उतरावं तसं झालं आणि माझं ऑपरेशन झालं. काही कालावधीनंतर माझ्या डोळ्यावर ठेवलेल्या पट्ट्या काढून टाकण्यात आल्या. डोळे हळूहळू उघडल्यानंतर मला सगळीकडे प्रकाश दिसू लागला. अंधाऱ्या खोलीत जीवन व्यतीत करताना अचानक एखादे कवाड उघडे व्हावे आणि आपले आयुष्य प्रकाशाने उजळून निघावे अशी भावना मनात सर्वप्रथम आली. विद्याधर मला स्पष्ट दिसू लागला. मला खूप आनंद झाला होता. पण ज्या डॉक्टरांनी माझे ऑपरेशन केले होते ते मात्र तिथे उपस्थित नव्हते. त्यांचे आभार मानायचे होते पण नाईलाज होता. डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशी कंपाऊंडरने बिलाऐवजी मला एक चिठ्ठी आणून दिली. मी मोठ्या कुतुहलाने आणि थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उघडली. त्यामधील अक्षरे स्पष्ट दिसत होती...

प्रिय बाई,
          चि. महेशचा आपणास साष्टांग नमस्कार. बाई तुम्ही मला ओळखू शकत नव्हता पण मी मात्र तुम्हाला ओळखले. मला तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर पट्टी काढली की तुम्ही मला नक्की ओळखाल याची मला पूर्ण खात्री होती. तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रु येतील आणि डोळ्यांच्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशन साठी कोणतेच अश्रू लगेच येणे अनुकूल नसते याची मला जाणीव होती त्यामुळे मी तुमच्या समोर थांबलो नाही त्याबद्दल क्षमा करावी.

          तुम्हाला कदाचित आठवत नसेल २५ ते ३० वर्षांपूर्वी मी तुमच्या वर्गात शिकत होतो. शाळेकडे माझे दुर्लक्ष झाले आणि मी आईबरोबर गुरे राखण्यासाठी माळावर जायला लागलो. शाळा आणि माझ्यातील अंतर वाढायला लागले होते. अश्या परिस्थितीत तुम्ही मुलांमार्फत मला निरोप पाठवले. शाळेत येण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु मी शाळेत आलो नाही. शेवटी न राहवून, आपल्या एका विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आणि मला शिक्षणाच्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही स्वतः  सर्व मुलांना घेऊन माळावर आलात. मला सर्वांनी उचलून शाळेत आणलं होतं. माझी नाना प्रकारे समझुत घातली होती. तू खूप हुशार आहेस, अभ्यास केलास तर खूप मोठ्या पदावर जाशील असा आत्मविश्वास माझ्यामध्ये जागवला आणि खरोखरच बाई तुमचे शब्द खरे ठरले. एखाद्या न जाणत्या जखमी पाखराला घरी आणावं, त्याला प्रेम आणि माया द्यावी, त्याची काळजी घ्यावी आणि पंखात बळ आलं की पाखरानं दूर आकाशी झेप घ्यावी असाच काहीसा हा माझ्या आयुष्यामधील न  विसरण्याजोगा प्रसंग !

           आज एकच खंत वाटते, तुम्हाला ओळख करून न देताच मी परदेशी आलो आहे. आपल्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थांबलो नाही. परंतु ज्या व्यक्तीने मला घडवलं, माझ्या आयुष्याची सुरुवात करून दिली, धैर्य आणि आत्मविश्वास दिला त्या व्यक्तीला गुरुदक्षिणेच्या मोबदल्यात मला सेवा देता आली हेच माझे परमभाग्य आहे असे मी समजतो! खरंच बाई तुम्ही माझ्या जीवनाच्या शिल्पकार आहात. मी पुन्हा येईन तेव्हा अवश्य तुमची भेट घेईन. तुमचा पत्ता मी लिहून घेतलेला आहे. तुम्ही काळजी घ्यावी आणि आनंदी रहावे. तुम्हाला पुनश्च: एकदा नमस्कार !

तुमचा लाडका विद्यार्थी !
डॉ.एम.के.

शब्दांकन 
©प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले
८९७५७११०८०

Monday, April 26, 2021

शिरगांवच्या पांडवकालीन गुहा

"शिरगांवच्या पांडवकालीन गुहा"

                                 •गुहेचे प्रवेशद्वार

          आमचे गाव शिरगांव ता.वाई हे तालुक्याचे सर्वात पूर्वेकडील गाव असून गावाच्या चारही बाजूंना डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे गाव निसर्गाने परिपूर्ण आहे. गावाच्या उत्तरेकडे कोरेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चवणेश्र्वर चा डोंगर आहे. पूर्वेस गावाचा मुख्य डोंगर असून या डोंगरात वाई - वाठार मार्गावरील तीन किमी लांबीचा शिरगांव घाट आहे.

          शिरगांव मध्ये अनेक मंदिरे, मठ आणि प्राचीन बांधकामे अजूनही सुस्थितीत आहेत. यापैकी एक वास्तू उत्तरेकडील डोंगर रांगेमध्ये खोदलेली आहे. गावाच्या उत्तरेकडे असणारा डोंगर गावापासून लांब अंतरावर असल्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी एका टेकडीच्या मागील बाजूस सहसा नजरेस न पडणाऱ्या आणि पाषाणात खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात.


                   •शिरगांवच्या उत्तरेकडील डोंगर 

•रचना:-
          सदरील पाच गुहा एका मोठ्या गुहेचे भाग असून ही गुहा अखंड पाषाणात खोदलेली आहे. गुहेचे द्वार उत्तरमुखी असून चवणेश्र्वर कडे मुख असलेले आहे.  संपूर्ण गुहेची लांबी साधारण ६ मीटर, रुंदी ३ मीटर आणि उंची २ मीटर असून गुहेमध्ये १ मीटर उंचीपर्यंत पाणी साठू शकते. पाण्याने गुहा भरल्यावर ज्यादा झालेले पाणी एका झऱ्याला मिळते. पाण्याचे टाक सदृश्य असणाऱ्या या गुहेची पाणी साठवण क्षमता साधारण १६-१८ घन मीटर (१६-१८००० लिटर) एवढी आहे. या गूहेसाठी पाण्याचा स्त्रोत म्हणजे गुहेच्या पूर्वेकडील भिंतीवरील अंतर्गत वाहणारा पाण्याचा झरा. आजही एप्रिल- मे महिन्यामध्ये तीव्र उन्हाळ्यात पाण्याचा एक स्रोत गुहेच्या छतातून वाहत असतो. विशेष म्हणजे हा स्रोत ऐन उन्हाळ्यात सुध्दा कमी क्षमतेने का होईना चालू असतो ही बाब अधोरेखित करावीशी वाटते.
 
                        •अंतर्गत रचना आणि खांब

          गुहेला मध्यभागी समान अंतरावर चार खांब आहेत. प्रत्येक खांबाची लांबी आणि रुंदी सरासरी अनुक्रमे १.५ फूट असून खांबाची उंची २ मीटर आहे. हे खांब चोकोनी असून काटकोनात कोरलेले आहेत. चार खांबानी गुहा विभागून तिच्या पाच खोल्या बनवल्या आहेत. प्रत्येक खोलीचे घनफळ असमान खोदकामामुळे कमी जास्त आहे. चार खांबांवर गुहेच्या वरील डोंगराचा भार विभागला आहे. गुहेत पाण्याच्या स्त्रोतांमुळे अधोमुखी लवणस्तंभ तयार झाले असून यांची सरासरी उंची ५ ते ६ सेमी आहे. गुहेचा तळ दगडी असल्यामुळे सहसा पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते. पाण्यामध्ये सध्या जलचरांचे वास्तव्य आहे.

                 •पाण्याचा साठा(२४ एप्रिल २०२१)

•गुहा/टाक बांधण्याचा हेतू :-
          डोंगरातील या भागात उन्हाळयात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. प्राचीन काळी जेव्हा घाट रस्ता नव्हता तेव्हा येण्या - जाण्यासाठी घाट माथ्यावरून गावाकडे येण्यासाठी पायवाट असावी. ही पायवाट या गुहांच्या शेजारून जात असावी. पांथस्थ आणि इतर जीवांना पाणी मिळावे या हेतूने कदाचित या गुहा खोदून तयार केल्या असाव्यात. प्राणी, पक्षी, पाळीव जनावरे आणि मनुष्यांना पाणी मिळावे हा एक उद्देश नाकारता येत नाही. 

•आख्यायिका/दंतकथा :-
          सदरील गुहांबाबत काही आख्यायिका व दंतकथा प्रचलित आहेत. त्यामधील प्रथम आख्यायिका म्हणजे, जवळच असलेल्या चवणेश्र्वर तीर्थक्षेत्राच्या मंदिराचे बांधकाम करून अज्ञातवासात असलेले  पांडव पुढील प्रवासासाठी निघताना डोंगर उतरल्यावर त्यांनी ह्या गुहा बांधल्या असाव्यात. यामुळेच गावामधील बहुतांशी लोक या गुहांना पाच पांडवांच्या गुहा मानतात. या गुहांचे बांधकाम करून तिथे वास्तव्य करून पांडव पुढील प्रवासासाठी देगाव आणि किकली कडे मार्गस्थ झाले अशी समजूत आहे.

                             •वनस्पती विविधता
          अजून एक आख्यायिका म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या चवणप्राश उत्पादनाचे नाव चवण ऋषींच्या नावावरून ठेवलेले आहे. ज्यांच्या नावावरून भुईंज गावाला भुईंज हे नाव मिळाले त्या भृगुऋषिंचे पुत्र म्हणजे चवण ऋषी. चवण ऋषींचे आयुर्वेदातील योगदान प्रचंड आहे. या चवण ऋषींचे वास्तव्य वनौषधींनी परिपूर्ण असणाऱ्या या डोंगर भागात होते. येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सापडतात. यांचा वापर करून चवण ऋषींनी आयुर्वेदातील काही औषधे बनवली होती. त्यांच्या वास्तव्यामुळे चवणेश्र्वर हे नामकरण झाले आहे. चवण ऋषींचे वास्तव्य आणि तपश्चर्येचे ठिकाण म्हणून सुध्दा या गुहांकडे पाहिले जाते. अशा काही इतिहासाशी मिळते जुळते घेणाऱ्या आख्यायिका जनमानसात पसरल्या आहेत.

          नैसर्गिक वैविध्य असणाऱ्या या डोंगरांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरीसृप आणि वनस्पती पहावयास मिळतात. कडक उन्हाळयात सुध्दा थंडगार पाण्याची सोय या गुहा करतात. 

                   •डोक्यावर तुरा असणारा गरुड
                     •मोर आणि मादी पाऊलखुणा 


          गुहांमध्ये कोरीव काम नसल्यामुळे त्या नक्की कोणत्या काळात आणि कोणी बांधल्या याची माहिती सापडत नाही. खूप कालावधीसाठी झाडाझुडुपांमध्ये गायब झालेल्या या गूहा हल्ली ओळखीच्या झाल्या आहेत. तेथील वातावरणात कमालीची शांतता आहे. निसर्गाशी एकरूप झाल्याचा भास येथे होतो.  निसर्ग आणि मानवी स्थापत्य यांचा मेळ झालेले हे ठिकाण इतिहास प्रेमींसाठी नक्कीच आवडीचे ठरेल. 


© प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
    शिरगांव
    ८९७५७११०८०

Wednesday, December 30, 2020

सरत्या दशकाचा निरोप घेताना प्रिय पप्पांना पत्र....

प्रिय पप्पा...

          प्रिय पप्पा आज २०२० वर्षाचा शेवटचा दिवस. सरते शेवटी तुमच्या आठवणींच्या भाराने माझ्या पापण्यांचा धीर परत एकदा सुटला आणि तुम्हाला पत्र लिहावेसे वाटले. माझी खूप आठवण येत असेल ना तुम्हाला. तुम्ही देवापाशी जाऊन दहा महिने झाले. तुम्हाला आजही आठवत असेल ना आपली शेवटची भेट, दहा महिने उलटून गेले तरी कालचीच वाटणारी. "माझी कमी भासू देऊ नको, तू माझा खंबीर मुलगा आहेस, मृत्यू कोणाला नाही, हे जुने झालेले शरीर बदलून परत नव्याने सुरुवात करीन, रडायचं नाही, मी तुला सोडून कधीही जाणार नाही, परत येईन ! अगदी कालच बोलला होता तुम्ही हे सर्व. मी अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागतोय. काळजी करू नका. पण मला परत एकदा भेटायला याल का?

          "तुमचा श्वास थांबला आहे" मी ऐकलेलं हे वाक्य आठवलं की मनाचा आणि हृदयाचा थरकाप अजूनही उडतो. भर उन्हात हात - पाय बर्फासारखे थंड पडतात आणि ऐन थंडीत दरदरून घाम फुटतो. शेजारच्या जगाचे भान राहत नाही.  पप्पा, तुमच्याकडे येताना प्रत्येक पाऊल खोल दरीत गेल्याचा आणि अंगातून सर्व ऊर्जा गेल्याचा अनुभव मला विसरता येत नाही. बाप असल्याच्या आणि आपण पोरके होण्याच्या मध्ये अगदी थोडा काळ असतो. हा काळ कधीही दयाळू नसतो. तुमचं सर्वस्व, तुमचं प्रेम, भावना, नातं आणि अस्तित्व ओरबाडून नेणारा निर्दयी काळ या वर्षी मला पाहायला मिळाला. मृत्यू पुढे आर्जवे शून्य होतात. यावर्षी मृत्यू पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. तो येतो तेव्हा कोणाचंही ऐकत नाही. मात्र जाताना कानशिलात अशी चापट मारून जातो की त्याच्याशिवाय दुसरे काही सत्य असेल याचे भानच राहत नाही. तुम्हाला शक्य असल्यास त्याला शिक्षा करा, खूप शिक्षा करा, त्याने मला खूप रडवले आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये माझ्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची विचारपूस करणारे तुम्ही, आज माझ्या न थांबणाऱ्या अश्रुंच्या धारांसाठी तुमच्याबरोबर गेलेल्या मृत्यूला शिक्षा कराल ना? पप्पा मला एकदा परत दिसाल का ?
          पप्पा खर सांगा, एवढ्या लवकर जाणं तुम्हाला तरी पटलं का. मला इथे एकटे सोडून जाताना तुम्हाला थोडी भीती वाटलीच असणार. तरी असं काय महत्वाचं काम निघालं तुमचं की तुम्ही अजून परत आलाच नाहीत. एवढी धडपड केली तुम्ही मुलांसाठी आणि संसारासाठी, अर्धवट सोडून जाताना तुम्हालाही त्रास झालाच असणार. मी पहिलीत असो की नोकरीमध्ये घरातून बाहेर जाताना नियमित माझा पापा घेऊन सावकाश जा आणि नीट ये म्हणणारे तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये मला परत कधीच दिसत नाही . किती किती शोधलय मी तुम्हाला या दहा महिन्यांत. पण तुम्ही दिसत नाही. पण माझ्याजवळ असल्याचा भास नेहमी होतो. तुम्हाला शोधून दमलो की रात्र पसरते. मी रात्रीची वाट पाहत असतो. पप्पा मला तुम्ही रोज रात्री माझ्या स्वप्नांमध्ये भेटायला येता त्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आणि धन्यवाद. न चुकता तुमच्या बोलण्याची, कामांची, आयुष्याची आंदोलने माझ्या स्वप्नात होत असतात. मग जाणवतं की तुम्ही जरी माझ्याजवळ नसलात तरी माझ्यामध्ये आहात. पप्पा तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहाल ना? तुमच्याशी बोलल्या शिवाय करमत नाही हो.

          दादाच्या बाळाची वाट तुम्ही आतुरतेने पाहिली होती ना. बाळाच्या चाहुलीने केवढा आनंद झाला होता तुम्हाला. या वर्षी एकदाच बाबा बाबा हे शब्द कानावर पडण्यासाठी तुम्ही कासावीस झाला होतात. तुम्ही गेल्यानंतर सहा महिन्यांनी बाळ घरात आले आहे. त्याला आई, वडील, आजी, मावशी, आत्या, काका कोण असतात हे नंतर कळेलच पण बाबा कोण आणि काय असतात ह्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही मला ताकद द्याल ना?

          माझ्या सर्व यशांमधे शाबासकी देऊन पाठ थोपटणारे तुम्ही, माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवून सहशिक्षकांना खुले आव्हान देणारे, माझ्या शिक्षकी पदवीच्या प्रवेशासाठी मला नेणारे, तुम्ही सांगितलेली पदवी मी मिळवली आहे त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि मला शाबासकी देण्यासाठी कधी येणार आहात ते कळवा तुमची प्रकर्षाने वाट पाहत आहे. पप्पा तुम्ही नक्की याल ना?

          सगळ्यांशी बोलतोय पण पप्पा म्हणून हाक मारू शकत नाही. तुम्हाला अनुभवतोय पण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला पाहू शकत नाही. परंतु मला विश्वास आहे की तुमचे आमच्यावर लक्ष आहे. नेहमी शुभाशीर्वाद आहेत. माझ्या आयुष्याची तुम्ही पाहिलेली स्वप्ने येत्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. काळजी नसावी. अश्रू थांबत नाहीत आणि शब्दही. मला माहित आहे की माझं अश्रू ढाळत बसणं तुम्हाला सहन होणार नाही त्यामुळे अधिक त्रास न देता पाठीशी राहण्याच्या वचनावर पत्रसमाप्ती करतो. 

काळजी घ्या पप्पा !

तुमचा लाडका मुलगा,
अनिकेत



Friday, September 4, 2020

माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आवडत्या शिक्षिका सौ. सोनवणे बाई

माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आदरणीय शिक्षिका सौ. सोनवणे बाई !

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

जन्म झाल्यानंतर मानवाच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक वाढ झपाट्याने व्हायला सुरुवात होते. सर्वप्रथम मुलाला त्याची आई खूप जवळची असते. माताच त्याची प्रथम गुरु असते. आईकडूनच मुले उच्चार, भाषा आणि हावभाव असे बरेच काही शिकत असतात. वय वर्ष पाच ते सहा वर्षांपर्यंत मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास बऱ्यापैकी झालेला असतो आणि या वयातच त्याला आपली प्रथम गुरु आईस सोडून शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. हा कालखंड खूपच नाजूक असतो. या कालखंडामध्ये शिक्षकांची तारेवरची कसरत होत असते. मुलाला त्याची आई ज्याप्रमाणे वागणूक देत असते, तशीच वागणूक त्याला शाळेतील बाईंकडून अभिप्रेत असते. तीच माया आणि वात्सल्य हवे असते. हे सर्व मुलाला मिळावे आणि तो शिक्षण क्षेत्रात टिकून राहावा यासाठी शाळेतील कार्यतत्पर शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या शिक्षण आणि आयुष्याचा श्रीगणेशा करणाऱ्या माझ्या आवडत्या शिक्षिका सौ. सोनवणे बाई या ही एक कार्यतत्पर शिक्षिका, त्यांच्याविषयी माझे मनोगत आणि कृतज्ञता !

माझ्या शिक्षणाची सुरुवात सन २००१ मध्ये झाली आणि याच कालखंडात माझ्या आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या सौ. सोनवणे बाई मला वर्गशिक्षक म्हणून लाभल्या, या गोष्टीबाबत मी नेहमीच देवाचा ऋणी राहील. "बाईंनीच माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ गुणवत्तापूर्ण रीतीने रोवली होती", हे सांगताना अभिमानाने उर भरून येतो. इयत्ता पहिली ते चौथी या महत्त्वाच्या वर्षांचे शिक्षण आणि संस्कार बाईंनी मला दिले की जे आजही आदर्शवत आहेत. हेच संस्कार आणि शिक्षण मी आज माझ्या विद्यार्थांना देण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज जे काही आहे ते फक्त सौ. सोनवणे बाई यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारांमुळेच हे मी छातीठोक पणे सांगू शकतो.

शिक्षणाच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये माझ्या आईने मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगांव येथे  प्रवेश घेतला. सन २००१ पासून इयत्ता पहिलीपासून या शिक्षणप्रवासाला सुरुवात झाली. सौ. सोनवणे बाई मला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. आम्हाला सर्वप्रथम आमचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता अश्या सर्व गोष्टी शिकवल्या. बोटाला धरून ज्याप्रमाणे आई बालकाला चालायला शिकवते त्याप्रमाणे आमची शिक्षणातील सुरुवात बाईंनी बोटाला धरून केली. कपडे नेहमी स्वच्छच घालायला हवेत, कपडा फाटलेला असेल तरी चालेल पण मळका असू नये, स्वतःचे बस्कर हवे, हाता - पायाची नखे कापायलाच हवीत, केस कापून नीट विंचारलेले असावेत, डबे हात स्वच्छ धुवून खावेत, जेवताना खाली सांडायचे नाही, कचरा करायचा नाही, वर्ग स्वच्छ ठेवावा अश्या चांगल्या सवयी अगदी लहानपणापासून लावल्या होत्या. आमचा वर्ग, सर्व विद्यार्थी आणि बाई हे एक आदर्शवत कुटुंबच झाले होते. 

सौ. सोनवणे बाई साधी राहणी आणि उच्च विचासरणी या तत्वाला धरुनच आम्हाला घडवत होत्या. त्या अतिशय प्रेमळ, मायाळू, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या, चाणाक्ष तसेच प्रसंगी कडक आणि शिस्तप्रिय सुद्धा होत्या. त्यांच्या या सर्व गुणांचा  सकारात्मक परिणाम आमच्यावर नकळत होत होता. मुले नेहमी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकाने नेहमीच आपले वागणे हे आदर्शवत ठेवले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. 

आम्हाला आमचे शिक्षण चांगल्या प्रकारे मिळावे यासाठी बाईंचा नेहमीच प्रयत्न असे. अगदी पोटतिडकीने जे - जे शक्य आहे ते आमच्यासाठी करत असत. आमच्यासाठी अंकलीप्या, पेन्सिल्स आणण्यापासून ते चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे सराव पेपर उपलब्ध करण्यापर्यंत बाईंनी आम्हाला सर्व मदत केली आहे. वर्गात सर्वांना आठवड्याला बाई पेन्सिलचे आकडे द्यायच्या, त्याची सर आजही कोणत्या पेनाला येत नाही. बरोबर उत्तराला शाबासकी, बक्षीस आणि टाळ्यांचा कडकडाट मिळायचा. बाई वर्गाचे मंत्रिमंडळ बनवून कामे वाटून देत असत. वर्गात गट पाडलेले असायचे. त्यानुसार गटप्रमुख याने संपूर्ण गट नियंत्रणात ठेवणे, त्यांची माहिती ठेवणे इत्यादी कामे असत. यातून बाईंनी नेतृत्वगुण आमच्यामध्ये बानवले. बाईंची शिकवण्याची पद्धत निराळी होती. त्या अनुभव देत शिकवत असत. मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गातून विविध उदाहरणे देऊन अध्यापन करीत असल्यामुळे अध्यापन सफल होत असे. वर्गात शिकवताना बाई मुलांना कल्पनाविश्वात घेऊन जात आणि मुले भान हरपून जात. बाईंनी कोणत्याही क्षणी म्हटले की,  "आज गोष्ट ऐकणार काय?" त्याक्षणी संपूर्ण वर्ग सगळा आळस झटकून, असेल ते वही पुस्तक बाजूला ठेवून, हात बांधून बाई सांगणार आहेत ती गोष्ट ऐकायला तयार असायचा. ही गोष्ट सोपी नाही. यासाठी अध्यापन हे विद्यार्थ्यांचे वय, आकलन आणि आवड यांचा विचार करून करावे लागते. अवधान खेचण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची ही कला बाईंकडे होती. गोष्ट चालू असताना संपूर्ण वर्ग संमोहित झाल्यासारखा एकाग्र चित्ताने बाईंच्या गोष्टीकडे कान देऊन ऐकत असायचा. हे कौशल्य बाईंकडे होते आणि खरंच त्याबाबतीत आम्ही नशीबवान आहोत कारण आम्हाला कल्पनाविलास आणि परिकल्पनेतून आकलन करून घेण्याची सवय या गोष्टींमुळेच लागली आहे.

वर्गात वार्षिक नियोजन लावणे, मुलांना ते वाचावयास सांगणे, यातून मुलांना चौकस बनवण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या आकाराच्या कागदाच्या रंगीत पताका कापणे, वर्गात उंचावर मापे घेऊन आडवे - उभे दोरे बांधणे, त्यांवर पताका चिकटवणे यांमध्ये मार्गदर्शन करणे, यांतून मुलांच्यात गट आणि सहकार्य वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न, स्वतःची कामे स्वतः करणे, कपड्याला बटणे लावणे, कपडे शिवणे, कापडी पिशव्या शिवणे अशी अनेक स्वावलंबाची कामे करण्यास शिकवले,  वर्गात फलकलेखन करण्यास प्रत्येकाला संधी देणे, मोठ्याने वाचण्यास सांगणे, गट पाडून प्रश्नोत्तरे आणि त्यांचे गुण फळ्यावर लिहून चुरस वाढवणे, प्रश्नमंजुषा आणि गुणदान करणे असे विद्यार्थ्याने स्वतः पुढे येऊन करावयाचे अनेक उपक्रम बाईंनी राबवले होते आणि आम्हाला अष्टपैलू बनवण्याचा जणू चंगच बांधला होता.

बाईंचे अभ्यासाबरोबरच आमच्या शारीरिक विकासाकडे पण खूप लक्ष असायचे. दर शनिवारी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर आमच्या वर्गात व्यायामाचा आणि योगासनांचा खास तास चालू होई. प्रत्येकाने आप आपले बस्कर घेऊन यायचे, जागा तयार करायची आणि बाईंच्या पाठोपाठ आसने करायची. सर्व आसने करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असे. सर्व आसने झाल्यानंतर शेवटी शवासन असायचे. या आसनात असताना बाईंनी दिलेल्या सूचना अजूनही जश्याच्या तश्या आजही योगासने करताना आठवतात. बाईंनी दिलेला हा अनमोल ठेवा आजही मी जपला आहे. अभ्यासाबरोबर खेळातही आपण पुढे पाहिजे यासाठी खेळाच्या तासाला वेगवेगळे खेळ घेतले जायचे. या कालखंडात एकही असा दिवस नसेल की ज्या दिवशी बाईंनी आम्हाला नवे काही शिकवले नसेल. 

शालेय अभ्यासक्रमात असणारे मुख्य विषय जसे की गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांत आणि सर्वच भाषा विषयांत बाई अत्यंत तरबेज होत्या. त्यांनी आम्हालाही या विषयांत तरबेज कसे होता येईल याचे मार्गदर्शन केले आणि तसे प्रयत्न केले. चित्रकला, निबंधलेखन, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, कलाकुसरीचे काम इत्यादी मध्ये आवड निर्माण केली. ही प्रत्येक गोष्ट आपणास त्यावेळी जरी अवघड वाटत असली तरी तिचे दूरगामी परिणाम चांगले आणि उपयुक्त असतात हे मला आज समजत आहे. याच छोट्या -छोट्या गोष्टींमधून शिकून आजचा मी तयार झालो आहे. बाईंनी हे गुण मला त्यावेळी दिले आहेत की जे अजूनही उपयुक्त आहेत.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या तयारीसाठी बाईंनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. शाळेतील तास झाल्यानंतर मुलांचा अजून सराव होण्यासाठी ज्यादातास विनामोबदला बाईंनी सुरू केले. यामध्ये विविध क्लुप्त्या, सूत्रांचा वापर, योग्य अंदाज अश्या अनेक नवीन गोष्टींचे अध्यापन होत असे. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य विज्ञान आणि गणितामध्ये आम्हाला परिपक्व बनवले. तासांसाठी आम्ही बाईंच्या घरी शाळा सुटल्यानंतर जात असू. बाई वाई वरून विविध सराव चाचण्या मागवत असत. आम्हाला ओळीने बसवून अगदी कडक शिस्तीने त्या सोडवून घेतल्या जात असत. अखेर बाईंच्या प्रयत्नांना यश आले आणि आमच्या वर्गातील सर्वांना खूप छान गुण मिळाले होते. बाईंचे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष असायचे. त्याचे चांगले - वाईट गुण, सवयी, आवडी सर्व बाईंना माहीत असायच्या. आमच्याकडुन काही चुका झाल्याही पण योग्य समझ आणि वागणूक देऊन आम्हास घडवले. त्यामुळे प्रत्येकाचे मूल्यमापन आणि व्यक्तिमत्व विकास योग्य रीतीने झाला.

आम्हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण, मूल्यशिक्षण, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, काटकसर आणि भूतदया अश्या अनेक जीवनोपयोगी बाबींचे रोपण त्या लहान संस्कारक्षम वयात सौ. सोनवणे बाईंनी केले आणि आम्हाला पुढील शिक्षणासाठी आमच्या पायावर उभे केले. त्यांनी आम्हाला भविष्याच्या दृष्टीने आणि पुढील वाटचालीचा मागोवा घेऊनच शिकवले आहे. बाईंनी त्यांच्या बदली होण्याच्या अगोदरच्या कालावधीत आम्हाला म्हणजे विविध विषयांत तेज असणाऱ्या मुलांना त्या- त्या विषयांच्या उच्च वर्गांच्या शिक्षकांची भेट घालून दिली होती. यांच्यावर लक्ष ठेवा हे माझे आवडते आणि होतकरू विद्यार्थी आहेत असे बजावल्याचे आजही मला आठवते. आपल्या विद्यार्थ्यांची अशी काळजी घेणारा शिक्षक लाभणे हेच आमचे भाग्य !

सन २००१ ते २००५ ही वर्षे बाईंनी आम्हाला घडवण्यात घालवली आहेत. ही वर्षेच खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याची पायभरणीची वर्षे ठरली आहेत. आम्ही चौथी पास झाल्यानंतर बाईंची अचानक बदली झाली. सगळा वर्ग हिरमुसला होता. चार वर्ष ज्या बाईंनी आईसारखे वात्सल्य देऊन आम्हाला जपलं होतं त्या बाई आम्हाला सोडून दुसऱ्या शाळेसाठी निघाल्या होत्या. सर्वांचे दुःख सारखेच होते. पण त्या वयात ते दुःख फक्त अश्रुंच्या माध्यमातून व्यक्त होत होते. बाई अजून खूप इयत्ता आमच्याबरोबर असायला हव्या होत्या हीच खंत मनाला लागून राहिली होती. त्यादिवशी सर्वांनी बाईंना निरोप दिला आणि बाई आमच्या सर्वांच्याकडे अनेक आठवणी ठेवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ झाल्या..!

आजही जेव्हा बाईंची भेट होते तेव्हा आई नंतर मिळालेल्या खऱ्या गुरूची आठवण होते. त्यांच्याशी किती - किती बोलावे असे वाटते, माझा आनंद गगनात मावत नाही. कारण हीच ती शाळामाऊली आहे जीने मला जपलं, तयार केलं, लढण्यास शिकवलं, जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणा देऊ केला आणि स्वावलंबी बनवलं. आजच्या या पवित्र दिनी बाई आपणास शतशः वंदन आणि सादर प्रणाम करतो.

आज ५ सप्टेंबर शिक्षकदिन आपल्या प्रती आदरभाव आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपण आम्हास एक उत्कृष्ठ शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून लाभला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सस्नेह नमस्कार !

शिक्षकदिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ! आपणास आरोग्यपूर्ण आणि आनंददायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

आपला विद्यार्थी
अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०


Sunday, July 5, 2020

गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। 
गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

         आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपुरे सर

सर्व गुरुबांधवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रणाम.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या माय मराठी समूहातील प्रत्येकाने आपल्या गुरुंविषयी आदर आणि  कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या विषयी आपल्याच शब्दात मनोगत व्यक्त करावे असे ठरले ही कल्पनाच मुळात गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा वापर करून त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठीची संधी आहे !

माझ्या वर्तमान आणि गत आयुष्यामध्ये मला असंख्य गुरु लाभले. पावलोपावली आपल्या ज्ञानात आणि अनुभवात भर टाकणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय. असे अनेक गुरु मला आजपर्यंत लाभले त्याबद्दल जगतनियंत्याचे आभार मानतो. या सर्व गुरुजनांना   गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रणाम.

माझ्या आयुष्यातील अत्यंत प्रभावी आणि आवडते गुरु म्हणजे डॉ. केशव राजपुरे सर ! आयुष्याच्या महत्वाच्या ठिकाणी ते मला लाभले. लहान मुलाला जसा आईचा ओढा असतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपल्या जन्मस्थळाचा, आपल्या प्रदेशाचा आणि आपल्या माणसांचा लळा असतो आपुलकी असते आणि म्हणूनच सन २०१६ साली विद्यापीठात प्रवेश घेत असताना आपल्या अनपटवाडी गावचे सुपुत्र राजपुरे सर हे  फिजिक्स विभागात प्राध्यापक आहेत असे समजले आणि माझी पावले आपोआप त्यांच्या शोधात निघाली. विचारपूस केल्यानंतर सरांची केबिन पहिल्या मजल्यावर आहे असे समजले. परवानगी घेऊन आत गेलो. ही आमची प्रथम भेट. तेव्हा जराही वाटले नाही की, भन्नाट गुणांची खाण असलेले हे सर आपले सर्वात मोठे गुरु होतील !

सरांनी ओळख विचारली. विचारपूस केली. अभिनंदन केले आणि वेळेत हजर होण्याबाबत सांगितले.  एका साध्या विद्यार्थ्याशी त्या दिवशी झालेली ओळख सरांनी आजपर्यंत जपली आहे. सरांनी या काळात भरपूर संस्कार केले आणि संस्कार करणे ही प्रक्रिया अजून चालूच आहे. हे तेच गुरु आहेत ज्यांनी आम्हाला प्रथम ईमेल आयडी तयार करणे, इतरांना ईमेल पाठवणे, ईमेल वाचणे इ. गोष्टी शिकवल्या. तुम्हाला हे वापरता आलेच पाहिजे असा अठ्ठहास ! सरांनी स्वतः मला कॉम्प्युटर मधील एमएस एक्सेल, पावरपॉइंट शिकवले आहे. पावरपॉइंट पीपीटीस कमी वेळात कश्या बनवायच्या, त्या प्रभावी कश्या होतील, त्यात कोणत्या चुका नसाव्यात हे सर्व शिकवले. मला अवांतर वाचनासाठी पुस्तके दिली. माझ्या कुवतीनुसार सर माझ्यावर नेहमी छोटी-मोठी कामे सोपवत असत. त्यातून आत्मविश्वास वाढत असे. चुकले तर सर न रागवता परत सांगत असत. असे गुरु लाभणे म्हणजे आमचे भाग्यच !

विद्याप्रतिष्ठान बारामती येथे संशोधन कार्यशाळेसाठी जाताना सोबतचे क्षण.

सरांच्या काम करण्याच्या गतीची तुलना विभागात कोणीही करू शकणार नाही असे मला वाटते. सर अध्यापन खूप उत्कृष्ठ करतात. आदर्श शिक्षक कसा असावा याचे मार्गदर्शन सरांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या वागण्यातून आणि गुणांमधून केले. ते आम्ही टिपले आहे. अध्यापणेतर अनेक गोष्टी सरांनी मला शिकवल्या आहेत.  काही सॉफ्टवेअर सरांनी मला स्वतः शिकवली आहेत, तेही शेजारी बसून ! केवढी ही जिद्द आपल्या विद्यार्थ्याला अमुकतमुक यायलाच पाहिजे याची. सरांचे सेमिनार आणि वर्कशॉप्स असले की सर त्यांच्याबरोबर मला घेऊन जायचे. सेमिनार, वर्कशॉप्स कसे असतात? त्यांची प्रक्रिया कशी असते? त्या क्षेत्रातील मोठमोठ्या आसामी आणि व्यक्तींची ओळख कशी होईल आणि त्यांचेही सद्गुण कसे घेता येतील? या उद्देशाने सर मला सोबत नेत असत. सरांनी त्यांचा कॅमेरा कसा चालवायचा हे शिकवले. योग्य फोटो कसे काढायचे, कोणती फंक्शन्स वापरायची याचे ज्ञान दिले. मोजता न येणारे असे अनेक प्रसंग आहेत की ज्यामध्ये सरांनी मार्गदर्शन आणि ज्ञानदान केलेले आहे. अश्या प्रकारचे अष्टपैलू ज्ञान सरांनी दिले आहे त्यामुळेच एका शिष्यरुपी ओबड धोबड आकाराच्या दगडाचे रूपांतर गुणांच्या मूर्तीत करण्याचे सामर्थ्य सरांच्या मध्ये आहे असे मी मानतो.

आमची बॅच एम.एस.सी. भाग २ च्या विद्यार्थ्यांसमवेत (२०१८)

समाजात वावरताना कसे वागले पाहिजे? कसे आणि किती बोलले पाहिजे? हे शिकवले. लहानमोठ्या लोकांचा आदर ठेवावा, कोणाला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ नये, दडपण आणू नये, नेहमी सत्यच वागावे अशी शिकवण सरांनी कायम दिली. आयुष्यात शिस्त, प्रामाणिकपणा, नियोजन आणि उत्कृष्ठपणा असायला हवा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. सरांनी लेखन कला शिकवली. चुका शोधण्यास आणि सुधारण्यास शिकवले. वेळोवेळी संधी दिल्या. संधीमधूनच तुम्ही स्वतला सिद्ध करू शकता अशी त्यांची धारणा आहे.

आयुष्य मनसोक्त आणि आपल्या तत्वांनी जगायचे असते. संघर्षामध्ये प्रामाणिक आणि सच्चे प्रयत्न करावेत हे शिकवले. कितीही ताण असेल तरी सर मनमोकळेपणाने हसतात. विभागात सरांच्या सारखे खळखळून कोणीही हसू शकत नाही. ही हास्यलहर विभागातून दौडत जाते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते. सरांच्या उपस्थितीची जाणीव करून देते. सर तुम्ही गुरु म्हणून आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी अढळपणे स्थिर आहात. तुमचे मार्गदर्शन भविष्यातही आम्हाला उपयुक्त राहील. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नाही तर वर्षातील प्रत्येक दिवशी आम्ही तुमचा आदर करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करतो. गुरूंचे सानिध्य कोणालाच चुकलेले नाही अगदी ईश्र्वरालासुध्छा. इतके मोठे गुरूंचे स्थान भारतीय समाजात आहे आणि आपण या संस्कृतीचे पाईक आहोत याचा अभिमान वाटतो.

सर आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

आपण आनंदी आणि आरोग्यपूर्ण रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

-आपला विद्यार्थी
 अनिकेत दत्तात्रय भोसले
 (रविवार दि. ५ जुलै २०२०)

Sunday, May 17, 2020

प्रा. डॉ. केशव राजपुरे सर (एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व !)

यशवंत डॉ. केशव
एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व !

एका मातीचे अनेक रंग असतात
एका विचाराचे अनेक विचार असतात
एका बिंबाची अनेक प्रतिबिंब दिसतात
एका ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी उमटतात
एक एक नसतचं
त्या एका एकात अनेक एक एकवटलेले असतात अंतराळातल्या सूर्यमालेप्रमाणे ! 
तसे आमचे डॉ. केशव राजपूरे सर. *केसू येसू* पासून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास. अविरतपणे आपल्या स्वप्नांना स्फूर्तीदायक प्रयत्नांची जोड देऊन आपल्या वडिलांचे यशवंत नाव सत्यात उतरवून जीवनात यशवंत झालेले *यशवंत डॉ.केशव सर*!

          मोठ-मोठी कार्य साधतात ती दृढनिश्चय, असीम धैर्य आणि पराकाष्ठेचे प्रयत्न यांच्या बळावर ! तिथे परिस्थितीला थारा नसतो, थारा असतो फक्त लढण्याला, जिंकण्याला आणि अव्वलतेला !  विद्यार्थ्याची जिज्ञासा तीव्रतम असेल, बुद्धी अत्यंत कुशाग्र आणि निर्मल असेल तर समाज उभारणीचे कार्य अविरतपणे पार पाडणारे शिक्षकरुपी परीस त्या विद्यार्थ्याचे आणि पर्यायाने समाजाचे सोने केल्याशिवाय स्वस्थ राहत नाहीत हे ध्येय सत्यात आणणारे जिद्दी सर ! विद्यार्थी कसा असावा? तो आदर्शच का असू नये ? तो शिक्षणात आणि आयुष्यात ' टॉप ' च कसा राहील? ही मूल्ये आयुष्यभर रुजवणारे शिस्तप्रिय सर ! 'शिकून काय उपयोग?' असे म्हणून सरस्वतीची अवहेलना करणाऱ्यांना, परिस्थितीपुढे नाक घासनाऱ्यांना आणि माघार घेण्याची सवय असलेल्यांना शिक्षणरूपी यश काय असते याचे झणझणीत अंजन 'याची देही, याची डोळा' घालणारे मुत्सद्दी सर ! शारीरिक आणि मानसिक वेदनांना ठेचत आणि चुचकारत स्वाभिमान ज्वलंत ठेवून आई - वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे यश खेचून आणणारे आदर्श पुत्र ! आयुष्याच्या यज्ञात आणि यशाच्या मार्गावर साथ देणारे गुरूवर्य, मित्रमंडळी, सहकारी, आप्त आणि असंख्य विद्यार्थी यांना हृदयात स्थान देवून नाती जोपासणारे मायाळू आणि हळवे मित्र! एक उत्कृष्ठ आणि संयमी शिक्षक,  आपुलकी आणि जिव्हाळा असलेलं प्रेमळ व्यक्तिमत्व,  सामाजिक भान असलेले एक सुजाण नागरिक!  समाज आणि कार्य या दोन गोष्टी प्रेरणेवर चालतात. प्रेरणा असेल तर अशक्यप्राय गोष्टी शक्य करता येऊ शकतात. आपल्याच मार्गाने येणाऱ्या आपल्याच बांधवांना स्फुरण देऊन  उत्स्फूर्तपणे यश मिळवण्यासाठी तयार करणारी आणि प्रोत्साहन देणारी प्रेरणा म्हणजेच प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे सर!

          'बावधनच्या मातीत वेगळीच चमक आणि धमक आहे..!' या वाक्याला सप्रमाण सिध्द करून दाखवणारे एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय  राजपुरे सर ! सरांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत; अनपटवाडी येथे मातोश्री अंजूबाई यांचे पोटी दि. २४ जुलै १९७१ रोजी  झाला. मूळचे दरेवाडीचे (बावधनचीच दुसरी एक वाडी) असणारे राजपुरे कुटुंबीय अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चरितार्थासाठी अनपटवाडी येथे शेतातील वस्तीवर  स्थायिक झाले होते. हलाखीची परिस्थिती, अशिक्षित आई - वडील, शेती हाच उपजीविकेचा आधार, अन्य उत्पन्नाचे साधन नव्हते तसेच घरात इतर भावंडं (पाच बहिणी आणि एक भाऊ) असलेले हे कुटुंब सरांच्या मेहनतीमुळे पुढे  यशस्वी कुटुंब म्हणून नावलौकिक मिळवेल, हे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. वडील कै यशवंत राजपूरे यांना नेहमी असे वाटे की माझी मुले शिकून खूप मोठी व्हावीत आणि त्यांनी यशस्वी आयुष्य जगावं. कोणत्या पालकांना असे वाटत नाही परंतु परिस्थितीने तर साथ द्यावयास हवी ?  त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट, मजुरी आणि शेतीची उरफोड करणारी कामे करून व्यतीत केले. प्रतिकूलतेमध्ये रूजनारे 'बी' च पुढे जाऊन वटवृक्ष बनत असते !

          अश्या परिस्थितीत अनेक प्रसंगांना सामोरे जात सरांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. सन १९७७ ते १९८० या  काळात सरांचे इयत्ता पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी या मूळ गावी झाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेते वेळी मुलाचे नाव काय म्हणून वडीलांना विचारले असता त्यांनी 'केसू येसू राजपुरे' असे नाव लावण्यास सांगितले कारण सरांच्या आजोबांचे नाव केसू असे होते, त्यांवरील प्रेम म्हणून सरांचे केसू हे नाव अजूनही खूप ठिकाणी आपणास पहावयास मिळते. हा नावाचा किस्सा अजूनही सरांना आठवतो. पुढील आयुष्यात नावातील या गडबडीमुळे सरांना पासपोर्ट वेळेवर मिळाला नाही आणि परदेशी जायची संधी गेली.  इयत्ता पहिलीत प्रवेशित झाल्यानंतर वर्गाचा पट होता नऊ, सहा मुली आणि तीन मुले! सर, हनुमंत मांढरे, संदीप यादव, जया, प्रमिला, संगीता, सुनीता, वनिता आणि शारदा. ग्रामीण मित्रमंडळींच्या सोबत हसत खेळत आणि गावगुंडी अनुभवत सरांचे प्राथमिक शिक्षण झाले. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सर कायम ८५ टक्के च्या वरच असत. इयत्ता पहिली ते तिसरी या काळात सरांना कोदे गुरुजी हे अतिशय शिस्तप्रिय शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे सरांच्या आयुष्यात पूर्वीपासूनच शिस्तीला महत्व आहे. या काळातील दोन किस्से सांगावेसे वाटतात; एक म्हणजे लहान बहिणीच्या शिक्षणासाठी सर इयत्ता पहिली मध्ये दोन वेळा बसले होते याचा परिणाम म्हणजे त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच भक्कमपणे झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे मित्र हनुमंत मांढरे आणि सर यांनी केलेल्या दंग्यामुळे कोदे गुरुजींनी केलेली तीन तासांची ओणव्यातून पायाचे अंगठे धरण्याची शिक्षा ! सरांचा खोडकर आणि कुशाग्र स्वभाव अश्या गोष्टींनी फुलत गेला.  सरांचा अभ्यासाचा आवाका आणि कुतूहल वाढण्यामागे हेच कारण असावे. बालपणी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतःचे एक विश्व असते. सरांचे ही होते ! सरांना नेहमी प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटे. प्रश्न विचारून शिकायचं हे तेव्हाच त्यांना ठावूक होतं. त्यामध्ये ते सतत विचार करत की, हे असे का?, तसे का?, असे का नाही?, तसे का नाही? या सवयीमुळे प्रश्न पडायची सवय आपोआपच लागत गेली आणि उत्तरे मिळवण्याची सुध्दा !

           सन १९८० साली इयत्ता चौथी साठी सरांचा प्राथमिक शाळा बावधन येथे प्रवेश झाला. इयत्ता चौथी च्या केंद्र परीक्षेमध्ये सरांना ७४.२५ टक्के गुण मिळाले. नवीन शाळा, शिक्षक आणि वातावरणाचा त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. हे गुण सरांच्या अपेक्षेस उतरले नाहीत त्यामुळे त्यांनी निराश न होता अधिकाधिक मेहनत घ्यायचे ठरवले. नंतर १९८१ साली सरांना बावधन हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवी साठी प्रवेश घेण्यात आला.  या वातावरणात विविध स्पर्धा खेळून चुरस, चढाओढ आणि अव्वल राहण्याचे गुण सरांमध्ये वाढत गेले की जे अजूनही त्यांच्यात आहेत. खो - खो सारख्या मैदानी खेळांमध्ये सरांना विशेष आवड होती. या खेळामध्ये सरांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले होते आणि खो - खो चे अनेक सामने जिंकले होते. सन १९८२ ते १९८७ दरम्यान सरांचे इयत्ता पाचवी ते दहावी चे शिक्षण बावधन हायस्कूल, बावधन येथे पूर्ण झाले. हा कालखंड खऱ्या अर्थाने त्यांच्या जडणघडणीचा होता. त्यांचे जीवन यशस्वी करण्यामागे या कालखंडातील काही प्रसंगांचे अनमोल योगदान आहे.  माणसाच्या आयुष्यात प्रत्येक प्रसंग त्याला काहीतरी प्रेरणा देऊन जात असतो. त्यापैकी च एक प्रसंग म्हणजे इयत्ता पाचवीत असताना सरांना इंग्रजीच्या पेपरमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळाले होते. सरांचा पेपर अतिशय अव्वल होता. त्यामुळे इंग्रजीच्या शिक्षिका पाटील बाई यांनी तो पेपर इतर मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून संपूर्ण हायस्कुल मधील मुलांना दाखवला होता. हा प्रसंग सरांना त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आणि चैतन्यदायी आहे याची जाणीव निर्माण करून गेला. आपण जरी वाडीमधून आलो असलो तरी बावधन मधील हुशार मुलांच्या पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास सरांच्यात निर्माण झाला.  सर आजही पाटील बाईंचे ऋणी आहेत. तसेच गणित विषयाचे कै मारुती (एमएस) पवार सर यांचाही सरांवर फार प्रभाव आहे. पवार सरांची एक सवय होती. ते वर्गावर तास घेण्यासाठी आले असता दारातून येतानाच गणित सांगत येत असत आणि मुलांना सोडवायला सांगत असत. एके दिवशी पवार सर एक गणित सांगत वर्गात आले आणि गणित सांगून संपल्या बरोबरच पुढे बसलेल्या केशवनी लगोलग उत्तर दिले. उत्तर बरोबर होते. सरांनी विचारले कसे आले ते सांग. पण केशवना अचानक पद्धत सांगता आली नाही, ते घाबरले आणि पवार सरांनी त्यांना एक तास बाकावर उभे राहायची शिक्षा केली. या प्रसंगातून सरांना आपल्या आयुष्यात आत्मविश्वास किती गरजेचा आहे याचे महत्त्व समजले. पवार सरांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव सरांना शिस्त आणि आत्मविश्वास देऊन गेला. 

त्यानंतर सरांनी अभ्यासात कधीही मागे वळून पाहिले नाही. इयत्ता दहावी पर्यंत बावधन पंचक्रोशीत असलेल्या साऱ्या शाळांमधून सर प्रथमच यायचे, त्यांचे गुण ८० टक्क्यांच्या खाली कधीही आले नाहीत. ही विशेष बाब येथे अधोरेखित करावीशी वाटते. सरांचे आवडते दुसरे पवार सर म्हणजे; पीएन पवार सर! सरांच्या मार्गदर्शनाखाली केशव सर संघात असलेल्या बावधन संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाला संघांना धूळ चारली ती निव्वळ पवार सरांनी पेरलेल्या जिद्दी खेळाने. सर इयत्ता सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांच्या खो - खो संघाचे कप्तान होते, स्काऊट गाईड चे कॅम्प असो, क्रीडा स्पर्धा असो सरांनी आघाडी कधीच सोडली नाही. 'विद्यार्थी हा विद्येचा भुकेला असला पाहिजे, तो परीक्षार्थी असता कामा नये'- ही सरांची कायम धारणा !

          आयुष्यात सारं जिथल्या तिथं आणि सहजरित्या मिळालं तर आयुष्याला अर्थ राहत नाही. प्रतिकुलतेवर मात करून मिळवलेलं यशच जगण्याला आनंद देत असतं. सरांच्या बाबतीत सुध्दा असेच झाले. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सरांनी शिक्षण प्रवास चालू ठेवला. दिवा आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास केला. मित्रांची जुनी पुस्तकं तसेच बायडींग केलेल्या वह्या वापराव्या लागल्या.   वर्षाकाठी केवळ एकच गणवेष सरांना मिळत असे. हे सर्व दुःख सरांच्या वाट्याला आलेलं होत. काही प्रसंग डोळ्यांमध्ये पाणी आणणारे होते तर काही प्रसंग मन पिळवटून टाकणारे! असाच एक प्रसंग: अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असणाऱ्या बी. टी.पिसाळ या पी. टी. च्या सरांकडून त्यांना शिक्षा मिळाली. एके दिवशी बी. टी. पिसाळ सर मैदानावर मास ड्रिल चा सराव घेत होते. त्या वेळी सर्वात पुढे टेबलवर उभे असलेल्या  केशव सरांनी पाठीमागे पँट फाटल्यामुळे  इन शर्ट केला नव्हता. त्यामुळे पिसाळ सरांनी त्यांना शिक्षा केली होती. नंतर जेव्हा त्यांना कारण समजले तेव्हापासून कधीही त्यांनी सरांना इन शर्ट का केला नाहीस असे विचारले नाही. दुसऱ्या दिवशी पिसाळ सरांनी त्यांना पँट आणून दिली.  स्वभावाने शांत आणि लाजाळू असणाऱ्या सरांना परिस्थितीचे चटके जाणवत होते पण पर्याय नव्हता. जे होतं त्यातच समाधान मानावं लागत होतं. सगळ्या गोष्टींवर मात करत सर प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत होते. 

बावधन जनता सहाय्यक मंडळ दरवर्षी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बावधन बगाडाच्या वेळी बक्षीसे देत असत. सरांनी पाचवी ते दहावी दरम्यान सलग सहाही वर्षी ही बक्षिसे मिळवली आहेत. त्याकाळी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरांना 'पेड की गवाही' या नाटकामध्ये एका वकिलाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. ती त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी करून दाखवली. हे असतं लढत राहणं!  हे असतं जीवनाचा खरा आनंद घेणं!  इयत्ता दहावीच्या वर्गात असताना सरांची खरी प्रतिभा प्रकटली. ते त्यांचा सर्व अभ्यास दिवसाच करत असत कारण रात्री घरात लाईट नसायची. दिवसभर शेतात काम करत त्यांनी दहावीचा अभ्यास खूप मेहनतीने पूर्ण केला. परिणामतः जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यांच्यामुळे सर १९८७ साली दहावीच्या शालांत परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्र आणि पंचक्रोशीत प्रथम आले. मूळ गावी दरेवाडीतील ग्रामस्थांनी ढोल वाजवत आणि गुलाल उधळत सरांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. ही शाबासकीची थाप सर कधीही विसरू शकत नाहीत. साधारण दिसणाऱ्या असाधारण विद्यार्थ्याचे यश होते ते ! कष्टकरी घरे सुध्दा असे बुद्धिवंत समाजास देत असतात याचीच ही प्रचिती नव्हे का ? 

          दहावीच्या निरोप समारंभामध्ये इच्छा असताना सरांना रंगीत ड्रेस घालायला मिळाला नाही. सगळे मित्र रंगीत ड्रेस घालून आले होते. सरांकडे वर्षाकाठी मिळणारा एकच पांढरा शर्ट आणि खाकी पँट असणारा ड्रेस होता. ते तोच गणवेष घालून समारंभात आले होते. कठीण परिस्थितीत तोच त्यांचा मित्र होता! आजही जेव्हा आपण सरांचे विद्यार्थी दशेतील फोटो पाहतो तेव्हा मनामध्ये माणसाची परिस्थिती आणि त्याची बुद्धिमत्ता यांचे चाललेले द्वंद्व थैमान घालते. वार्षिक यात्रेनिमित्त वर्षातून एकदाच सरांना, त्यांच्या बहिणींना आणि आईला त्यांच्या आजोळी म्हसवे, येथे जायला मिळत असे. परंतु पैश्यांची कमतरता असल्यामुळे ही सारी मंडळी पहाटेच घरातून निघून मजल दर मजल करत रानातून, डोंगरातून आणि खिंडीतून  पाऊलवाटेने तब्बल १५ कि.मी. चालत जात असत आणि परत तेवढंच अंतर कापून माघारी अनपटवाडी ला घरी येत असत. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सर आणि त्यांचे वडील वाईला साहित्य आणण्यासाठी ८ कि.मी. चालत जात असत आणि रात्री परत माघारी येत असत. 

माणसाला आयुष्यात दोन गोष्टी महान बनवत असतात; एक म्हणजे त्याने सोसलेले कष्ट आणि त्याने घेतलेले परिश्रम ! मोठ्या कष्टांनी दहावी ला खूप गुण मिळाले होते. आता कॉलेज ला प्रवेश घ्यावा लागेल पण त्यासाठी पैसे आणि गणवेष पाहिजेत. कॉलेजला जायचे असेल तर जुना गणवेष घालून जायला कमीपणाचे वाटे. म्हणून एकदा सरांनी आईला नवीन रंगीत ड्रेस घेण्यासाठी विचारले असता पाच भावंडांच्या देखभालीमध्ये गुंतलेल्या आणि संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईने असमर्थता दाखवली. ही असमर्थता सरांना कित्येक वेळा कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. त्याच क्षणी सरांनी ठरवले की आपणही वडिलांबरोबर मजुरी करायची कॉलेज साठी आपला ड्रेस आपण घ्यायचा. भर उन्हात, अनवाणी पायांनी सरांनी विहिरीतून दगडाच्या पाट्या बाहेर काढण्याचे काम स्वीकारले. सरांनी त्या वयात पोटात गोळा येईल एवढे काम केले. विहिरीच्या तळामध्ये काम करणारे वडील आपल्या मुलाचं काम पाहायला आले आणि त्यांना पाहून सरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. वडिलांनी त्यांना कवटाळले आणि त्या क्षणी सरांना वडील आणि कष्ट या जोडीचे दाहक सत्य उमगले. सरांनी त्या वेळी तीस रुपये हजेरीने सहा दिवस काम केले. त्यातून त्यांना एकशे ऐंशी रुपये मिळाले. आपल्या आयुष्यातील पहिला रंगीत ड्रेस सरांनी  स्वकमाईतून घेतला. जीवनाच्या प्रवासात येणारे असे आसू आणि हसू चे प्रसंग माणसाला मानसिक बल देत असतात !

          उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे की कुटुंबासाठी काम करून पैसे कमवायचे या द्विधा मनःस्थितीत सर अडकले होते. खंडाळा येथील सरांचे दाजी स्व. सदाशिव कृष्णा शिर्के यांनी या काळात सरांना आधार दिला. त्यांचे कापड व्यवसायाचे दुकान होते. सुट्टीच्या कालावधीमध्ये सर कापड दुकानावर काम करू लागले. शिक्षण चालू राहावे म्हणून खंडाळ्याच्या राजेंद्र विद्यालयामध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु दाजींच्या ओळखीच्या शिक्षकांनी सांगितले की एवढे उत्तम गुण मिळून सुध्दा कॉलेज ला प्रवेश का घेतला आहे, तुम्ही डिप्लोमा साठी प्रयत्न करावा. तद्नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सिव्हील डिप्लोमा साठी सरांना प्रवेश मिळाला. दहावीचे गुण आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे डिप्लोमा करण्यासाठी मानसिक तयारी केली. त्यानंतर वसतिगृहात सरांची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरांना नाईलाजाने कराड येथील डिप्लोमाचा प्रवेश रद्द करावा लागला. नियतीच्या मनात नक्की काय असते मनुष्याला कधी समजले आहे का ? दाजींचा रोष ओढवून, वेळ न दवडता वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये सप्टेंबर १९८७ मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. सर कॉलेजमध्ये दहावीच्या गुणांनुसार  अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विसावे होते. सरांना कॉलेज साठी लागणारे साहित्य, पास आणि इतर सुविधांची पूर्तता वडिलांनी मजुरी करून  केली. महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा सर सांगायला विसरत नाहीत. विज्ञान विभागाची जर्नल्स घेण्यासाठी सरांना पैशाची आवश्यकता होती. त्यांनी वडीलांना ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांनी गावातील संपतराव गोळे यांचेकडून उसने पैसे घेऊन सरांना दिले. सर नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले, त्यांनी पैसे कंपासबॉक्स मध्ये ठेवले होते. प्रॅक्टिकल वेळी त्यांचे पैसे कोणीतरी चोरले. गरीबीमध्ये प्रामाणिक असणाऱ्या माणसावर नियतीने नकळत केलेले वार फार जिव्हारी लागतात ! घरी आल्यावर झाला प्रसंग वडीलांना सांगितला. वडील म्हणाले, "असुदे, तुला मी परत पैसे देईन !" त्यानंतर वडिलांनी आणखी काही दिवस मजुरी करून आलेले पैसे जर्नल घेण्यासाठी सरांना दिले. असा प्रत्येक प्रसंग काही ना काही ज्ञान देऊन जात होता, सरांना जाणतं करत होता !

          नवीनता, कष्टाळू वृत्ती, सोशिकता, प्रामाणिकपणा आणि रोज नवनवीन शिकण्याची भूक असणारा हा विद्यार्थी कॉलेजमध्ये सुध्दा चमकत होता. सरांनी सन १९८९ साली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या ग्रुप मध्ये ८६ टक्के गुण मिळवले तसेच बारावी शास्त्र शाखेत एकूण ८२  टक्के गुण  मिळवून महाविद्यालयात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला. सरांची विशेषता म्हणजे त्यांनी दहावी आणि बारावी साठी एकही शिकवणी लावली नव्हती. केवळ प्रतिभा आणि आंतरिक इच्छेच्या बळावर सरांनी एवढे मोठे यश मिळवले होते. बारावी झाल्यानंतर शिक्षण आणि कामधंदा यांचा नाच सरांच्या डोळ्यांपुढे थैमान घालत होता. सरांचे मोठे बंधू सुध्दा शिक्षित होते. त्यांनी एम. कॉम. पूर्ण केले होते आणि त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. नोकरी सहजासहजी मिळतं नसल्याने घरखर्च वडिलांनाच भागवावा लागत होता आणि हीच गोष्ट सरांना सारखी बोचत होती. परंतु पर्याय नव्हता. सर बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. सगळीकडे त्यांचे कौतुक आणि सत्कार होत होते. या सगळ्या धावपळीत सरांनी परत खंडाळ्याच्या दाजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. सरांनी डिप्लोमाचा प्रवेश रद्द केल्याचा मनातील रोष बाजूला ठेवून दाजींनी मोठ्या मनाने  त्यांच्या पुढील शिक्षणाचा बोजा परत एकदा उचलण्याची तयारी दर्शवली. सरांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय माणसातील दाजीरूपी देवाने घेतल्यानेच पुढील शिक्षण सोपस्कर झाले.  

          सन १९८९ साली नातेवाईकांनी दाजींना विनंती केल्यामुळे लोणंद येथील सायन्स कॉलेजमध्ये बी. एससी. साठी सरांनी प्रवेश घेतला. सर यावेळी त्यांच्या खंडाळ्याच्या दाजींच्या येथे राहायला होते.  बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी इतरत्र कोठेही प्रवेश न घेता आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो याची दखल महाविद्यालयाचे प्राचार्य कै. दिपा महानवर यांनी घेतली. सरांच्या ठायी असणारी चमक आणि हुशारी महानवर सरांनी ओळखली होती. त्याचबरोबर सरांच्या परिस्थितीची सुध्दा माहिती त्यांना झाली होती. महानवर सरांनी प्रवेशावेळी दाजींना सांगितले होते की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगलं करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवा मी त्याला शैक्षणिक मार्गदर्शन करतो, असे आश्वासन महानवर सरांनी दिले. सरांच्या गुणवत्तेला त्यामुळे वाव मिळाला. दाजींचा भक्कम आधार मिळाला. महानवर सरांना त्यांच्या महाविद्यालयाचा हिरा सापडला ! त्याला पैलू पाडण्याचे काम चालू झाले. 

सरांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर सरांनी स्वतःचा दिनक्रम बनवला होता. ते भल्या पहाटे उठत असत. स्वतः सर्व कामे आवरून सकाळच्या पावणेसहाच्या बस ने लोणंद ला जात. तिथून एक किलोमीटर चालत महाविद्यालयात जात असत. नित्यनेमाने सर्व लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स करत असत. बऱ्याचदा डबा नसल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशीच असत. सकाळी घरातून निघताना रात्री शिल्लक राहिलेले अन्न खावून सर कॉलेजला निघत असत. कृतज्ञतेची भावना असलेल्या मनाला दुसऱ्यांना त्रास देण्यास अजिबात आवडत नसावं ! महानवर सर स्वतः प्राचार्य असूनही नेहमी सरांची जातीनिशी चौकशी करत असत. सरांना लागणारे प्रश्नसंच, पुस्तके, नोट्स ते मागण्या अगोदरच मिळत असे. एक पालक आपल्या पाल्याची जशी जबाबदारी घेतो तशी जबाबदारी महानवर सरांनी घेतली होती. त्याचबरोबर दाजींनी सुद्धा सरांना आपला एक मुलगाच समजून सांभाळ केला. कॉलेज मध्ये सरांच्या अभ्यासाची चौकशी वारंवार होत असे. त्यांना नेहमी विशेष व्यक्ती प्रमाणे वागणूक मिळत असे. शेवटी म्हणतात ना हिऱ्याची ओळख रत्नपारख्यालाच असते !  

हे करत असतानाच सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, महानवर सरांच्या जिद्द, चिकाटी आणि कोणत्याही प्रकारे हाती घेतलेले कार्य पूर्ण करून घेण्याच्या तळमळीतून आणि गुरूजनांना त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणाऱ्या सरांच्या बेजोड कष्टांमधून 'न भूतो, ना भविष्यती' असे यश महाविद्यालयाने मिळवले होते. सन १९९२ साली बी. एससी. मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून (सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर) प्रथम येण्याचा बहुमान सरांनी मिळवला होता. बी. एससी. च्या तिन्ही वर्षांत ९१ टक्के गुण मिळवून सरांनी बाजी मारली होती. लोणंदच्या विनाअनुदानित महाविद्यालयाचा विद्यार्थी भरमसाठ गुण मिळवून संपूर्ण शिवाजी विद्यापीठात प्रथम येतो याचे किती तरी जणांना नवल वाटले ! योगायोगाची गोष्ट म्हणजे सर बी. एससी. मध्ये विद्यापीठात प्रथम आले आणि त्याच वर्षी महाविद्यालयास पूर्ण अनुदान मिळाले. महानवर सरांच्या कष्टाचे चीज झाले होते. हाडाचे शिक्षक कसे असतात याचे उदाहरण म्हणजे महानवर सर! महानवर सरांच्या ठाई असलेले पद्धतशीरपणा, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण सरांनी अवलोकले. त्यांच्या आत्मविश्वास वाढीस चालना मिळाली. सरांच्या पंखांना बळ देण्याचे काम येथेच झाले. 'केशव आपल्याला एम. एससी. करायची आहे !', हे महानवर सरांचे बोल अजूनही सरांना आठवतात.  परीस ज्याला स्पर्श करेल त्याला सुवर्णमय करतो. सरांच्या आयुष्यात आलेले महानवर सर हे त्यांच्यासाठी आदर्श परीसच होते. एक हक्काचे आधारवड होते.

          खेड्यातील गरीब कुटुंबातून शिक्षण घेतलेल्या एका मुलाने आपल्या कुशलतेने मिळवलेल्या यशाचा यथोचित गौरव व्हावा असे महानवर सरांना नेहमी वाटे; विशेषतः हा गौरव तत्कालीन मुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे ही त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांची बदली रामानंदनगर येथे झाली असतानाही त्यांनी तत्कालीन सहकार मंत्री आणि आमदार कै.पतंगराव कदम यांच्या हस्ते सरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. उद्देश एकच, आपण घडवलेला मुलगा जीवनात यश तर मिळवणारच आहे पण त्याला आणि त्याच्या सारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रेरणा मिळायला हवी! खरच अशा शिक्षकांची आज समाजाला नितांत गरज आहे. महानवर सरांनी एवढ्यावरच न थांबता सरांच्या गावी अनपटवाडी येथे सरपंच आणि पंचायतीच्या सदस्यांना कॉलेज चे पत्र पाठवून केशव सरांचा आमदार मदनराव पिसाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यास सांगितले होते. त्यांनी स्वतः येण्याची तयारी दाखवली होती. ते पत्र अजूनही सरांच्या संग्रही आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तयार झालेले हे मैत्रीचे आणि स्नेहाचे नाते आजीवन टिकले आहे.

          सन १९९२ साली बी. एससी. त ९१ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महानवर सरांचे मार्गदर्शन घेऊन सरांनी एम.एससी. करायचे ठरवले. त्यांनी याकरता शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रवेश अर्ज केला. बी. एससी. मध्ये विद्यापीठामध्ये प्रथम आल्यामुळे सरांना एम.एससी. साठी प्रथम क्रमांकाचा प्रवेश मिळाला. सरांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू झाले. सर विद्यापीठात आल्यावरही महानवर सरांचे त्यांच्यावरील आणि अभ्यासावरील लक्ष कमी झाले नव्हते. पत्राद्वारे कायम मार्गदर्शन आणि चौकशी ठरलेली असायची. दाजीही अभ्यासासाठी किमान आवश्यक खर्च म्हणून दरमहा पाचशे रुपये पाठवत असत.  या शिक्षण कालखंडात सरांच्या जीवनात अत्यंत गरजेची स्थित्यंतरे आली. एम.एससी. दरम्यान सर विद्यापीठ वसतिगृहात राहत असत. प्रथम वर्षी त्यांना इंग्रजीचे डॉ. विवेकानंद रणखांबे हे मित्र लाभले. दोघेही वसतिगृहाच्या खोलीत एकत्र राहत असत. विवेकानंद रणखांबे यांचा स्वभाव अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध होता. वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारा आदर, नम्रता, सुशील स्वभाव आणि शांत वृत्ती हे गुण केशव सरांनी त्यांच्याकडून आत्मसात केले. नातेसंबंध जपण्याची कला सरांना याच मित्राकडून शिकायला मिळाली. द्वितीय वर्षात असताना त्यांचे लोणंद येथील गणिताचे जुनिअर मित्र श्री. अरविंद तावरे हे रूम पार्टनर म्हणून लाभले. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, परिपूर्णता तसेच सभ्य वर्तन या सर्वांचा प्रभाव सरांवर होत होता. माणसाला आयुष्यात भेटलेली माणसेच घडवत असतात, खोल परिणाम करत असतात हेच खरं!

          एम.एससी. च्या परीक्षेत सन १९९४ साली सरांनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी पुरस्कार' मिळवला. जिद्द, चिकाटी आणि चौकस बुध्दीने ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. एम.एससी. झाल्यानंतर काही काळ सर गावी राहिले. सरांना नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. विद्यापीठामधील प्रपाठक प्रा. ए. व्ही. राव सर वारंवार पत्र पाठवून सरांना संशोधनासाठी येण्यास आग्रह करत असत. त्यानुसार संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे सरांनी नोकरीशोध थांबवून प्रा. ए. व्ही. राव सरांकडे ऑक्टोबर १९९४ साली युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये डॉ. प्रताप वाघ सरांच्या सहकार्यातून प्रोजेक्ट फेलो म्हणून काम सुरू केले. त्यांना दरमहा अठराशे रुपये एवढे मानधन मिळत असे. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने या ठिकाणी काम केल्यानंतर सुध्दा काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी. करू शकले नाहीत. दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ साली सरांच्या वडिलांचे निधन झाले. सर त्यांच्या सेवेत कायम व्हावेत आणि लवकर स्थावर व्हावेत अशी वडिलांची नेहमी इच्छा होती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याची इच्छा वडिलांनी सरांकडे बोलून दाखविली होती, ती सुद्धा अपुरी राहिली. आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन सुध्दा सरांना करता आले नाही. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी असताना वडिलांचा मोठा आधार संपला होता. सरांना मानसिक आणि भावनिक आधाराची गरज होती. अशा वेळी त्यांचे मित्र डॉ. प्रताप वाघ यांनी आलेल्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सरांना धीर दिला. वर्षभर त्यांचा आर्थिक बोजाही वाघ सरांनी उचलला. मनमिळावूपणा, पडेल ते कष्ट करण्याची तयारी, सुस्वभाव हे वाघ सरांचे गुण त्यांना मिळाले आणि ते त्यांनी आचरणात सुध्दा आणले. आयुष्य नेहमी माणसासाठी ज्ञानदानाचं कार्य करत असतं, माणसानं मात्र विद्यार्थी होऊन ते अवगत केलं पाहिजे!

          सरांना आता नोकरीची नितांत गरज भासू लागली होती. पण वस्तुस्थितीच अशी होती की नाईलाजास्तव सर्व काही बघत राहावं लागत होतं. पुढे जून १९९६ साली सर डॉ. सी.एच. भोसले (प्रपाठक, भौतिकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने रुजू झाले. संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम स्टोरेज घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. संशोधन करत असताना भोसले सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल परिणाम सरांवर झाला. त्यांचे अनेक गुरुमंत्र सरांना शिकायला मिळाले. ज्ञानाबरोबरच तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनात पाहिजे ते ध्येय साकार करू शकता आणि कठीण पेचप्रसंगामध्ये मार्ग काढू शकता अशी शिकवण भोसले सरांकडून मिळाली. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे धडे सरांकडून मिळाले.  भोसले सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने त्यांची शिकवण्याची हातोटी आत्मसात करता आली. हे करत असतानाच ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून १९५० रुपये मानधनावर दोन वर्ष आणि सिनियर रिसर्च फेलो म्हणून ३२५० रुपये मानधनावर एक वर्ष संशोधन कार्य केले आणि त्यानंतर त्यांचा उज्वल भविष्यकाळ त्यांना समोर दिसू लागला! प्रचंड कष्ट आणि जीव ओतून केलेल्या संशोधनामुळे जुलै १९९९ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर सरांची निवड झाली. सर्व पराकाष्टांचे फळ मिळाले! सर या पदावर राहून अध्यापनाचे कार्य अत्यंत तळमळीने आणि मन लावून करत असत. कितीही संकटे आली तरी, त्रास झाला तरीही प्रयत्न न सोडता त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरच यश प्राप्त होते अशी सरांच्या कार्य करण्याची शैली होती.

          गत जीवनात लाभलेले प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, महानवर सर आणि डॉ. भोसले सर या सर्वांच्या ज्ञानाचा, आत्मविश्वासाचा आणि मेहनतीचा परिपाक म्हणजे सरांचे एम.एससी. च्या वर्गांना होत असलेले दर्जेदार आणि ज्ञानात्मक अध्यापन! १९९९ सालापासून ते आज तागायात सरांचे अध्यापन लाभलेला एकही विद्यार्थी असा सापडणार नाही की ज्याची अध्ययनाची भूक भागली नसेल. आजही विद्यार्थी सरांच्या शिकवण्याच्या पद्धतींची, विवेचनाची आणि मिळालेल्या ज्ञानाची आठवण काढत असतात. सरांचे क्लासिकल मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि सॉलिड स्टेट फिजिक्स चे लेक्चर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. शिकवताना सर अगदी निष्ठेने आणि देहभान विसरून शिकवितात आणि मुले मुग्ध होऊन जातात. मुलांच्यात आत्मविश्वास वाढावा, विषयज्ञान वाढावे यासाठी विभागात सेमिनार चे आयोजन होत असते. तिथे प्रश्नोत्तराचा तास चालतो. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुलांची त्रेधातिरपीट उडते. उद्देश हाच की, मुलांनी सखोल अभ्यास करावा, वरवर किंवा परीक्षेसाठी अभ्यास नको! निश्चयी स्वभाव, विषयाचे सखोल ज्ञान, समजून सांगण्याची कला, रंजकता, चिकित्सक वृत्ती, विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, अवधान खेचक क्षमता, बुद्धीचातुर्य, कमालीची कल्पकता आणि नवनिर्माण क्षमता, प्रसंगी विनोदी वृत्ती आणि कठोरता या साऱ्यांनी बनलेले आदर्श प्राध्यापक म्हणजे राजपुरे सर! भौतिकशास्त्र कसे शिकवावे याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे सरांची लेक्चर्स. मुलांनी स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत, त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत, रेडिमेड नोट्स वापरण्याची सवय सरांना अमान्य आहे, सतत सराव केला पाहिजे, अव्वल राहिले पाहिजे, कितीही त्रास झाला तरी विद्यार्थ्यांनी यशाचा शॉर्टकट शोधू नये अशी परखड मते सरांची आहेत. विद्यार्थी विद्या मिळवण्याच्या हेतूने आलेले असतात त्यांना तुम्ही परीक्षार्थी बनवू नका, त्यांना रोबोट्स, कारकून, पंगू बनवू नका, स्पून फिडिंग करू नका, त्यांच्यात तुम्ही स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वाढवा या मंत्राचे बाळकडू शिक्षक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर नेहमीच देत असतात. 'कल करे सो आज कर, आज करे सो अब !' या काव्यपंक्तीनुसार विद्यार्थ्यांना काम सांगितल्यानंतर ठराविक वेळेनंतर सर कामाचा पाठपुरावा करतात, ते काम गुणवत्तापूर्वक पद्धतीने करून घेतात. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी त्रस्त होतात पण यामुळे  विद्यार्थ्यांना त्वरीत अचूकपणे कामे करण्याची सवय लागते. ही पद्धत सरांची कार्यशैली रेखांकित करते!

          सरांच्या 'सेप्टम विद्युत घट' यावरील शोध प्रबांधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० मध्ये बहाल केली. या संशोधनासाठी सरांना मार्गदर्शक म्हणून डॉ. सी.एच.भोसले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सप्टेंबर २००० मध्ये ऑस्ट्रियातील मायकल न्यूमन स्पेलार्ट या जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञाने सरांना पुढील संशोधनासाठी फ्रान्सला निमंत्रित केले होते. पण पासपोर्ट वेळेवर न मिळाल्याने सरांना ही सुवर्ण संधीच सोनं करता आल नाही. कदाचित याच भूमीची सेवा सरांच्या हातून घडणार होती ! पुढे महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या भौतिकीय विज्ञान विषयातील अधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एसइटी) - सेट परीक्षा सर पास झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. भौतिकशास्त्रातून सेट पात्रता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जीचा निकाल तेव्हा १ टक्क्यांहून कमी लागत असे. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यातील अनुभवाने आलेल्या प्रतिभेमुळे व त्यांच्यात निर्माण झालेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि निश्चयी स्वभावामुळे ! 

          परिस्थितीला नमवत जिद्दीने अध्यापनात आणि संशोधनात कार्य करणाऱ्या सरांच्या व्यक्तित्वाची छाप विद्यापीठ प्रशासनावर पडली होती. त्याचाच परिपाक म्हणजे केवळ गुणवत्तेच्या जोरावर सर २०११ साली भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक झाले. गत दशकापासून अध्यापन आणि संशोधनाचे कार्य अत्यंत तळमळीने केले असल्यामुळे २०१४ साली सरांची सरळ सेवा भरतीद्वारे प्राध्यापक पदी नियुक्ती झाली. सध्या सर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र विषयात सर्वात अव्वल अशा प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. सरांची शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय अशी ख्याती आहे. 


          महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स ने ३० ऑक्टोबर २०१५ रोजी सरांना कायमचे सदस्यत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. आत्तापर्यंत सरांचे एकूण २०० शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये दोन समीक्षा शोध निबंधांचा देखील समावेश आहे. त्यांच्या 'पाणी शुद्धीकरणा'  संबंधित वैशिष्ठ्यपूर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. सोलर सेल्स, थिन फिल्म्स, फोटोकॅटॅलीसीस ऑफ वॉटर हे सरांच्या संशोधनाचे विषय आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या सहा विद्यार्थी त्यांच्याकडून पी.एच.डी. साठी मार्गदर्शन घेत आहेत. सदरील विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पुढे दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदी काम करत आहेत. सरांनी केंद्र सरकारच्या निधीतील पाच संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा योग्य विनियोग करून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अद्ययावत संशोधन सुविधांची निर्मिती करून विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधेमध्ये भर घालून सुसूत्रता आणली आहे. स्वतः बरोबरच इतरांचा सुध्दा विकास करण्यात असलेली  सरांची आवड त्यांच्या अविरत कार्यातून प्रतीत होते.

          विद्यापीठाचे 'गोल्ड मेडलिस्ट' राहिलेले सर सध्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधनातून शिवाजी विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यात मोठे प्रयत्न करताना दिसून येतात. सरांचा संशोधनातील एच. इंडेक्स ५० आहे. तर सरांच्या संशोधनास ७१७४ सायटेशन्स मिळाली आहेत. यावरून सरांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता जाणकारांच्या सहज लक्षात येईल. त्यांचे कर्तृत्व, क्षमता आणि शैक्षणिक यश या सर्वांचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि एसएआयएफ या केंद्रीय सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. अलीकडेच त्यांची विभागप्रमुख म्हणून चार वर्षांची मातृसंस्थेची सेवा झाली. सर बऱ्याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पी.एच.डी. साठी चे परिक्षक आहेत. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या नेमणूका करण्यासाठी कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध महाविद्यालयांच्याही अभ्यासमंडळांचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या लोकल इन्कवायरी कमिटी (एल.आय.सी.) तसेच टेक्निकल कमिटी अश्या विविध समित्यांवर सरांच्या कार्याची छाप आहे. एवढा प्रचंड कामाचा पसारा सांभाळत असताना सरांना याचे गमक विचारले असता सर सांगतात की, " तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, शिस्तबद्धपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही सुद्धा मोठमोठी कामे करू शकता. कोणत्याही कामात उत्कृष्ठपणा आणता आली पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला मिळाले पाहिजे !"

          अध्यापन आणि संशोधन याबरोबरच सरांनी सामाजिक कार्याचीदेखील आवड जोपासली आहे. सामाजिक आपुलकी आणि जिव्हाळा जपत ते समाजासाठी उपयोगी कार्ये करत असतात.  मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ, अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. हि संस्था आवश्यक कौशल्य आणि आर्थिक मदत देऊन गावाच्या विकासासाठी समर्पित आहे. शहीद परिवारासाठी कार्य करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. 

          आपल्याला जीवनात आणि समाजकार्यात मिळालेल्या यशात बऱ्याच व्यक्तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे असे ते मानतात. त्यांचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकता आणि नम्रता ही त्याच्या वडिलांची भेट आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचे आणि कष्टमय आशीर्वादांचे मोठे योगदान आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, हिय्या दाखविण्याची कला आणि हिंमत न हारण्याचा गुण सरांना आईकडूनच मिळाला. सरांना बी.एससी. दरम्यान आणि त्यांनतर आपल्या मुलापलीकडे माया लावणारी आणि संगोपण करणारी त्यांची बहीण फुलावती (आक्का) म्हणजे त्यांची दुसरी आईच ! त्यांचे वडीलबंधू श्री. बाळासाहेब राजपुरे (दादा) हे उच्च विद्याविभूषित असूनही सुरुवातीपासूनच गावाकडील कुटुंबाची तसेच शेतीची सर्व जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत त्यामुळे सरांना हे सर्व शक्य झाले. आपल्या यशात मोठ्या बंधूंचा मोठा वाटा आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांचे भाचे राजू शिर्के यांचे त्यांच्याविषयीचे बंधुतुल्य स्नेह आणि सर्व गोष्टींत सहकार्य, पाठिंबा आणि आधार हे ते विसरत नाहीत. सरांना त्यांचे मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, रवींद्र अनपट, अजित पिसाळ, शिवाजी खंडागळे या सर्वांचे अनमोल सहकार्य आणि प्रोत्साहन शिक्षणादरम्यान मिळाले. त्यांचे ते शतशः ऋणी आहेत. यशाच्या शिखरावर असताना हुरळून न जाता आपल्या मातीत पाय रोवून नाती जपण्याची कला सरांकडून शिकावी! 

          सर पहिल्यापासूनच 'डिटरमिनिस्टिक' म्हणजे निश्चयी स्वभावाचे असून ते हाती घेतलेले काम गुणवत्तापूर्वकरितीने पूर्ण झाल्याशिवाय हातावेगळे करत नाहीत. त्यांच्या राहण्यात साधेपणा असून त्यांनी 'हाय प्रोफाईल स्कॉलर लाईफ' जगली आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर हवे तसे वागणे सरांना मान्य नाही. माणसाने आपली भूतकाळातील परिस्थिती आठवून जमिनीवरच राहायला हवे आणि आनंदात जीवन जगायला हवे असे त्यांना वाटते. त्यांच्या ठायी असणारा कमालीचा नम्रपणा, हुशारी, शिस्तबद्धपणा, तीव्र इच्छाशक्ती, समर्पणवृत्ती आणि मायाळू स्वभाव त्यांच्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक माणसाला अनुभवण्यास मिळतो. सरांचा स्वभाव रागीट आणि शीघ्रकोपी जरी असला तरी त्यांचे विद्यार्थी वर्तमानात भेटल्यावर आवर्जून सांगतात की सरांच्या शिस्तीमुळे आज आम्ही यशस्वी जीवन जगत आहोत ! एकवीस वर्षांच्या अध्यापनात सरांनी अनेक यशस्वी आणि परिपूर्ण विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्याकडे पाहून त्याचे आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विश्लेषण करण्याची दुर्लभ क्षमता सरांना लाभली आहे. नियमित व्यायाम आणि खेळ यामुळे सर नेहमी निरोगी असतात. एक चैतन्यदायी, उर्जादायी आणि प्रफुल्ल अध्यापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजपुरे सर !  एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मुलांना आणि विद्यापीठास लाभले याबाबत विद्यार्थ्यांमधून नेहमीच प्रतिक्रिया येत असतात.


          सरांना मित्र जोडायचा छंद आहे. लहानपणी पासून ते आजतागायत सरांनी खूप मित्र मिळवले आहेत. फेसबुक, व्हाट्सऍप सारख्या समाजमाध्यमांवर सरांच्या मित्रांची संख्या पाहून कित्येक जणांची बोटे तोंडात जातात! सर मित्रांवर तेवढीच माया आणि प्रेम करतात. एस.एस.सी., एच.एस.सी., बी.एस.सी., आणि एम.एस.सी. चे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी आजही सरांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांचे स्नेहमेळावे घेऊन हितगुजाच्या गोष्टी, सुख-दुःख यांची देवाणघेवाण केली जाते. यातही सरांचा पुढाकार असतो. हे काम तोच व्यक्ती करू शकतो ज्याची नाळ गावाशी आणि माणसांशी जोडलेली आहे. या कृतीतून सरांचे मित्रप्रेम किती अफाट आहे याची अनुभूती येते. नेहमीच वेगळ्या पद्धतीने जगायला सरांना आवडते. आपले आयुष्य आपल्या तत्वांनी जगत असताना ते आनंदी होऊन जगायला आवडते. आपले आयुष्य सुंदर करायला आवडते !

          आपल्या गावातील तरुण पिढीला मार्गदर्शन करताना सर सांगतात की, तुम्हाला सुध्दा उच्च ध्येय गाठता येऊ शकेल, तुम्हालाही यशस्वी व्यक्तिमत्व होता येईल. तुम्हाला फक्त एकच करावं लागेल - अगदी जिद्दीनं, प्रामाणिकपणे विद्याग्रहन करावं लागेल. घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनेक वेळा शाळेची फी सुध्दा भरणे शक्य नव्हते, चटणी, भाकरी आणि शिळे अन्न खावून दिवस ढकलले आणि हार न मानता उत्तुंग यश संपादन केले. आपल्या मुलाने शिकून खूप मोठं नाव कमवावे अशी वडिलांची इच्छा सरांनी पूर्ण केली. त्यांच्या प्रवासावरून हे समजते की कोणत्या विद्यार्थ्यांत कोणता स्पार्क असेल हे सांगता येत नाही. असा स्पार्क शोधणे आणि त्याला योग्य दिशा देणे हे शिक्षक, शाळा आणि पालकांचे आद्य कर्तव्य आहे. कुठलेही यश मिळवण्याचा मार्ग खडतरच असतो. सर्वस्व ओतून आणि प्रयत्नवादी राहून तसेच घाई, गडबड न करता, त्वरित फळाची अपेक्षा न करता सतत कार्यतत्पर राहून आपणास दिवसागणिक प्रगती करावी लागते असा सरांचा ठाम विश्वास आहे. आयुष्यात कौतुकाबरोबरच थोडी शिस्त पण हवी अशी त्यांची धारणा आहे.  आपण जेव्हा शिक्षकी पेशा स्वीकारतो तेव्हापासूनच आपण कठोर परिश्रमांचा वसा घेतलेला असतो हे डॉ. राजपुरे सर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासामधून आपणास उमगले असेलच! 

          खिडकीतला बोन्साय बनून रहाणं त्यांना कधी जमलेचं नाही. उन्हा -तान्हात तावून सुलाखून ज्याप्रमाणे गुलमोहर बहरतो तसेच जीवनात तावून सुलाखून गुलमोहराप्रमाणे त्यांना बहरायला आवडले आणि ते सत्यात ही उतरवले. ज्याप्रमाणे- धावणाऱ्यांसाठी वाटा नसून वाटांसाठी धावणे असते गरुडझेप घेणारांसाठी आभाळाचे ओझे नसते, तसे सरांनी ज्या वाटेवर पाऊल ठेवले ती पायवाट न ठेवता तिचे हमरस्त्यामध्येच रूपांतर केले. त्यांना कधीही कोणत्याही आव्हानांचे ओझे वाटलेचं नाही आणि त्यासाठी असणारा आत्मविश्वास त्यांच्याकडे ओतप्रोत होता. जिद्द पेरली की यश उगवते तसा त्यांचा एका छोट्याशा वाडीतून केसू येसू पासून सुरु झालेला जीवनप्रवास शिवाजी विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील विभागप्रमुख या उच्च स्थानावर पोहोचून यशवंत डॉ. केशव पर्यंत येऊन ठेपलेला आपल्याला पहायला मिळतो.

          सर आपल्या अध्यापनाचा आणि संशोधनाचा आलेख उंचावत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना! आपणास निरोगी, आनंदी, चैतन्यदायी आणि सुखकारक आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी सदिच्छा ! सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

शब्दांकन
अनिकेत दत्तात्रय भोसले 
मोबाईल: ८९७५७११०८०